Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

11 March 2018

झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म- सप्तम उन्मेष

सप्तम उन्मेष
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
ज्ञानदेवी मुरले मन-प्राण
‘‘आई, श्रीज्ञानेश्वर माउली ‘पायाळू' हा शब्द वापरतात. ‘पायाळू’चा नेमका अर्थ काय गं?’’ त्यावर मातु:श्री म्हणतात, ‘‘सख्या, सांग बरे आपण ‘मायाळू’ कोणाला म्हणतो? तर ज्याच्या हृदयात सर्वांविषयी अपार माया असते, तो मायाळू. तसे ज्याच्या हृदयात सद्गुरूंचे पाय, श्रीचरण अखंड प्रतिष्ठापित असतात तोच पायाळू.’’ असा माउलींच्या दिव्य शब्दांचा विलक्षण आणि अपूर्व अर्थ सांगणा-या मातु:श्री म्हणजेच राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित प.पू.पार्वतीदेवी देशपांडे होत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजेच थोर स्वातंत्र्यसेनानी व विश्वविख्यात सत्पुरुष, प.पू.श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराज हे होत. आज फाल्गुन कृष्ण नवमी, श्रीपादनवमी, दि.११ मार्च २०१८ रोजी पू.श्री.मामांची २८ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गेले सात दिवस आपण या परमाद्भुत श्रीदत्तब्रह्माचे अपूर्व-मनोहर चरित्र सविस्तर पाहात आहोत. हा त्याचा कळसाध्याय आहे.
प.पू.मामांनी आपली संपूर्ण हयात जनता जनार्दनाची नारायणभावाने सेवा करण्यात खर्ची घातली. आपल्या ज्योतिष व वैद्यकी या दोन विद्यांचा विनामोबदला उपयोग करून लाखो जीवांना सौख्याचा मार्ग दाखविला. त्यांनी लोकांवर उपकार करण्यात कधीच आपला-परका असा भेद केला नाही.
पू.मामा जरी निष्कपट भावाने सर्वांचे अखंड हितच पाहात असले तरी, त्यांच्याही वाईटावर टपलेले लोक होतेच. अशा नराधमांनी पू.मामांवर तीन वेळा सायनाईड सारख्या भयंकर विषाचा प्रयोग केला. पण श्रीभगवंतांच्या असीम दयाकृपेने पू.मामा त्या जीवघेण्या विषप्रयोगांमधून सहीसलामत बाहेर आलेे. म्हणून त्यांना सद्यकाळातील नीलकंठच म्हणायला हवे. शेवटी दुर्जनांनी कितीही प्रयत्न केले तरी भगवंतच साक्षात् आपल्या प्रिय भक्तांचे संरक्षण करीत असल्याने, त्यांचे काहीही वाकडे कोणीच करू शकत नाही.
प.पू.श्री.मामासाहेब हे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे निष्ठावंत भक्त व संतवाङ्मयाचे साक्षेपी, रसज्ञ अभ्यासक होते. ‘माउली' हे त्यांचे हृदय अधिष्ठाते होते. माउलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास हा त्यांचा एकमात्र ध्यास होता. माउलींच्या शब्द न् शब्दावर त्यांनी सखोल चिंतन केलेले होते. झोपेतून उठल्याक्षणीसुद्धा ते माउलींच्या ओव्यांचे चिंतन मांडू शकत असत, इतकी ज्ञानेश्वरी त्यांच्या आत मुरलेली होती. एवढा प्रचंड अधिकार असूनही हा थोर उपासक आजन्म स्वत:ला माउलींचा दासानुदास मानीत होता. स्वत:ची अभ्यासू वृत्ती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ताजी, टवटवीत ठेवलेली होती. म्हणूनच श्री माउलींच्या कृपेने त्यांचा हृदयगाभारा अलौकिक ज्ञानतेजाने लखलखीत उजळलेला होता.
http://sadgurubodh.blogspot.in
भगवान माउलींचे वाङ्मय हे बहुआयामी, प्रगल्भ आणि एकाच वेळी अनेक अर्थांनी प्रकटणारे आहे. त्यासाठी त्याचा अभ्यासकही तसाच अष्टावधानी, विलक्षण रसज्ञ, अभिजात सौंदर्यदृष्टी असणारा व परमभक्तिमानच असावा लागतो. तरच त्याच्या बुद्धीत माउलींच्या साहित्याचे बीज रुजते. पू.मामा हे माउलींच्या वाङ्मयाचे असेच आदर्श अभ्यासक होते. त्यांची दृष्टीदेखील माउलींसारखीच सूक्ष्म आणि शुद्ध होती. माउलींना नेमके काय म्हणायचे आहे? हे त्यांना अचूक समजत असे. ज्ञानेश्वरीच्या अतिशय कठीण समजल्या जाणा-या सहाव्या अध्यायातील अभ्यासयोगावर फारच थोड्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या विषयावरील पू.मामांचेच विवरण जगभर प्रमाण मानण्यात येते. त्यांना आजवरच्या सर्वच थोर महात्म्यांनी व विचारवंतांनी ‘श्रीज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार' म्हणून एकमुखाने गौरविलेले आहे. आचार्य अत्रे पू.मामांकडे येऊन आवर्जून ज्ञानेश्वरीचे मार्गदर्शन घेत असत.
प.पू.मामा हे फार दूरदृष्टीचे महात्मे होते. प्रवचनांमधून सांगितलेले ज्ञान हे तेवढ्यापुरतेच राहते. त्यातले सगळे काही लोकांच्या लक्षात राहत नाही. पण त्याच उपदेशाचे संकलन जर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर मात्र त्याचा लाभ अनंतकाळपर्यंत होत राहतो. याच संपन्न जाणिवेतून पू. मामांनी ‘श्रीवामनराज प्रकाशन' नावाने एक संस्था स्थापन करून माउलींच्या व इतर संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास पुस्तकांच्या माध्यमातून ना नफा तत्त्वावर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आजमितीस अडीचशे पुस्तके प्रकाशित करून ना नफा तत्त्वावर, सवलतीच्या दरात त्यांची विक्री करणारी श्रीवामनराज प्रकाशन ही एकमात्र आध्यात्मिक प्रकाशन संस्था म्हणून विख्यात आहे. माउलींचे वाङ्मय जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा पू.मामांचा एक महान संकल्पही हळूहळू पूर्ण होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये मराठी संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास होत आहे ही फार अभिमानाचीच बाब आहे.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या दृष्टांतानुसार, पू.मामांनी श्रीगुरुचरित्राची सर्वजनसुलभ व संपादित पाठावृत्ती तयार केलेली आहे. या "श्रीगुरुचरित्र नित्यपाठ" नावाच्या ग्रंथाच्या आजवर दहापेक्षा जास्त आवृत्या प्रकाशित झालेल्या असून स्त्री-पुरुष सर्वांनाच याचे पारायण करण्याची मुभा आहे. या ग्रंथाला प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंचाच आशीर्वाद असल्याने, याच्या पारायणाने मूळ श्रीगुरुचरित्राच्या पारायणाइतकेच अद्भुत फळ मिळते. शिवाय मूळ चरित्रापेक्षा याची ओवीसंख्या कमी असून नियमही थोडे सोपे आहेत, हे या ग्रंथाचे मुख्य वैशिष्ट्य होय. भगवान श्रीमाउलींचेही "श्रीज्ञानदेव विजय" हे चोवीसशे ओव्यांचे अद्भुत चरित्र पू.मामांनी रचलेले आहे. आजवर माउलींचे असे पारायणासाठी चरित्र उपलब्धच नव्हते. या सुरेख व रसाळ चरित्रग्रंथाने ही उणीवही भरून काढलेली आहे. याशिवाय पू.मामांच्या प्रवचनांवर आधारित ग्रंथही अभ्यासक व साधकांमध्ये खूप प्रसिद्धी पावलेले आहेत. भगवान श्री माउलींच्या कृपा-पसायामृताचे विलक्षण माधुर्य अंगी मिरवणारे हे सर्व शब्दधन अत्यंत मनोहर असून नित्यचिंतनीयच आहे.
प.पू.श्री.मामांनी आपल्या हयातीतच 'श्रीपाद सेवा मंडळ' या संस्थेची संरचना केलेली होती. परंतु रितसर नोंदणी मात्र प.पू.श्री.मामांच्या देहत्यागानंतर झाली. प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या समर्थ मार्गदर्शनानुसार सध्या जगाच्या पाचही खंडांमध्ये श्रीपाद सेवा मंडळाचे कार्य विस्तारलेले असून लाखो साधक साधनामार्गावर अग्रेसर होत आहेत. भारतातील विविध प्रकल्पांच्या माध्यमातून देव, देश आणि जनसेवा फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. प.पू.श्री.मामांना झालेल्या सद्गुरु श्री माउलींच्या दृष्टांतानुसार, त्यांनी "श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन ज्ञान योग अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान" या संस्थेची स्थापना केली. या मार्फत त्यांना श्री माउलींच्या जन्मस्थानी, आळंदीतील सिद्धबेटावर त्यांचे आंतर्राष्ट्रीय स्मारक उभारायचे होते. त्या कार्यातीलच, श्री निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय व श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ हे दोन्ही प्रकल्प आळंदीत कार्यान्वित झालेले आहेत.
श्रीदत्तयोग्याचे महानिर्वाण
१९८८-८९ साली प.पू.श्री.मामांचे अमृतमहोत्सवी वर्ष भारतभर फार मोठ्या प्रमाणावर साजरे झाले. पुणे, सांगली, बेळगांव, भिलाई, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पंढरपूर, वर्धा, पणजी, डोंबिवली, क-हाड इत्यादी ठिकाणी प.पू.श्री.मामांचे सत्कार समारंभ झाले. विविध मान्यवर, संत-सत्पुरुष, पीठाधिपतींनी आवर्जून येऊन प.पू.श्री.मामांच्या गौरवपर भाषणे केली. प.पू.श्री.मामांवर 'पैल मेरूच्या शिखरी, कैवल्यलेणे, अमृतकण आणि कौस्तुभ' असे चार गौरवग्रंथही प्रकाशित झाले. अमृतमहोत्सवी वर्ष विविध कार्यक्रम आणि सत्कारांनी अक्षरशः गाजले.
प.पू.श्री.मामांनी आपल्या परंपरेचे उत्तराधिकार प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे आणि प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांना पूर्वीच देऊन ठेवलेले होते. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली संप्रदाय सेवेचा सर्व कार्यभार आजही  व्यवस्थितपणे चालू आहे. अमृतमहोत्सवानंतर मात्र प.पू.श्री.मामांना पैलतीराचे वेध लागले. त्या सुमारासच त्यांना राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे दर्शन झाले व त्यांनी आयुष्य वाढवून देऊ का? असे विचारले. त्यावर पू.मामांनी, "देवा, काया शिणली आहे, आयुष्य वाढवून नको आम्हांला. आता आपल्यातच कायमचे सामावण्याची इच्छा पूर्ण करा", अशी विनंती केली. त्यानुसार पू.मामांनी आपल्या देहत्यागाची तिथी निश्चित केली व काही जवळच्या भक्तांना सांगूनही ठेवली होती.
पू.मामांनी अगदी शेवटच्या काळात, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयनानगर जवळी एक क्षेत्र विकसित केले. श्रीक्षेत्र दत्तधाम येथे भगवान श्रीदत्तप्रभूंच्या साक्षात्कारानुसार द्वितीय दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पूर्णाकृती श्रीमूर्तीची स्थापना केली. या स्थानीच प्राचीन काळी भगवान परशुरामांनी भगवान श्री गोरक्षनाथांना श्रीविद्येचा उपदेश केलेला असल्याने ही फार थोर तपोभूमीच आहे. आज श्रीक्षेत्र दत्तधाम हे महाराष्ट्रातील दक्षिण गिरनार म्हणून सुप्रसिद्ध झालेले आहे.
फाल्गुन कृष्ण नवमी, दि.२१ मार्च १९९० च्या पहाटे तीन वाजता पू.मामांनी आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. "देहाची तीन चिमट्या राख होईपर्यंत साधना सोडायची नाही !" असा त्यांच्या मातु:श्रींचा उपदेश होता. पू.पार्वतीदेवींनी स्वत: देखील आसनमांडी घालून सद्गुरुस्मरणातच देहाचा त्याग केला होता. पू.मामा देखील गादीवर मांडी घालून बसले, सद्गुरुस्मरण केले व त्याच स्थितीत त्यांनी आपले प्राण ब्रह्मरंध्रातून काढून विश्वचैतन्याशी एकरूप केले. आज या घटनेला अठ्ठावीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या देहत्यागाच्या वेळी साक्षात् भगवान श्री स्वामी समर्थ महाराज व सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी तिथे प्रकट झाले व मातु:श्री स्वहस्ते पू.मामांच्या ठायीचे तेज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या ठायी विलीन केले. किती अलौकिक घटना आहे ही ! ज्या आईने जन्म दिला, तिनेच पुढे शक्तियुक्त कृपाही केली व तिनेच शेवटी परब्रह्माशी एकरूपही केले. अशी घटना अद्वितीयच म्हणायला हवी.
पू.मामांच्या उशाशी एक छोटे गजराचे घड्याळ नेहमी असायचे. पू.मामांनी पहाटे तीन वाजता देह ठेवला, बरोबर त्याच वेळी ते घड्याळ आपोआप बंद पडले. या चमत्काराचा प्रत्यय आपण आजही घेऊ शकतो. पहाटे तीनची वेळ दाखविणारे ते बंद पडलेले घड्याळ माउली आश्रमातील पू.मामांच्या वापरातील पावन वस्तूंच्या  संग्रहालयात ठेवलेले आहे. पू.मामांचे अवघे जीवनचरित्र अशा अनंत चमत्कारसदृश घटनांनी भरलेले आहे. त्यांचे चरित्र हा चालता-बोलता जिवंत चमत्कारच आहे, असे म्हणायला हरकत नाही.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व प.पू.श्री.मामांचे अत्यंत दृढ प्रेमनाते होते. प.पू मामा प.पू.काकांना गुरुस्थानीच मानत असत. आषाढी वारीतील फलटण मुक्कामात व इतरही वेळी प.पू.मामा प.पू.काकांकडे येत असत. दोघांची ज्ञानेश्वरी या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर सखोल चर्चा होत असे. प.पू.काकांनी एकदा प.पू.मामांच्या मनातील गोष्ट जाणून न विचारताच त्यांना अडलेल्या काही ओव्यांचे मार्गदर्शन आपणहून केले होते. प.पू.मामा नेहमीच प.पू.काकांविषयी अतीव प्रेमादराने बोलत असत. या दोन थोर ज्ञानेश्वरी-भक्तांची प्रत्येक भेट अवर्णनीयच होत असे.
गेले सात दिवस आपण या खळाळत्या श्रीपादचरित्र-गंगेमध्ये प्रेमादरे अवगाहन करीत आहोत, हे आपले परमभाग्य आहे. नगाधिराज हिमालयाची उंची किंवा रत्ननिधी महासागराची खोली जशी कधीच जोखता येत नाही, तशीच संतचरित्रांची महतीही कधी सांगून पूर्ण होत नाही. त्यांचा अवाका इतका मोठा असतो की मानवी बुद्धीच्या कक्षेत तो कधी मावतच नाही. पण माउली म्हणतात तसे, गंगेचे एक घोटभर तीर्थ घेतल्यानेही प्रत्यक्ष गंगेचेच पान केल्याचे सुफळ मिळते, तसे संतचरित्रांच्या यथाशक्य आस्वादनानेही आपल्याला अमृतमय होता येते. मुक्याने गूळ खाऊन त्याचा आस्वाद जसा मनातल्या मनातच पचवायचा असतो, तशी ही संतचरित्रे आतल्या आत सुखाने वारंवार उपभोगायची असतात. त्यांचा अवर्णनीय आनंद कधीच कमी होणारा नसतो, उलट तो त्या चरित्रांच्या सतत अनुसंधानाने चौपटीने वाढत जातो. त्यात प.पू.श्री.मामांसारख्या महान अवतारी महात्म्यांचे चरित्र तर अलौकिकतेलाही अप्रूप वाटावे असे अद्भुतरम्य असते. तेच बोधप्रद व मार्गदर्शक चरित्र आपण गेले सात दिवस मोठ्या भाग्याने आस्वादत आहोत. म्हणून आज प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या अठ्ठाविसाव्या पुण्यदिनी, त्यांच्या श्रीचरणी प्रेमादरपूर्वक साष्टांग दंडवत घालू या आणि त्यांच्याच करुणाकृपेने संपन्न झालेली ही चरित्रचिंतनाची सेवा तेथेच मनोभावे समर्पित करून, आपण त्या अम्लान, सर्वतीर्थास्पद श्रीचरणी त्यांच्याच पावन स्मरणाच्या परमानंदात मग्न होऊन निरंतर सुखी होऊ या !!
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराज की जय ।
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।
( कालच्या लेखात उल्लेख केलेल्या अद्भुत चमत्काराचा संदर्भ असणारे, पू.श्री.गुळवणी महाराज अतिरुद्र यागाच्या अवभृथ स्नान यात्रेत प्रकट झाल्याचे छायाचित्र आजच्या लेखासोबत घेण्यात आलेले आहे. प्रस्तुत फोटोमधील गोलात श्री.गुळवणी महाराज स्पष्ट दिसतात.
प.पू.श्री.मामांचे वाङ्मय ३०% सवलतीत मिळविण्यासाठी संपर्क क्रमांक - श्रीवामनराज प्रकाशन, पुणे - 020-24356919 )
 http://sadgurubodh.blogspot.in
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

Read More

10 March 2018

झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म - षष्ठम उन्मेष

षष्ठम उन्मेष
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
श्रीगुरुकृपा उखा उजळली
दरवर्षीप्रमाणे १९५४ साली पू.मामा पंढरीच्या वारीला गेले. ते ज्या दिंडीतून जात त्या देशमुख महाराजांच्या दिंडीचे व्यवस्थापक ह.भ.प.यशवंतराव वैद्य मास्तर म्हणून होते. तेही ज्ञानेश्वरीचे अभ्यासक असल्याने त्यांचे पू.मामांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते दरवेळेस पू.मामांना वारीनंतर सोलापूरला आपल्या घरी येण्याची विनंती करीत. पण पू.मामा तोवर कधी हो म्हणाले नव्हते. त्यावर्षी मात्र ते लगेच हो म्हणाले व त्याप्रमाणे आषाढी एकादशी झाल्यावर सोलापूरला वैद्य मास्तरांच्या घरी गेले. दुपारचे भोजन झाल्यावर सोलापूर पाहण्याच्या उद्देशाने सहज फिरायला गेले. परत आले तर घराबाहेर चपलांचा ढीग लागलेला. मोठ्या आश्चर्याने पू.मामा जिना चढून गेले. तेथे तिस-या मजल्यावर एक शांत, तेजस्वी सत्पुरुष व्याघ्राजिनावर बसलेले दिसले. त्यांना पाहताच ज्योतिषाच्या वेगळ्याच ऊर्मीने पू. मामा एकदम बोलून गेले की, "यांच्या पत्रिकेत पंचमात बुध-चंद्र युती असणारच."
पू.मामांचे शब्द कानी पडल्यावर त्या सत्पुरुषांनी पू.मामांना जवळ बोलावले. मामा देखील एका अनामिक ओढीने खेचले गेले. त्या सत्पुरुषांनी आपल्या आसनावरच थोडे सरकून मामांना बसवून घेतले आणि म्हणाले, " सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज व आपल्या मातुःश्रींची आपल्यावर पूर्णकृपा आहे ! " त्याबरोबर पू. मामांचे डोळे मिटले गेले आणि त्यांना तीव्र भस्रिका होऊ लागली. त्यानंतर जवळपास दीड तास प.पू.मामा प्रगाढ समाधीत होते. समाधीतून उठल्यावर मात्र त्यांनी त्या सत्पुरुषांच्या श्रीचरणांवर आपल्या अश्रूंनी अभिषेक केला व दंडवत घातला. ते सत्पुरुष म्हणजेच प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे शिष्योत्तम व श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू, योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराज हे होते. त्यांना पाहिल्यावरच पू.मामांना अंतरीची खूण पटली व पूर्वी मातु:श्रींनी दीक्षा दिली त्यावेळसारखाच समाधीचा अनुभव पुन्हा आल्यावर तर पक्की खात्री झाली की, हेच आपले मंत्रगुरु आहेत.
लगेचच श्रीगुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर प.पू.श्री.मामांना योगिराज श्री.गुळवणी महाराजांनी, प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांकडून आलेला सांप्रदायिक महामंत्र शक्तिपातपूर्वक प्रदान केला. त्याचबरोबर परंपरेचे उत्तराधिकारही लेखी प्रदान केले. पू.श्री.गुळवणी महाराजांना त्याच दिवशी पहाटे प.प.श्री.टेंब्येस्वामींचे साक्षात् दर्शन झाले व ते म्हणाले, "श्रीपाद आमचीच विभूती आहे, त्याला महामंत्र प्रदान करावा व त्याला सांभाळावे. कुरवपूरला अनुष्ठानासाठी पाठवावे. तेथे त्याला श्रीदत्तप्रभूंचा कृपाप्रसाद लाभेल."
श्री.गुळवणी महाराजांच्या अनुग्रहानंतर पू.मामांची साधना आणखी तीव्रतेने सुरू झाली. त्यांचे कुरवपूरचे अनुष्ठानही फारच अप्रतिम झाले. त्या अनुष्ठानासंबंधी स्वतः पू.मामांनीच अतिशय अद्भुत लेखन करून ठेवलेले असून ' तीर्थदर्शन ' नावाच्या त्यांच्या ग्रंथात ते छापलेले आहे. या काळात त्यांना अद्भुत दर्शने झाली. तसेच स्वतः भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी दिव्य पादुका प्रसाद दिला. त्या अतिदिव्य पादुकांची त्यांनी शेवटपर्यंत पूजा-अर्चा केली व त्यांच्या देहत्यागानंतर, त्यांनीच पूर्वी देवांची जशी परवानगी घेतलेली होती त्यानुसार, त्या पादुका त्यांच्या मुखात ठेवल्या गेल्या. या पादुकांच्या अभिषेक तीर्थाने अनेक भक्तांना अद्भुत अनुभव आलेले होते, अनेकांच्या व्याधी, पिशाचबाधा त्या तीर्थाने नष्ट झाल्या होत्या. आश्चर्य म्हणजे पू.मामांच्या घराण्यात असा दिव्य पादुकाप्रसाद त्यांच्या वडलांना व आजोबांनाही प्राप्त झालेला होता. श्रीदत्तप्रभू सलग तीन पिढ्या पादुकारूपाने या घराण्यातील महापुरुषांकडून सेवा स्वीकारत होते.
कुरवपूरच्या अनुष्ठानानंतर भगवंतांच्या आज्ञेने त्यांनी संपूर्ण भारताची तीर्थयात्रा केली. प्रथम दक्षिणेकडील तीर्थे, अष्टविनायक, जगन्नाथपुरी, गया, काशी करून हिमालयातील चार धाम करून मग ते पुन्हा आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी पुण्यात परतले. सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांना पू.मामांना मिळालेला श्रीपादुकाप्रसाद पाहून अतीव आनंद झाला. त्यांनी पुढील बारा वर्षे तीव्र साधना करण्याची व तोवर हा प्रसाद गुप्त ठेवण्याची आज्ञा केली. पू.मामांनी देखील ती आज्ञा तंतोतंत पाळली.
https://www.facebook.com/sadgurubodh/
कुरवपूरच्या अनुष्ठानाला जाण्यापूर्वी श्री.गुळवणी महाराजांच्या आज्ञेने पू. मामा भगवान श्री माउलींची प्रार्थना करण्यासाठी आळंदीला आले होते. त्याचवेळी भगवान श्री ज्ञानेश्वर माउली समाधीतून प्रत्यक्ष प्रकटले आणि त्यांनी पू.मामांच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून अनुग्रह केला. अशाप्रकारे प.पू.श्री.मामा हे श्रीदत्त, श्रीनाथ आणि श्रीभागवत (वारकरी) अशा तिन्ही प्रमुख संप्रदायांचे श्रेष्ठ अध्वर्यू ठरले. त्यांच्या ठिकाणी श्रीदत्तसंप्रदायाच्या दोन परंपराशाखा, मातु:श्रींकडून राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी महाराजांची शाखा व श्रीगुळवणी महाराजांकडून भगवान श्रीमन्नृसिंहसरस्वती स्वामी - प.प.टेंब्येस्वामींची शाखा, शिवाय श्रीमाउलींकडून नाथ व भागवत संप्रदाय व श्रीगुळवणी महाराजांकडून शक्तिपात संप्रदाय, अशा तिन्ही संप्रदायांच्या चार परंपरा शाखांचा अद्भुत संगम झालेला होता. एकाचवेळी इतक्या शाखांचा एकाच ठिकाणी संगम झालेला अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. प.पू.श्री.मामांच्या अनेक लीलावैशिष्ट्यांपैकी हे एक प्रमुख वैशिष्ट्य होते !
संप्रदाय सेवा-कार्य
सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांनी प.पू.श्री.मामांना त्यांच्या दीक्षासमयीच इतरांना दीक्षा देण्याचे अधिकार लेखी दिलेले असले, तरी १९६१ सालापर्यंत मामा कोणलाही दीक्षा देत नसत. १९६१ साली मिरजेत एका प्रसंगाने अचानक त्यांच्याकडून पहिली दीक्षा झाली. त्यानंतर मात्र ईशकृपेने त्यांचे दीक्षाकार्य फार मोठ्या प्रमाणावर वाढले. श्री.गुळवणी महाराजांचे जवळपास ७० हजार अनुगृहीत होते. प.पू.श्री.मामांच्याकडून ७४ हजार साधकांना दीक्षा झाल्या त्यांच्या हयातीत.
योगिराज श्री.गुळवणी महाराज देखील अनेक साधकांना प.पू.श्री.मामांच्यावर सोपवत. " प.पू.श्री.मामा आणि आम्ही काही भिन्न नाही ", असे श्रीमहाराजांनी अनेकांना सांगितलेले होते. एवढे असूनही पू.मामा प्रत्येकवेळी दीक्षा झाल्यावर साधकांना आवर्जून सांगत की, " आम्ही दीक्षेसाठी निमित्त झालेलो असलो तरी आपले श्रीगुरु योगिराज श्री.गुळवणी महाराजच आहेत." पू.मामांनी आपले शिष्यपणच शेवटपर्यंत मनापासून जपलेले होते. त्यांनी कधीच गुरु होऊन मिरवले नाही.
प.पू.श्री.मामांना ह.भ.प.श्री.केशवराव महाराज देशमुखांनी स्वप्नात येऊन त्यांच्या ग्रंथांची प्रकाशने करण्याची व त्यांच्या घरात पुन्हा ज्ञानेश्वरी प्रवचने करण्याची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे प.पू.श्री.मामांनी सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांच्या संमतीने, ' ज्ञानेश्वरीचे सुलभ गद्य रूपांतर ' हे देशमुख महाराजांचे पुस्तक ३ खंडांत प्रकाशित केले. नारदभक्तिसूत्रे, अभंगमालिका अशी त्यांची इतरही काही पुस्तके तसेच ' संतकृपा प्रतिष्ठान ' व ' संतकृपा ' मासिकाची सुरुवात केली. देशमुख माडी विकत घेऊन ' श्रीज्ञानेश्वरी निवास ' असे नामकरण करून श्री.गुळवणी महाराजांच्या हस्ते उद्घाटन करून तेथे नित्य प्रवचनसेवा सुरू केली.
श्री.गुळवणी महाराजांनी एकदा प.पू.श्री.मामांना विचारले, "तू सार्वभौम राजाचा प्रधान होऊन राहणार की स्वतंत्र राजा होणार?" प.पू.श्री.मामा उत्तरले, "मी मांडलिक राजा होणार." त्यावर श्री.गुळवणी महाराज म्हणाले, "ठीक आहे, मग संप्रदाय कार्यासाठी तू स्वतंत्र पीठ स्थापन कर, आमचे पूर्ण आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. श्रीदत्तप्रभू प्रचंड कार्य करवून घेतील तुझ्याकडून!" श्रीमहाराजांचे हे शब्द जसेच्या तसे खरे ठरलेले आज आपल्याला पाहायला मिळत आहेत.
श्रीगुरुमहाराजांच्या या आदेशानुसार प.पू.श्री.मामांनी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी जवळ जागा विकत घेऊन तेथे एक वास्तू निर्माण केली. पौष शुद्ध द्वितीया दि.२६ डिसेंबर १९७३ रोजी या ' माउली ' आश्रमाची वास्तुशांती झाली. श्री.गुळवणी महाराज आजारी असल्याने प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या पादुका आणवून त्या अधिष्ठानाखाली सर्व सोहळा संपन्न झाला. माउलीच्या वास्तुशांतीनंतर लगेचच प.पू.श्री.गुळवणी महाराजांनी १५ जानेवारी १९७४ रोजी नश्वर देहाचा त्याग केला. आजमितीस प.पू.श्री.मामांची 'माउली' ही जगभरातील लाखो साधकांची चिरंतन साउली ठरलेली आहे !
प.पू.श्री.मामांनी श्री.गुळवणी महाराजांकडून आलेल्या परंपरेचे उत्तमरित्या जतन-संवर्धन करून जगभर विस्तारही केला. १९७३ साली ज्ञानेश्वरीच्या प्रचार प्रसार कार्यासाठी ते इंग्लंडला देखील जाऊन आले होते. तेथेही अनेकांना दीक्षा झाल्या, संत वाङ्मयाचे मार्गदर्शन झाले. पू.मामा नेहमी म्हणत असत, "आमच्या संप्रदायात दीक्षेचा प्रचार प्रसार नाही. फक्त तत्त्वज्ञानाचा व संतवाङ्मयाचा, ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार आम्ही करतो. ' ये लेने देने की नही होने पाने की बात है । ' श्रीभगवंतांच्या इच्छेशिवाय व जीवाची कर्मसाम्यदशा आल्याशिवाय आणि त्याचा गुरूंशी पूर्व ऋणानुबंध असल्याशिवाय कधीही दीक्षा होत नसते. येथे मनमानी चालत नाही." त्यामुळे सरसकट सामुदायिक दीक्षा देणे किंवा घाऊक भावात दीक्षा देणे असले थिल्लर प्रकार श्री.गुळवणी महाराजांना व पू.मामांना अजिबात मान्य नव्हते. ते असल्या गोष्टींचा कडाडून विरोध करीत. पण आता कलियुगाचेच फळ म्हणून की काय, पण या अद्भुत दीक्षा संप्रदायाचे, प्रसिद्धी व पैसा यांच्या तीव्र वासनेपायी तथाकथित गुरुबाजी करणा-या मंडळींनी पार बाजारीकरण करून टाकलेले आहे. पण हे स्वरूप कधीच या थोर महात्म्यांना मान्य नव्हते. त्यांनी त्यांच्या हयातीत वेळोवेळी असल्या शास्त्रविरुद्ध प्रकारांवर ताशेरे ओढलेले आहेत.
याच संप्रदाय सेवाकार्याचा एक मुख्य भाग म्हणून विविध ठिकाणी साधकांची साधना शिबिरे आणि तीर्थयात्रांचे आयोजन केले जात असे. शिवाय परंपरेतील महात्म्यांच्या जयंती-पुण्यतिथी उत्सवांच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम संपन्न होत असत. प.पू.श्री.मामांची या सर्व कार्यासाठी प्रचंड भ्रमंती होत असे. अवघा भारत देश त्यांनी या कार्यासाठी पिंजून काढला, श्रीस्वामी समर्थ महाराजांचे, श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे, श्री.गुळवणी महाराजांचे नाव आणि उज्ज्वल कीर्ती त्यांनी दशदिशांत पोहोचवली.
प.पू.श्री.मामांना यज्ञ-यागादी उपासनांचेही अतीव प्रेम होते. देश-धर्म-जनहितार्थ त्यांनी अनेक यज्ञ-याग संपन्न केले. नवचंडी, शतचंडी, महारुद्र, लक्ष्मीयाग, गणेशयाग, श्रीदत्तमालामंत्र स्वाहाकार, विष्णुयाग आदी विविध ठिकाणी संपन्न झाले. श्री.गुळवणी महाराजांच्या आज्ञेने त्यांनी श्रीनृसिंहवाडी क्षेत्री १९८४ साली अतिभव्य अतिरुद्र स्वाहाकार संपन्न केला. हा 'न भूतो न भविष्यति' झालेला यज्ञसोहळा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या यागामध्ये एक अलौकिक घटना घडली होती. श्री.गुळवणी महाराजांनी पू.मामांना पूर्वी सांगितले होते की, "तुमच्या अतिरुद्र यागात आम्ही उपस्थित राहू !" प्रत्यक्षात हा याग महाराजांनी देह ठेवल्यानंतर आठ वर्षांनी झाला. त्याच्या अवभृथ स्नान यात्रेत हत्तीवरून पू.मामांची मिरवणूक चालू होती. त्यावेळी अचानक अलौकिक प्रकाशाचा लोळ पू.मामांसमोर प्रकटला व खाली जाऊन ब्रह्मवृंदाच्या मध्ये त्यातून श्री.गुळवणी महाराज साकारले. पू.मामांनी त्यांना तेथूनच वाकून नमस्कार केला. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले व ते अदृश्य झाले. सर्वात मोठे आश्चर्य तर पुढे आहे, त्या प्रसंगाचा नेमका कोणीतरी फोटो काढला ज्यात श्री.गुळवणी महाराज स्पष्ट दिसतात. तो फोटो पू.मामांच्या ' रूपसुधा ' या छायाचित्र संग्रहात प्रकाशित केलेला आहे.
पू.श्री.मामांनी संप्रदायसेवा म्हणून विशुद्ध परमार्थाच्या प्रचार प्रसारासाठी प्रचंड कष्ट करून अनेक ग्रंथ प्रकाशित केले, त्यासाठी त्यांनी श्रीवामनराज प्रकाशनाची स्थापना केली. गुरुभक्ती व कृपायोगाच्या अभ्यासाला वाहिलेले 'श्रीवामनराज' नावाचे एक त्रैमासिकही सुरू केले.जवळपास अडीचशे ग्रंथ प्रकाशित करणारे हे प्रकाशन आजमितीस सर्व आध्यात्मिक प्रकाशन संस्थांमध्ये अग्रगण्य मानले जाते. एकाहून एक सुंदर व बोधप्रद ग्रंथ या प्रकाशनाने प्रकाशित करून साधकांना ३०% सवलतीत उपलब्ध करून देऊन पू.मामांचे दिव्य स्वप्न सत्यात उतरवलेले आहे.
( क्रमश: )
http://sadgurubodh.blogspot.in
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

Read More

9 March 2018

*** *झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म* ***

*** *पंचम उन्मेष* ***

( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )

*विलक्षण अधिकार*

सद्गुरु मातु:श्री पू.पार्वतीदेवी देशपांडे या राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या कृपा-परंपरेतील अद्वितीय विभूतिमत्त्व होत्या. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलेली स्थितप्रज्ञाची, प्राप्तपुरुषाची, अनन्यभक्ताची, ज्ञान्याची अशी सर्व दिव्य गुणवैशिष्ट्ये एकाचवेळी त्या अंगी मिरवीत होत्या. मेणाहून मऊ आणि त्याचवेळी वज्राहूनही कठोर असणे, सामान्य माणसाला जमणारच नाही कधी. मातु:श्री ते लीलया करीत असत. पू.पार्वतीबाई अशा महासिद्धांनाही मार्गदर्शन करतील एवढ्या थोर योग्यतेच्या होत्या. त्या आपल्या दैवी सद्गुणांनी राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांची कन्या शोभतात. म्हणूनच त्यांचे "श्रीस्वामीतनया" हे नाम यथार्थ आहे. त्यांचे चरित्र हा परमार्थ मार्गातील साधकांसाठी अक्षय बोध-ठेवा आहे. त्यानुसार जर एखाद्याने आपली साधकीय मनोवृत्ती, विचारांची पद्धत व दिनचर्या ठेवली, तर परमार्थाचा अत्यंत कठीण पण अद्भुत व मनोहर प्रांत निश्चितच आपलासा होईल.
पू.दत्तूअण्णांनी देह ठेवण्यापूर्वी काही दिवस आधी राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज त्यांच्यासमोर प्रकटले व म्हणाले, "बये, तुला आता दुर्दैवाचे दशावतार पाहायचे आहेत, तयार आहेस ना?" त्यावर मातु:श्रींनी शांतपणे पण आदरपूर्वक विचारले, "आपण आणि माझे भगवंत त्यावेळी माझी साथ सोडून जाणार का?" श्रीस्वामी महाराज म्हणाले, "अगं, बाप कधी पोरीला एकटे सोडतो का असा?" त्यावर तितक्याच निर्धाराने मातु:श्री उत्तरल्या, " महाराज, मग कितीही भयंकर असे दुर्दैवाचे दशावतारच नाहीतर शतावतार देखील बघायला मी आनंदाने तयार आहे !" आपल्या लाडक्या पोरीची ही ' तयारी ' पाहून श्रीस्वामी महाराज प्रसन्नतेने हसले. साक्षात् श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर बालपणी खेळलेल्या होत्या पार्वतीदेवी. त्यांचा अद्भुत अधिकार आपल्याला वर्णन करता येईल थोडाच?
त्या प्रसंगानंतर काही दिवसांनीच पू.दत्तूअण्णांनी देह ठेवला व मातु:श्रींवर दु:खांचे, कष्टांचे डोंगरच्या डोंगर कोसळू लागले. पण किंचितही विचलित न होता, कसलाही किंतू मनात न आणता, त्यांचे साधन व भगवत् अनुसंधान तसल्या भयानक काळातही विनाखंड चालू होते. "जशी हरीची इच्छा !" या एका वाक्यावरच त्यांनी सर्व काही सोडलेले होते. श्रीसद्गुरुचरणीं पूर्ण शरणागत होऊन त्यांनी शांतपणे ते बिकट प्रारब्धही आनंदाने सहन केले. केवढे धैर्य हवे यासाठी ! आपण बारकेसे संकट आले तरी लगेच निराश होऊन दैवाला व देवांना दोष देत बसतो. अगदी तुटपुंजी, नावापुरती उपासना आपण केलेली असते, पण अशा संकटांमध्ये आपला आव असा असतो की बस. आम्ही "एवढे" देवांचे करतो तरी ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आम्हांला दु:ख कसे भोगायला लावतात....वगैरे बडबड आपण करू लागतो. त्यावेळी आपला विश्वास पार रसातळाला जातो. खरेतर अशी परिस्थिती बदलण्याचा हक्काचा उपाय असणारे हातचे साधन सोडून आपण नुसते दु:खाचे कढ काढत बसतो. हाच आपल्यामधला व संतांमधला महत्त्वाचा फरक आहे. मातु:श्री पार्वतीदेवींच्या अंगी परमार्थ परिपूर्ण मुरलेला होता, म्हणूनच त्या अवघड परिस्थितीतही त्यांच्या मनाची शांती ढळली नाही की त्या विचलित झाल्या नाहीत. साधक म्हणून आपण याचे सतत मनन करायला हवे.
http://sadgurubodh.blogspot.in
मातु:श्री पू.पार्वतीबाईंच्या अलौकिक करारीपणाचा एक विलक्षण प्रसंग मुद्दाम सांगतो. प.पू.श्री.मामांचा पाठचा भाऊ, यशवंत हा व्यसनाधीन झालेला होता. पू.मातुःश्रींनी त्याला गोड बोलून बरेच वेळा समजावून सांगितले पण त्याने सुधारणा केली नाही. शेवटी सद्गुरु श्रीस्वामी महाराजांचा कौल घेऊन त्यांनी एकदा त्याला कडक शब्दांत विचारले. तो काहीच उत्तरला नाही. त्यावेळी पू.मामांनीही त्याला समजवायचा प्रयत्न केला. पण त्याने मामांनाच उलट उत्तरे द्यायला सुरू केले. त्यासरशी मातुःश्रींनी त्याला घराबाहेर काढले आणि "पुन्हा या घराची पायरी चढू नकोस !" म्हणाल्या. त्यावेळी त्या उंब-याच्या बाहेर बसलेल्या होत्या. तिथूनच त्यांनी पू.मामांना पाणी तापवायला सांगितले व पाणी तापल्यावर यशवंताच्या नावाने अंघोळ करूनच त्या घरात आल्या. पुन्हा कधीही यशवंताला त्या घरात प्रवेश मिळाला नाही. केवढे धाडस म्हणायचे हे ! आपल्या परमार्थासाठी, नैतिकतेसाठी अडसर झालेल्या पोटच्या पोरालाही असे क्षणात, मनावर माया-मोहाचा तरंगही न उठू देता दूर करणे हे एक आई म्हणून फार फार अवघड आहे. आपण त्याचा साधा विचारही करू शकणार नाही. त्यासाठी खरोखरीच अत्यंत अद्भुत अधिकार आणि आपल्या ध्येयाविषयी तीव्र तळमळ हवी. असा विलक्षण पारमार्थिक अधिकार होता मातुःश्रींचा ! "देव मिळवायचे तर संसारातल्या कुठल्याही पाशात अगर कुठल्याही वाईट गोष्टीत अडकून राहायचे नाही", हा एक फार महत्त्वाचा धडा मामा त्यादिवशी शिकले.

*पू.मामांचा लौकिक संसार*

प.पू.मातुःश्रींनी आपल्या नात्यातीलच बबी बोपर्डीकरशी प.पू.श्री.मामांचा विवाह करून दिला होता. सौ.इंदिरा बनून बबी मातु:श्रींच्या घरात प्रवेशली. परंतु नियती वेगळीच होती. सौ.इंदिरा आपल्या नवजात पुत्रासह पहिल्या बाळंतपणातच निवर्तली. मामांची वृत्ती मुळातच वैराग्यपूर्ण असल्याने त्यांना संन्यास घेण्याची तीव्र इच्छा होऊ लागली. त्यावर पू.मातु:श्रींनी त्यांची समजूत घातली की, "तुझ्या प्रारब्धात संन्यास नाही, तुला लग्न करायला हवे. पुढे तुला एक मुलगा होईल." त्याप्रमाणे त्यांनी ओळखीच्याच आपटीकर यांच्या शांताशी पू.मामांचे दुसरे लग्न ठरवले देखील. तिची पत्रिका पाहिल्यावर मामा म्हणाले, "आई, ही पण अल्पायुषी आहे." मातुःश्री म्हणाल्या, " माहीत आहे, पण मी आता शब्द दिलाय. तुला लग्न करावेच लागेल." या चर्चेच्या दुस-याच दिवशी मातु:श्रींनी देहत्याग केला.
मातुःश्रींच्या देहावसानानंतर लगेचच प.पू.श्री.मामांचा द्वितीय विवाह झाला. पण तोही अल्पकाळच टिकला. द्वितीय पत्नी देखील बाळंतपणातच अपत्यासह निवर्तली. प्रथेप्रमाणे रुईच्या झाडाशी तिसरा विवाह होऊन बाळेकुंद्रीच्या रंगराव हुद्दारांच्या शकुंतलाशी पू.मामांचा चाैथा विवाह झाला. शकुंतलाची सौ.लक्ष्मी झाली. यांची प.पू.श्री.मामांवर प्रचंड भक्ती होती. दोन वर्षांच्या संसारात त्यांना एक पुत्र झाला. त्यानंतर मंगळागौरीचे खेळ खेळताना पडून सौ.लक्ष्मी यांचे कंबरेचे हाड मोडले. त्यांनी अंथरुण धरले. त्या आजारपणात प.पू.श्री.मामा आपल्या पत्नीची मनापासून सेवा करीत असत. त्यासाठी त्यांनी आपला व्यवसायही बंद केला. त्यांना शिवलीलामृत आवडते म्हणून ते वाचून दाखवीत. पू.मामांनी त्यांना, "भगवंतांचे स्मरण करीत जावे ", असे सांगितले की त्या म्हणत, "माझा देव माझ्या नित्यपूजनात आहे." पण त्यांनी त्यांच्या देवाचा फोटो कधीच मामांना दाखविला नाही. त्या आजारपणातच त्यांचा अंत झाला. आपल्या पतीच्या मांडीवर डोके ठेवून, पतिमुखी दृष्टी ठेवून अहेवपणी जाण्याचे दुर्लभ भाग्य त्यांना लाभले. त्या गेल्यावर उत्सुकतेने प.पू.श्री.मामांनी त्यांच्या उशाजवळचा फोटो पाहिला तर तो मामांचाच होता. इतक्या त्या थोर पतिव्रता होत्या. सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे प.पू.श्री.मामांच्याही नित्याच्या पूजेत शेवटपर्यंत सौ.लक्ष्मी यांचा एक छोटा फोटो होता. पती-पत्नीच्या इतक्या भावोत्कट आणि अलौकिक प्रेमनात्याचे दुसरे उदाहरण क्वचितच सापडेल ! म्हणतात ना, भक्त जेवढे देवांवर प्रेम करतो त्याच्या कैकपटींनी देव भक्तावर प्रेम करतात. देवच खरे भक्त असतात, हेच या भावपूर्ण गोष्टीतून पाहायला मिळते.
वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी प.पू.श्री.मामांचा लौकिक संसार संपला. सौ.लक्ष्मी यांनी आपल्या लहानग्याला, श्रीनिवासला मृत्यूपूर्वीच आपल्या भावजयीच्या हवाली केले होते. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने १५ जून १९४८ रोजी प.पू.श्री.मामांनी गृहत्याग केला. त्यावर्षीची आषाढी वारी झाल्यावर लगेचच बनेश्वर स्थानी त्यांनी पहिले श्रावण अनुष्ठान केले. तेथे त्यांना एका महासिद्धांचे दर्शन लाभले.
१९३६ पासूनच प.पू.श्री.मामांनी पंढरीची वारी करण्यास मातृआज्ञेने सुरुवात केलेली होती. पहिली १२ वर्षे अत्यंत खडतर अशी ' पडशीची वारी ' झाली. १९४८ नंतर त्यांनी ह.भ.प.केशवराव देशमुख महाराजांच्या दिंडीतून जाण्यास सुरुवात केली. १९८० पर्यंत या दिंडीतून व त्यानंतर शेवटपर्यंत पुढे स्वतंत्रपणे ते वारी करीत होते.
बनेश्वरचे अनुष्ठान झाल्यावर प.पू.श्री.मामा राजकोट येथे राहावयास गेले. तेथे सौराष्ट्र परिवहन खात्यामध्ये त्यांनी नोकरी धरली. राजकोट येथील कैवल्यधाम योगाश्रमाच्या शाखेतील स्वामी दिगंबरजींबरोबर त्यांचे स्नेहबंध जुळले आणि त्यांच्या विनंतीवरून ते योगाश्रमातच राहावयास गेले. स्वामी दिगंबरजींनी त्यांना हठयोगाच्या अनेक क्रिया शिकवल्या. ७२ तासांपर्यंत मातीमध्ये स्वतःला पुरून घेऊन राहण्याची विद्या पू.मामांना साधली होती. तसेच पूर्वजन्मीच्या जलसंकर्षिणी, प्राणसंकर्षिणी इत्यादी अनेक अद्भुत विद्याही त्यांच्याठायी आपोआप प्रकटल्या. दिगंबरजींबरोबर अनेकदा हिमालय यात्राही झाल्या. गिरनारची वारीही त्याच सुमारास सुरू झाली. प.पू.श्री.मामांनी आपल्या आयुष्यात एकूण सहा वेळा हिमालय, दोन वेळा अमरनाथ, एकवीस वेळा गिरनार, पाच वेळा रामेश्वर; द्वारका, कुरवपूर इत्यादी अनेकवेळा, एकदा मानससरोवर, तुंगनाथ, पायी नर्मदा परिक्रमा इत्यादी यात्रा, पंढरीची वारी सलग ५३ वर्षे, इतक्या तीर्थयात्रा केल्या. नुसती यादी वाचूनच आपण आश्चर्याने थक्क होतो. त्यांचे असे वैशिष्ट्य पू.शिरीषदादा सांगतात की, भारतात असे एकही तीर्थक्षेत्र नाही जेथे मामा गेलेले नाहीत. त्यांना त्या सर्व तीर्थांचे पौराणिक व आध्यात्मिक माहात्म्य पुरेपूर माहीत असे. तेथील लोकांना ते वैयक्तिक ओळखतही असत.
https://www.facebook.com/sadgurubodh/
प.पू.श्री.मामांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास प.पू.मातुःश्रींच्या मार्गदर्शनानुसार सुरू होताच. विष्णुप्रयागला झालेल्या भगवान श्री माउलींच्या विष्णुरूपातील दिव्य दर्शनानंतर त्यांना ज्ञानेश्वरीचे गूढ अर्थही आपोआपच उलगडू लागले. परंतु त्यांचा अभ्यास स्वांतःसुखायच होता. १९५३ च्या रामनवमीच्या दिवशी मात्र एका विलक्षण घटनेने त्यांनी पहिल्यांदा प्रवचनसेवा केली. राजकोटच्या राममंदिरात कैवल्यधामाच्या वतीने प्रवचनसेवा असे. पण त्यावर्षी ठरलेले प्रवचनकार येऊ न शकल्याने मामांनाच सेवा करावी लागली. त्यांच्या अद्भुत विवरणशैलीमुळे लोकांना त्यांचे ते पहिलेवहिले प्रवचन खूप भावले आणि आयुष्यभराच्या एका प्रबोधनलीलेचा शुभारंभ झाला. आपल्या हयातीत प.पू.श्री.मामांनी अक्षरशः हजारो प्रवचने केली. त्यांनीच स्थापन केलेल्या ' श्रीवामनराज प्रकाशन ' या संस्थेने त्यांच्या प्रवचनांवर आधारित अनेक ग्रंथ प्रकाशित केलेले असून ते अभ्यासकांनी वाखाणलेलेही आहेत. जवळपास चार हजार पृष्ठांचे अपूर्व असे पू.मामांचे वाङ्मय आजवर प्रसिद्ध झालेले आहे. त्यातून प्रकट होणारे पूू.मामांचे संतवाङ्मयाचे सखोल व अभिनव चिंतन खरोखरीच विलक्षण आहे. माउलींच्या कृपेने त्यांची ऋतंभरा प्रज्ञा जागृत झालेली होती आणि म्हणूनच संतांच्या शब्दांचे अचूक मर्म ते नेमके सांगू शकत असत.
प.पू.मातुःश्री पार्वतीदेवींनी सांगितल्याप्रमाणे प.पू.श्री.मामांचे तीव्रतम तप चालू होते. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने आणि नित्य कृपाछत्राने पू. मामांचा साधना पारिजात पूर्ण बहरला होता. जोडीने ज्ञानेश्वरीचे चिंतनही चालू होतेच. आता मामांना तळमळ लागली होती ती मंत्रप्रदात्या सद्गुरूंच्या भेटीची. मातु:श्रींनी भाकित केलेला बारा वर्षांचा काळही आता संपत आला होता. त्यामुळे ती तळमळही दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. त्यातच १९५४ साल उजाडले. पू.मामा नेहमीप्रमाणे राजकोटहून आळंदीला येऊन आषाढी वारीत सामील झाले. आषाढी एकादशीला वारी पूर्ण झाली. त्यावेळी एक अद्भुत घटना त्यांची वाट पाहात होती. पू.मामांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ती घटना आपण उद्या पाहू.
( क्रमश: )
( प.पू.श्री.मामांचे प्रासादिक वाङ्मय ३०% सवलतीत मिळविण्यासाठी संपर्क क्रमांक - 
श्रीवामनराज प्रकाशन, पुणे - 020-24356919 )
*लेखक : रोहन विजय उपळेकर*
*भ्रमणभाष : 8888904481*

Read More

8 March 2018

*** *झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म* ***

*** *चतुर्थ उन्मेष* ***

( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )

*काळरात्रीच्या गर्भगृहात*

देशपांडे कुटुंबात सर्वकाही छान चालू होते. पू.मामांचा धाकटा भाऊ यशवंताही मोठा होऊ लागला होता. नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर दत्तूअण्णा जरा गंभीरच असत. ते आपल्याच आनंदात रममाण होऊन बसलेले असत. त्यांना आता पैलतीराची ओढ लागलेली होती. ६ मे १९२८ रोजी पू. दत्तूअण्णांनी श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने योगमार्गाने देह ठेवला. दत्तूअण्णांचे दिवसपाणी झाल्याबरोबर, त्यांचे दत्तक गेलेले थोरले भाऊ सीताराम काका यांनी मातुःश्री पार्वतीदेवी व मामांना सगळ्या संपत्तीतून बेदखल करीत नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढले. जानकीबाईंनी वाटण्या केलेल्या होत्या ख-या, पण दुर्दैवाने कागदोपत्री नाव मोठ्या मुलाचेच राहून गेले होते. त्याचा सीतारामकाकांनी फायदा घेतला. याही प्रसंगी मातुःश्री कमालीच्या शांत राहिल्या. जशी हरीची इच्छा म्हणून ही साध्वी कसलाही त्रागा न करता घराबाहेर पडली. संतांच्या ठायी परमार्थ किती मुरलेला असतो, याचे जिवंत उदाहरणच होत्या पू.मातु:श्री पार्वतीबाई.
पू.पार्वतीबाईंचे बंधू पू.नरहरीमामा सोनटक्के त्यांना पुण्याला घेऊन आले. मंडई जवळच्या रानडे वाड्यात खोली भाड्याने घेऊन पू.पार्वतीदेवी व मामा राहू लागले. इतक्या भयंकर परिस्थितीतही, देव व सद्गुरूंच्या कृपेने, त्यांच्याच स्मरणात पराकोटीची शांती बाळगून अखंड कार्यरत असणा-या आपल्या मातुःश्रींच्या वर्तन व विचारांचा फार मोठा संस्कार पू.मामांच्या अंतःकरणावर कायमचा कोरून ठेवला गेला होता.
श्री.दत्तूअण्णांच्या अकाली निधनाने परिस्थिती एकदम बदलून गेली. मामांचे थोरले बंधू गोविंदराव यांची वृत्ती आधीपासूनच अलिप्त होती. या सर्व गोंधळात त्यांची पत्नी राधा प्रसूत झाली आणि राधाचे वडील अचानक निवर्तले. नातू आजोबांच्या मुळावर आला म्हणून ओल्या बाळंतिणीला त्यांनी देशपांड्यांकडे पाठवून दिले. त्यातच काकांचे हे असे वागणे. राधाला या सर्व घटनांचा इतका धसका बसला की तिने अंथरुण धरले आणि त्यातून ती सावरलीच नाही. लहान पोर शंभूला मागे ठेवून राधा गेली. गोविंदरावांनी घर सोडले व ते संन्यास घेण्यासाठी निघून गेले.
पू.श्री.दत्तूअण्णांनी मामांचे पुण्याच्या भारत इंग्लिश स्कूल मध्ये नाव घातलेले होते. शिक्षण सुरू झाले नाही तोच अण्णा गेले. त्यामुळे मामांना शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाच्या भरण-पोषणाची जबाबदारी इतक्या लहान वयात अंगीकारावी लागली. वर्तमानपत्रे वाटणे, साबण-तेल इत्यादी विकणे, शिकवण्या घेणे असे उपक्रम मग सुरू झाले. पुढे एका छापखान्यात लहानशी नोकरी लागली. पण संकटे कधी एकटी येत नाहीत. त्या छापखान्यात प.पू.श्री.मामांना शिशाचे खिळे वापरताना लेड पॉयझनिंग झाले. ४२ दिवस मातुःश्रींनी त्यांना पूर्णपणे दुधावर ठेवले होते आणि आपल्या वैद्यकीय कौशल्यावर त्या जीवघेण्या विषबाधेतून सुखरूप बाहेर काढले.
त्यासुमारास स्वातंत्र्य चळवळ जोरात चालू होती. भैरवनाथ तालमीचे क्रमांक दोनचे कुस्तीपटू असणारे देव-देशाभिमानी पू.मामा या चळवळीत सहभागी झाले. असहकार, चले जाव, स्वदेशी, सविनय कायदेभंग इत्यादी सर्व चळवळींमध्ये पू.मामा पुढाकाराने कार्यरत होते. १९३० साली एका मोर्च्याचे नेतृत्व करीत असताना प.पू.श्री.मामांनी पुण्याच्या बुधवार चौकात, हॅमंड नावाच्या अधिका-याने मारलेली गोळी उंच उडी मारून सहज चुकविली होती. त्यावेळच्या केसरी आदी वृत्तपत्रांनी त्यांच्यावर लेख छापून कौतुकाचा वर्षाव केला होता.
घरची परिस्थिती ओढाताणीची असूनही प.पू.श्री.मामांचा सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भरपूर सहभाग असे.
प.पू.श्री.मामा हे अतिशय उत्तम नट आणि दिग्दर्शक होते. कथेचे मर्म अचूक जाणून ते नटांना मार्गदर्शन करीत. त्यांनी त्यावेळी दिग्दर्शित केलेली १८ नाटके रंगभूमीवर गाजलेली होती. त्यावेळचे प्रसिद्ध नट त्यांच्या नाटकांमधून कामे करीत. नटवर्य बालगंधर्वांशी देखील पू. मामांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अनेक नाटकांचे मुहूर्त पू.मामांनीच काढून दिलेले होते. पू.मामांनी लिहिलेले भगवान श्री माउलींच्या जीवनावरील " चैतन्यचक्रवर्ती " हे संगीत नाटक त्यांच्या नाट्यक्षेत्रातील व्यासंगाचे दर्शन घडवते.
पू.मातुःश्री पार्वतीदेवींचे मामांच्या जडणघडणीकडे बारीक लक्ष होतेच. ते सामाजिक कार्यात मग्न असले तरी रोजचे साधन, नित्यनेम व्यवस्थित आणि वाढत्या प्रमाणात होत आहे ना, याकडे मातुःश्री लक्ष देत. मूळचाच अधिकार अलौकिक असल्याने प.पू.श्री.मामांचे आध्यात्मिक अनुभवही फार उत्तम दर्जाचे होते.
विविध छोट्या मोठ्या नोक-या करीत करीत शेवटी प.पू.श्री.मामा खडकीच्या अॅम्युनेशन फॅक्टरीत कामाला लागले. त्यावेळी त्यांना मातुःश्रींनी ज्ञानेश्वरीची गोडी लावलेली होती. त्यांनी कसून अभ्यासाला सुरुवात केली. फॅक्टरीत जाता-येता सायकलच्या हँडलला लावलेल्या पॅडवर लिहिलेल्या श्री ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे त्यांचे चिंतन चालू असे. वर्षभरात त्यांचे असे चिंतनाचे एक पारायण पूर्ण होई. मातु:श्रींनी त्यांना सांगून ठेवले होते की, पुढे तुला माउलींचे दर्शन होईल आणि त्यानंतर भविष्याची (ज्योतिषाची) स्फूर्ती मावळून ज्ञानेश्वरीचे गूढ अर्थ उलगडू लागतील. तरुणपणीच पू.मामा चेहरा पाहताच माणसाची अचूक पत्रिका मांडण्यापर्यंत ज्योतिषशास्त्रात तरबेज झालेले होते. मातुःश्रींनी त्यांना जेवढ्या जेवढ्या विद्या दिल्या, त्या सर्वांचे नीती-नियमही समजावून सांगितलेले होते. ज्योतिष व औषधांच्या बदल्यात कोणाकडूनही कसलाही मोबदला घ्यायचा नाही, हा मातु:श्रींचा कडक दंडक ते तंतोतंत पाळत असत. शास्त्रशुद्ध आचरण, निरपेक्ष वृत्ती, भगवद् भक्ती आणि भगवत्प्रसाद, तपाने शुद्ध झालेली बुद्धी-वाणी या सर्वांमुळे प.पू.श्री.मामा, वैद्यकी, ज्योतिष, मंत्रशास्त्र इत्यादी सर्व विद्यांमध्ये अल्पकाळातच अद्भुत अधिकारसंपन्न झालेेले होते. पू.पार्वतीबाईंनी कृपापूर्वक दिलेल्या नाममंत्राच्या जपाने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी, १९३२ साली त्यांना भगवान श्रीपांडुरंगांचा सगुण साक्षात्कारही झालेला होता. पुढे १९३६ साली भाऊबीजेच्या दिवशी पंढरपूरला ते पहिल्यांदा दर्शनाला गेले, तेव्हा आधी झालेल्या सगुण दर्शनासारखेच दर्शन त्यांना प्रत्यक्षात लाभले. त्यानंतर मातु:श्रींच्या आज्ञेने त्यांनी पंढरीच्या आषाढी वारीला जायला सुरुवात केली व आजन्म ते व्रत मोठ्या प्रेमादराने पाळले

*मातुःश्रींकडून कृपानुग्रह*

उत्तम गुरु हे शिष्याचा अधिकार जोखूनच कृपा करीत असतात. प.पू.श्री.मामांच्या बाबतीत मातुःश्रींनी अजिबात हयगय केलेली नव्हती. त्यांनी अत्यंत निगुतीने, पूर्ण विचारपूर्वक पू.मामारूपी हि-याला अद्भुत पैलू पाडलेले होते. दासबोध, एकनाथी भागवत यांचा क्रमाने अभ्यास पूर्ण होऊन आता ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास चालू झालेला होता.
प.पू.श्री.मामांची पारमार्थिक तयारी पाहून, श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने, मार्गशीर्ष शु.अष्टमी, दि.२६ नोव्हेंबर १९४१ रोजी पहाटे मातु:श्रींनी प.पू.मामांना, श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेने आलेला दिव्य शक्तिपात अनुग्रह केला व त्याचवेळी परंपरेचे उत्तराधिकारही प्रदान केले. बारा वर्षे तीव्र साधना करण्याची आज्ञाही त्यावेळी केली होती. अनुग्रहानंतर जवळ जवळ ५ तास प.पू.श्री.मामा प्रगाढ समाधी अवस्थेत होते. समाधीतून उठल्यावर त्यांनी मातुःश्रींच्या श्रीचरणांवर दंडवत घातला. जन्मदाती आईच प्रत्यक्ष मोक्षप्रदाती गुरु असण्याचा दुर्मिळ आणि विशेष योग पू.मामांच्या बाबतीत घडला. प.पू.श्री.मामा देखील आजन्म आपल्या सद्गुरुमातेच्या अनुसंधानात, सेवाऋणातच राहिले.
अनुग्रहानंतर मातुःश्रींनी पू.मामांना सांगितले, "सख्या, तू जरी आता शक्तिसंपन्न झालेला असलास, तरी ही परंपरा चालविण्यासाठी मंत्रही हवा. हा मंत्र मी स्त्री असल्याने तुला देऊ शकत नाही. आजपासून बरोबर बारा वर्षांनी याप्रकारचा दिव्य अनुभव तुला एका थोर सत्पुरुषांकडून पुन्हा प्राप्त होईल. तेच तुझे मंत्रगुरु असतील." प.पू.श्री.मामांना मातुःश्रींच्या या भाकिताची प्रचिती पुढे आली.
प.पू.श्री.मामा हे स्वानुभवानेच विश्वास ठेवणारे होते. मातुःश्रींनी देखील प्रत्येकवेळी त्यांना सर्व गोष्टी स्वानुभवानेच पटवून दिल्या. प्रत्येक प्रक्रिया, अध्यात्माचे सिद्धांत त्यांनी मामांना अनुभव देऊन पटवून दिले. ज्या दिवशी त्यांनी मामांना अनुग्रह केला त्याच रात्री त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. ही लीला अत्यंत अद्भुतच होती.
२६ नोव्हेंबर १९४१ च्या रात्री मातुःश्रींनी मामांना जवळ बोलावले आणि सांगितले, "सख्या, भगवंतांनी गीतेच्या आठव्या अध्यायात योगी देह कसा ठेवतात ते सांगितले आहे, मी ते तुला प्रत्यक्ष दाखवते, पाहा." असे म्हणून त्या आसनावर बसल्या व आपल्या श्रीसद्गुरुनाथांचे स्मरण करून, ऊर्ध्व लावून त्यांनी आपले प्राण देहातून बाहेर काढून परमात्म्यात विलीन केले; आपल्या लाडक्या मुलाच्या देखत ! माउली म्हणतात तसा, घंटेचा नाद घंटेतच विलीन व्हावा, तशा मातु:श्री परब्रह्मामध्ये विलीन झाल्या. मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी झालेला हा देहत्यागाचा अपूर्व सोहळा प.पू.श्री.मामा आश्चर्याने पाहत होते. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, "आपली आई गेली." आयुष्यभर प्रचंड संकटांना धीरोदात्तपणे सामोरी गेलेली, प्रत्येक प्राप्त परिस्थितीत, "जशी हरीची इच्छा", म्हणत आपले अनुसंधान, साधन अखंड ठेवणारी, अत्यंत प्रेमळ, दयाळू तरीही कणखर व खंबीर अशी, आपला परमादर्श असणारी आपली आई, आपली सद्गुरु आता लौकिक अर्थाने आपल्याला कायमची सोडून गेली, याचे पू.मामांना अतीव दुःख झाले.
पू.दत्तूअण्णांच्या देहत्यागानंतर आपल्या आयुष्याची शेवटची बारा वर्षे मातुःश्रींनी क्षणभर देखील जमिनीला पाठ लावली नव्हती. त्या रात्रीसुद्धा अखंड ध्यानाला बसलेल्या असत किंवा नामस्मरणात फे-या मारत असत. प.पू.श्री.मामांनीच त्यांनी देह ठेवल्यानंतर बारा वर्षांनी पहिल्यांदा त्यांची पाठ जमिनीला टेकवली. आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजून लोकांच्या उपयोगी पडलेल्या या थोर विभूतीची अंत्ययात्रा ज्या ज्या मार्गाने गेली, तो सर्व मार्ग अलौकिक चंदन सुगंधाने भरून गेला. शिवाय त्यांची चिता पेटल्यावर ओंकारेश्वरचे श्मशानही दिव्य चंदनगंधाने भरून गेले. पू.मातु:श्री पार्वतीदेवींच्या अद्भुत आध्यात्मिक अधिकाराची याहून मोठी खूण काय असणार?
प.पू.मातुःश्री पार्वतीदेवींना राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांनी स्वमुखाने "माझी पोर" म्हणून कृपाप्रसाद केलेला होता, यातच त्यांचा जगावेगळा अधिकार दिसून येतो. त्यांच्या विविध पैलूंवर लिहायचे म्हटले तर ग्रंथच्या ग्रंथ तयार होतील इतके त्यांचे विभूतिमत्त्व अगाध आहे. पू.मामांच्या मानसकन्या प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी "श्रीस्वामीतनया" नावाने पू.मातु:श्रींची चरित्रगाथा लिहिलेली आहे. कोणत्याही परंपरेतील साधकाच्या साधना-प्रवासातील फार मोलाचा, मार्गदर्शक-प्रेरक ठरेल असा हा मंत्रमय ग्रंथ नि:संशय अद्भुत आहे.
पू.पार्वतीबाईंनी आपले सर्वस्व ओतून पू.मामांना अक्षरश: घडवले, हे खरेतर तुम्हां आम्हां सर्वांवर त्यांनी फार मोठे उपकारच करून ठेवलेले आहेत. म्हणूनच, सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवींच्या श्रीचरणीं दंडवत घालून त्यांची कृपा भाकणे, हे आपल्या पारमार्थिक प्रगतीसाठी फारच उपयुक्त असल्याने, तेच आता आपण मनोभावे करूया. महासिद्धांच्याही मार्गदर्शक असणा-या पू.पार्वतीदेवींचे काही विशेष प्रसंग उद्याच्या भागात आपण आवर्जून पाहणार आहोत.
( क्रमश: )
( फेसबुक पेज :
https://www.facebook.com/sadgurubodh/ )
*लेखक : रोहन विजय उपळेकर*
*भ्रमणभाष : 8888904481*

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates