Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

30 November 2016

॥ अमृतबोध ॥ ३० नोव्हेंबर २०१६

॥ अमृतबोध ॥
३० नोव्हेंबर २०१६
साधना सातत्याने जो करतो तोच साधक होय. साधना नुसती मिळून चालत नाही, त्याची पण काही आवश्यक अंगे असतात, ती नीट पाळली गेली तरच साधना पूर्णत्वास जाते. याविषयी फारच सुंदर शब्दांमध्ये मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " नुसते नोकरी लागून चालत नाही; तर तेथे वेळच्या वेळी हजर होणे, काम चोख करणे, त्यात प्रामाणिकपणा असणे हेही आवश्यक असते. साधना करताना देखील या सर्व गोष्टी अंतर्बाह्य आवश्यक असतात. "
साधनेसाठी लौकिकातले नोकरीचे उदाहरण प. पू. मामा देतात. नोकरी नुसती लागून भागत नाही, तर तेथे वेळच्या वेळी जावे लागते, प्रामाणिकपणे व चोख कामही करावे लागते. तसेच साधनाही जशी श्रीगुरूंनी सांगितलेली आहे अगदी तशीच, वेळच्या वेळी व चोखपणे व्हायला हवी.
पू. मामा येथे एक फार महत्त्वाचा शब्द वापरतात. साधनेतला हा चोखपणा ' अंतर्बाह्य ' हवा असे ते आवर्जून सांगतात. म्हणजे आपली साधना लोकांना दाखविण्यापुरती, केवळ दांभिकपणे व्हायला नको. त्यातला प्रामाणिकपणा हा अात बाहेर एकच हवा. कारण अनुग्रहाच्या रूपाने आपले श्रीसद्गुरु आपल्या हृदयातच विराजमान झालेले असतात. आपण त्यांना तर कधीच फसवू शकत नाही, ते आपले श्वास न् श्वास जाणतात. म्हणूनच पू. मामा म्हणतात तसा साधनेचा प्रामाणिकपणा, चोखपणा अंतर्बाह्य हवा म्हणजे मग साधनेतून खरा आनंद अपरंपार लाभतो !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

29 November 2016

॥ अमृतबोध ॥ २९ नोव्हेंबर २०१६

॥ अमृतबोध ॥
२९ नोव्हेंबर २०१६
सत्य एक असताना दुसरे खोटेच काहीतरी सत्य म्हणून समोर ठेवणे म्हणजे दंभ होय. हा अनेक प्रकारांनी आपल्या सतत समोर येतच असतो. कधी कधी आपणही दंभाने वागतो तर कधी समोरचा वागत असतो.
या दंभाचा एक आयाम सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " दंभ या दोषाने अनेकांचे वाटोळे केलेले आहे. दंभी मनुष्य परमार्थाकरिता 'कुपात्र' ठरतो. "
" मला हे माहीत आहे, मला विचारा मी सांगतो ", असे जो म्हणतो त्याला दंभ असतो, हे पक्के समजावे. तो नक्की फसवणार; असेही पू. मामा सांगून ठेवतात. आपण साधक म्हणून चुकूनही या दंभाच्या नादी लागता कामा नये. आपल्या मनात असा कोणताही दंभ येऊ नये, म्हणून खूप काळजीपूर्वक श्रीगुरूंच्या चरणीं शरण जाऊन साधना करीत राहिले पाहिजे. कारण हा दंभ आला की, पू. मामांच्या या अमृतबोधानुसार, आपण साधनेसाठी कुपात्र ठरू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 November 2016

॥ अमृतबोध ॥ २८ नोव्हेंबर २०१६

श्रीभगवंत अपरंपार दयाळू आहेत यात शंकाच नाही. त्यांच्या अहेतुकदयेला ना अंत ना पार. पण ते दया कोणावर करतात? हे देखील आपण पाहिले पाहिजे.
या प्रश्नाचे नेमके व परखड तरीही अतिशय सुंदर उत्तर देताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीहरी दयाळू आहेत; पण जो नुसता वाचाळ, बोलघेवडा आहे त्याला ते पावत नाहीत. सद्गुरूंनी कृपा केल्यावर त्याने अभ्यासही केला पाहिजे. "
' असेल हरी तर देईल खाटल्यावरी ', हे ते चुकूनही करत नाहीत. जो नुसत्या गप्पा मारतो व केवळ बोलघेवडा आहे, पण स्वत: प्रयत्न करत नाही की कष्ट करत नाही, त्याला श्रीभगवंत कधीच पावत नाहीत. श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक साधना दिली म्हणजे सगळे झाले, असे मानणे हा वेडेपणाच आहे. श्रीगुरुकृपा झाल्यानंतर जर झटून साधना घडली नाही; तर मग काय उपयोग? मात्र जो प्रेमाने व नेमाने साधना करतो, त्याचा श्रीभगवंत आणि श्रीसद्गुरु सर्व बाजूंनी प्रतिपाळ करतात व त्याच्या परमार्थाबरोबरच आवश्यक तेवढा संसारही सांभाळून त्याला समाधान देतात ! म्हणूनच प. पू. श्री. मामांचे सांगणे फार महत्त्वाचे आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 November 2016

॥ अमृतबोध ॥२७ नोव्हेंबर २०१६

आज भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी दिन !
भगवान श्री माउली हे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे हृदय अधिष्ठातेच होते. माउली हे मामांचा प्राणच होते. त्यांनी निरंतर माउलींच्या दिव्य सारस्वताचे मनन चिंतन केले. अगदी झोपेतही त्यांचे हे चिंतन अखंड चालत असे. श्री माउलींच्या परमकृपेने प. पू. मामांच्या हृदयात माउलींच्या शांतशीतल कृपाचंद्रम्याची पूर्ण पौर्णिमा बहराला आलेली होती. त्यामुळेच प. पू. श्री. मामा श्री माउलींच्या शब्दांचे आजवर कधीही न ऐकलेले पाहिलेले असे अभिनव अर्थ सांगत असत.
भगवान श्री माउलींच्या पावन सारस्वताचे सार सांगताना, माउलींविषयीच्या अतीव प्रेमादराने प. पू. श्री. मामा म्हणतात, " श्री माउलींनी आपल्या ग्रंथ व अभंगांद्वारे ज्ञानामृताचा प्रचंड सागरच कृपावंत होऊन निर्मिलेला आहे. त्या ज्ञानभांडाराचे साररूप म्हणजे ' श्रीहरिपाठ ' ! "
आज भगवान सद्गुरु श्री माउलींच्या संजीवन समाधी दिनी, त्यांचेच अपर स्वरूप असणा-या, श्रीज्ञानेश्वरी, श्रीअनुभवामृत, श्रीचांगदेव पासष्टी व श्रीहरिपाठादी अभंग स्वरूपातील त्यांच्या दिव्य संजीवक वाङ्मय-श्रीमूर्तीला साष्टांग दंडवत घालून अमृत-कृपेची याचना करूया !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

26 November 2016

॥ अमृतबोध ॥२६ नोव्हेंबर २०१६

भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, काचेच्या बरणीत ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश जसा बाहेर पसरतो, तसे जे अंतरात वसते तेच बाहेर फाकते. आपल्या मनाचे प्रतिबिंब आपल्या वर्तनात दिसून येत असते. आत एक बाहेर एक, हा सर्वच मनुष्यांचा स्वभाव जरी असला, तरीही आपल्या मनातील गोष्टींचे काही ना काही भाग आपल्या वागण्यात दिसतातच.
जे आत तेच बाहेर, हा मात्र संतांचा स्थायीभाव असतो. त्यांचे वैशिष्ट्य सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " संतांच्या हृदयात जे असते तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडते ; मग ते भगवंतांशिवाय आणि सद्गुरूंशिवाय बोलणार तरी काय?
संतांच्या हृदयात त्यांचे आराध्य दैवत असणारे श्रीभगवंत आणि त्यांच्याहून भिन्न नसणारे श्रीसद्गुरूच नित्य विराजमान असतात. म्हणून मग त्यांच्या बोलण्यातूनही त्या परमप्रिय आराध्यांशिवाय दुसरे येणार तरी काय? म्हणून संत सतत त्यांच्याविषयीच बोलतात.
प. पू. श्री. मामा येथे तुम्हां आम्हां साधकांना निज-कर्तव्याचा बोधच करून देत आहेत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

25 November 2016

॥ अमृतबोध ॥२५ नोव्हेंबर २०१६

ज्ञान आणि माहिती यात खूप गल्लत केली जाते. संतांना अभिप्रेत असणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञानच, आपल्या स्वरूपाचे ज्ञान. आणि आपल्याला शाळा, जुने जाणते लोक, सोशल मिडिया इत्यादी एकूणएक स्तरांवरून मिळणारे ज्ञान हे ज्ञान नसून ती माहिती आहे. ज्ञान हे शिकवून किंवा बाहेरून कधीच येत नसते, ते आतूनच स्वयंभ प्रकट होत असते !
ज्ञान हा परब्रह्माचा विशेष गुण असून, प्रत्येक जीवाचेही तेच मूळचे स्वरूप आहे. परब्रह्मावर वासनांचे आवरण आले की त्यालाच ' जीव ' असे म्हणतात. म्हणून त्या वासनांची शुद्धी झाल्याशिवाय मूळचे ज्ञान कधीच प्रकट होत नाही; आणि वासनांची शुद्धी होण्यासाठी साधना हाच एकमात्र मार्ग आहे. साधनेचे महत्त्व यथार्थपणे सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " पूर्ण ज्ञान हे वासनाशुद्धीशिवाय होत नाही. म्हणून त्यासाठी साधनेची आवश्यकता आहे ! "
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

24 November 2016

॥ अमृतबोध ॥ २४ नोव्हेंबर २०१६

साधकाची साधना ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. श्रीगुरूंची कृपा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असली, तरी अजूनही काही गोष्टी असतात. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " साधना ही पूर्वजन्मातल्या तयारीप्रमाणेच, कर्मांप्रमाणेच होत असते. म्हणूनच ती सोडूनही चालणार नाही. "
आपला पूर्वजन्मी जो काही साधनाभ्यास झालेला आहे, त्यानुसारच या जन्मी साधना घडते. पूर्वीच्या पुण्याने किंवा कर्माने साधना जेथवर आलेली असेल, तेथूनच पुढे या जन्मी श्रीगुरुकृपा होऊन साधना सुरू होत असते.
यासाठी पू. मामा फार सुंदर उदाहरण देतात. कापूर, शेणाची गोवरी व ओल्या शेणाचा गोळा या तीन पदार्थांचे ज्वलन कसे होते पाहा. कापूर काडी लागल्याबरोबर पेटतो. गोवरी थोडी धुमसून मग पेटते. तर शेणाचा गोळा आधी वाळावा लागतो, मग तो पेट घेतो. तसे, ज्याचे जेवढे साधन पूर्वी झालेले आहे, त्याला या जन्मी त्यानुसार लवकर किंवा उशीरा अनुभूती येते. पण पूर्वीचे गाठीशी आहे म्हणून या जन्मी साधनेचा कंटाळा करून चालत नाही. ती करावीच लागते. पू. मामा आवर्जून सांगत असत, " देहाची तीन चिमट्या राख होईपर्यंत साधना झालीच पाहिजे ! " त्यांनी स्वत: देखील हे सांगणे शेवटच्या क्षणपर्यंत पाळून आपल्यासमोर मोठा आदर्श घालून दिलेला आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 November 2016

॥ अमृतबोध ॥२३ नोव्हेंबर २०१६

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज साधकांना साधनेची अत्यंत आवश्यक सूचना देताना म्हणतात, " साधना ही श्रीगुरूंनी दाखविलेल्या युक्तीनेच करावी लागते. " साधनेच्या प्रांतात या 'युक्ती'ला अतिशय महत्त्व असते. भगवान श्री माउली पण श्रीज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात या युक्तीचे गुणगान गातात.
युक्ती कशी असते? हे समजावून सांगण्यासाठी प. पू. श्री. मामा अजून एक उदाहरण देतात. पूर्वी घरोघरी दही घुसळून लोणी काढत असत. ही दही घुसळण्याची प्रक्रिया सोपी नाही, त्यात खूप युक्त्या वापराव्या लागतात. थंडीत ताकात गरम पाणी घालावे लागते तर उन्हाळ्यात गार पाणी. याच्या उलट केले की लोणी निघतच नाही. आलेले लोणी हळूहळू एकत्र करून ठेवावे लागते, नाहीतर ते विरते. तसेच साधनेच्याही बाबतीत असते. साधनेची युक्ती श्रीगुरूंकडून नीट समजून घेतली व त्यानुसार साधना केली, तरच आपण परमार्थात पुढे जातो. येथेच सगुण रूपातील श्रीगुरूंची आवश्यकताही योग्य पद्धतीने अधोरेखित होते !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

22 November 2016

॥ अमृतबोध ॥ २२ नोव्हेंबर २०१६

पूर्वी विहिरीवर रहाट असत. आता ते लोकांना पाहायलाही मिळत नाहीत. या रहाटावरून कळशीने पाणी काढण्याच्या रूपकाचा, प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी साधनेच्या दृष्टीने सांगितलेला भावार्थ आपण पाहात आहोत.
आपल्यापाशी बळ नसेल तर दुस-याचे उसने बळ घेऊन ती कळशी खेचावी लागते. पण तरी देखील किती खेचावी ह्याचे प्रमाणही कळावे लागते. पू. मामा म्हणतात की, जर जास्त खेचली तर ती कळशी रहाटावर चढते. कळशी बरोबर विहिरीच्या वर आली की हाताने धरून सोडवून घ्यायची असते. म्हणजे नुसते बळ मिळून चालत नाही, युक्ती पण कळावी लागते. म्हणूनच प. पू. श्री. मामा म्हणतात, " कळशी खेचण्यासाठी बळ उसने मिळाले तरी खेचण्याचे प्रमाणही कळावे लागते. तशी साधनेची युक्ती देखील श्रीगुरूंकडूनच समजून घ्यावी लागते. "
शिष्याने श्रीसद्गुरूंनी जशी सांगितलेली आहे तशीच साधना करायची असते. शिवाय त्यांच्याकडून त्या साधनेची युक्तीही जाणून घेतली की, मग तीच साधना आपल्याला अधिक आनंददायक व सुखकारक होत असते. युक्ती कशी असते त्याचेही पू. मामा सुंदर मार्गदर्शन करतात, ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

21 November 2016

॥ अमृतबोध ॥ २१ नोव्हेंबर २०१६

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे कळशीचे रूपक आपण पाहात आहोत. पाण्याने भरलेल्या कळशीला लावलेला दोर नेटाने ओढून आपण ती वर घ्यायची असते. त्यासंदर्भात पू. मामा म्हणतात की, " विहिरीतून कळशी बाहेर खेचताना आपल्यापाशी पुरेसे बळ नसेल तर दुस-याचे उसने घ्यावे लागते. तसेच श्रीगुरुकृपेचे असते. "
परमार्थात आपले बळ पुरेसे नसतेच कधी. आपल्या श्रीगुरूंच्या कृपेच्या बळावरच आपला परमार्थ ख-या अर्थाने पूर्णत्वाला जात असतो. प. पू. मामा हेच सांगतात की, जिथे आपले बळ संपते तिथून श्रीगुरुकृपेचे बळ आपल्याला उपयोगी पडत असते. म्हणूनच श्रीगुरु जशी सांगतात तशीच साधना करण्यातच आपला खरा लाभ असतो. त्यांच्याकडून साधनेची युक्ती पण जाणून घ्यायची असते व तीच वापरून पुढे जायचे असते. हे कसे करायचे? तेही प. पू. श्री. मामा छान समजावून सांगतात, ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

20 November 2016

॥ अमृतबोध ॥२० नोव्हेंबर २०१६

अगदी सोप्या, घरगुती उदाहरणांमधून परमार्थाचा उत्तम बोध करण्याची विलक्षण हातोटी ही प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांची खासियत होती. त्यामुळेच त्यांच्या उपदेशाने आपल्या हृदयाचा ठाव घेतला नाही तरच नवल !
पूर्वी विहिरीवर रहाट असायचे. त्याला कळशी लावून पाणी शेंदत असत. त्याचे साधनेच्या संदर्भातील फार सुंदर रूपक पू. मामा प्रवचनात सांगत असत. आजपासून पाच दिवस आपण पू. मामांच्या त्या रूपकाचा विचार करणार आहोत.
रहाटाला लावलेल्या दोराला खाली कळशी असते. ती विहिरीच्या पाण्यात सोडून पूर्ण भरून जड झाली की वर खेचून घेतात. साधनेचे मर्मही तसेच असते हे सांगताना पू. मामा म्हणतात, " आपण अनेक जन्म कमवलेल्या विषयांचे ओझे आपल्याला खाली खाली ओढते. पण आपण बळ देऊन नेटाने साधना-अभ्यास करावयाचा असतो ! "
पाण्याने भरलेली कळशी इतकी जड होते की वर उभे राहून ती खेचणा-यालाच खाली ओढते. अशावेळी आपण पायाने नेट लावून, बळ देऊन ती वर ओढावी लागते. तसे आपणच मागील अनेक जन्मांमध्ये कमवलेल्या विषयवासनांचे ओझे आपल्याला सतत खाली खेचत असते. अशावेळी नेटाने धीर धरून व बलपूर्वक साधना-अभ्यास आपण करावयाचा असतो. जेवढा आपला हा निर्धार व नेट अधिक तेवढीच आपली साधनाही जोमाने होत जाते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

19 November 2016

॥ अमृतबोध ॥ १९ नोव्हेंबर २०१६

' जो दुस-यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला । ' हे वचन सर्वश्रुतच आहे. या मागील मार्मिक सिद्धांत सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " एकाच कार्याबद्दल दोघांचे मत सारखे असणे कठीण; म्हणून दुस-यावर विसंबून कार्य हाती घेण्यात अर्थ नाही. "
एकाच गोष्टीबद्दल दोघेजण कधीच सारखे मत देऊ शकत नाहीत, म्हणून सर्वांचे एकमत होऊन कार्य तडीस जाणे फारच कठीण आहे. हे पक्के जाणून ज्याला यशस्वी व्हावयाचे आहे त्याने कधीच दुस-यावर अवलंबून कार्य हाती घेऊ नये, हा महत्त्वाचा बोध पू. मामा येथे करीत आहेत.
लहानपणी ऐकलेली दोन कबूतरे व पारध्याची गोष्ट त्यासाठी स्मरणात ठेवायला हवी. जाळ्यात उडालेली दोन कबूतरे फारच थोडा काळ एकत्र उडू शकली व त्यांचे कोणत्या दिशेने उडायचे? यावर दुमत झाल्याबरोबर ती जाळ्यासकट खाली पडली व अनायासे पारध्याच्या तावडीत सापडली. म्हणूनच प. पू. श्री. मामांचा हा बोध खूप महत्त्वाचा आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

18 November 2016

॥ अमृतबोध ॥ १८ नोव्हेंबर २०१६

एखाद्याच्या मनाची आवड हा स्वतंत्र विभागच आहे. मनाला काय आवडेल? हे कोणी सांगू पण शकत नाही. आपापल्या पूर्वकर्मांनुसार ज्याला त्याला जशी तशी बुद्धी होत असते.
या मनाच्या आवडीचा भाग सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " एखादे स्तोत्र सतरा वेळा पाठ करूनही पाठ होत नाही; पण शिमग्यातल्या शिव्या, सिनेमातली गाणी ' पाठ करा ' म्हणून एखाद्याला सांगावेही लागत नाही. हा मनाच्या आवडीचाच भाग असतो. "
आवड असली की सवड मिळते, ही म्हण काही चुकीची नाही. म्हणूनच आपण आपल्या मनाला सतत परमार्थाची, नामाची, श्रीभगवंतांच्या सेवेची, सद्ग्रंथांच्या चिंतनाची आवड लावून ठेवावी; म्हणजे मग प्रपंचाच्या रगाड्यातही बरोबर सवड मिळून आपल्या हातून परमार्थही विना अडथळा घडत राहील.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

17 November 2016

॥ अमृतबोध ॥१७ नोव्हेंबर २०१६

सामान्यपणे ज्याला ऐकू येत नाही त्याला बहिरा म्हणतात. पण कानांच्या अकार्यक्षमतेपुरतेच हे बहिरेपण संतांना मात्र मान्य नाही. म्हणूनच संतांना अभिप्रेत असलेले व परमार्थाच्या दृष्टीने पाहिल्यावर जाणवणारे खरे बहिरेपण सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीभगवंतांविषयी काहीही ऐकले की, या कानातून घेऊन त्या कानाने जे सोडून देतात, पण प्रपंचाविषयी गोष्ट आली की मात्र पक्की लक्षात ठेवतात, त्यांनाच संत ' बहिरे ' म्हणतात. "
प्रपंचाची तीव्र आवड व परमार्थाविषयी अनास्था असणा-या बद्ध जीवांचे सगळे वागणे, प. पू. श्री. मामा सांगतात त्या बहिरेपणामध्येच मोडते. लहान मूल जसे जेवायला खायला, शिस्तीने वागायला कंटाळा करते; पण खेळायला मात्र केव्हाही एका पायावर तयार असते. तसेच या बहि-यांचेही असते. कोणी परमार्थाचे काही सांगितले तर त्याकडे साफ दुर्लक्ष करतात, पण प्रपंचाची कोणतीही गोष्ट पक्की लक्षात ठेवतात, कितीही कष्ट पडले तरी जिवाच्या आकांताने धडपडून ती पूर्ण करतात.
अशाच बहि-या लोकांची कीव येऊन दयाळू संत त्यांना सतत बोधामृत पाजून पाजून त्यांचे ते अयोग्य बहिरेपण नष्ट करीत असतात. संतांच्या त्याच जगावेगळ्या तळमळीचे साकार रूप म्हणजेच प. पू. श्री. मामांचा हा ' अमृतबोध ' उपक्रम होय !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

16 November 2016

॥ अमृतबोध ॥ १६ नोव्हेंबर २०१६

पापकर्मांचे तीन प्रकार आपण पाहात आहोत. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज तिसरा प्रकार सांगताना म्हणतात, " उच्चार करून दाखविलेल्या पापाचे मनुष्य प्रत्यक्ष देहाने आचरण करतो. हे तिसरे पापकर्म होय. "
मनात निर्माण झालेली पापप्रवृत्ती मुखावाटे बाहेर येते. त्याचेच मग शरीराच्या आधाराने प्रत्यक्ष आचरण होते, हेच तिसरे पापकर्म आहे. या पापाला भोगावाचून क्षमा नाही.
पापकर्मांच्या विचित्र कचाट्यातून कायमची सुटका व्हायला हवी असेल, तर या मूळच्या पापप्रवृत्तीवरच घाला घालावा लागतो. पुण्य केल्याने किंवा नुसते पाप टाळल्याने ते होत नाही. ही पापप्रवृत्ती मुळातून नष्ट करणे केवळ श्रीगुरुकृपेलाच शक्य असते. तेथे मनुष्य-प्रयत्न कामी येत नाहीत. म्हणूनच परमार्थात श्रीगुरुकृपेला अनन्यसाधारण महत्त्व असते !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

15 November 2016

॥ अमृतबोध ॥१५ नोव्हेंबर २०१६

पापकर्म तीन प्रकारचे असते, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. काल आपण पाहिलेले त्यातील पहिले, मानसिक पाप हे कलियुगात गौण मानले जाते.
मनातील हीच पापवृत्ती प्रारब्धाने व आपल्या दुर्विचाराने बळावली की तीच त्या मनुष्याच्या मुखावाटे बाहेर पडते. म्हणून प. पू. श्री. मामा सांगतात, " अंत:करणात झालेल्या पापाच्या निश्चयाचा मनुष्य उच्चार करून दाखवतो, हे दुसरे पापकर्म. "
मानसिक पाप जेव्हा वाचिक स्तरावर येते तेव्हा मात्र त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. म्हणून कारण नसताना कोणाची साधी निंदा जरी केली तरी त्याचे पाप हे लागतेच. श्रीभगवंतांनी प्रसाद म्हणून आपल्याला दिलेली वाणी त्यांचे नाम-गुणवर्णन, संतांची स्तुती, सद्ग्रंथांची पारायणे यासारख्या सात्त्विक गोष्टींतच जर आपण रंगवली नाही, तर ती वाणी पापमूलकच ठरते. म्हणून संत म्हणतात की, " जिभले तुजला काय गे धंदा । घडीभर भज गे गोविंदा ॥ " वाचिक पाप फार घडू नये, यासाठीच मौनासारख्या वाणी-संयमाला साधकीय जीवनात महत्त्व दिलेले दिसून येते. 
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

14 November 2016

॥ अमृतबोध ॥ १४ नोव्हेंबर २०१६

मनुष्याच्या हातून घडणारे प्रत्येक पापकर्म तीन प्रकारचे असते. वाल्मीकी रामायणाचा संदर्भ देऊन प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी ते स्पष्ट करून सांगितलेले आहे. आजपासून तीन दिवस आपण त्या तीन प्रकारांचा परामर्ष घेऊया.
प. पू. श्री. मामा पापकर्मांचे रहस्य सांगताना म्हणतात, " पापकर्म तीन प्रकारचे असते. मनुष्याचा पापाचा निश्चय प्रथम अंत:करणात होत असतो. " कोणतेही पाप आधी आपल्या मन, बुद्धी, चित्त व अहंकार या अंत:करण चतुष्टयात जन्माला येते. मनातील पापवृत्तीला बुद्धी योग्य ठरवते व अहंकार त्याला अनुमोदन देतो. चित्त त्याचे चिंतन करून त्यात वाढ करते. अशाप्रकारे पापाचा प्रथम निश्चय आपल्या मनातच होत असतो. हेच मानसिक पापकर्म होय. याच वेळी जर ते पाप टळले तर पुढील अनर्थही आपोआप टळतात. पण हे होण्यासाठी श्रीगुरुकृपेची व अंत:करणाच्या शुद्धीची आवश्यकता असते. श्रीभगवंतांची मोठी दया की, या मानसिक पापकर्मांना कलियुगात गौण मानले जाते, त्यांचा मनुष्याला तेवढा त्रास होत नाही. पण तरीही ते निषिद्धच मानलेले आहे, यात शंका नाही.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

13 November 2016

॥ अमृतबोध ॥ १३ नोव्हेंबर २०१६

श्रीगुरु हे व्यक्ती नसून तत्त्व आहे. श्रीभगवंतांची अभिन्न कृपाशक्तीच जीवांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर सगुणरूपाने श्रीगुरु म्हणून अवतरते. श्रीगुरुपरंपराही तीच व श्रीगुरूही तीच शक्ती असते. त्यामुळे श्रीभगवंत, त्यांची कृपाशक्ती व श्रीगुरु ही एकाच परब्रह्मतत्त्वाची वेगवेगळी नावे आहेत. त्यांच्यात किंचितही भेद नाही.
ज्या मानवी रूपात श्रीगुरुतत्त्व सगुण होते, ते रूप आपल्याला आपल्या संस्कारांनी मनुष्य भासत असले, तरी ते श्रीभगवंतांसारखे सच्चिदानंदमयच असते. त्यामुळे त्या परमकरुणामय श्रीगुरूंची निष्कपट भावाने, प्रेमादरपूर्वक  परिचर्या, सेवा करणे हे प्रत्येक शिष्याचे आद्य कर्तव्य आहे. ज्या पावन देहातून आपल्याला अमोघ कृपालाभ होतो, शिष्य म्हणून तो सद्गुरु-देह आपल्यासाठी नित्य पूजनीय, वंदनीय व सेवनीयच असतो, असा शिष्य-कर्तव्याचा बोध प. पू. श्री. मामासाहेब महाराज आपल्याला येथे करीत आहेत.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

12 November 2016

॥ अमृतबोध ॥ १२ नोव्हेंबर २०१६


श्रीभगवंतांची प्राप्ती करवून देणारे वर्तन म्हणजेच धर्म. जेवढी आपली प्रेमभावना तीव्र तेवढेच ते धर्माचरणही आपल्या हातून अचूक होत जाते. धर्म ही श्रीभगवंतांची आज्ञा आहे, म्हणून ती आपल्या सर्वांसाठी निरंतर अनुसरणीयच ठरते. संतांना अभिप्रेत असलेल्या विशुद्ध धर्माचे मूलतत्त्व आपण कालच्या अमृतबोधातून समजून घेतलेले आहेच.
या धर्मबुद्धीचे महत्त्व सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " पराकाष्ठेच्या विपत्तीत देखील धर्मबुद्धीचा आश्रय सोडू नये. " आपल्या प्रारब्धाने कितीही विपरित परिस्थिती निर्माण झाली, प्रचंड भोग वाट्याला आले, तरीही आपल्या धर्मबुद्धीचा आश्रय चुकूनही सोडू नये. काहीही झाले तरी धर्मानेच वागावे. कारण त्या भयंकर विपत्तीतून, बिकट परिस्थितीतून तीच धर्मबुद्धी आपल्याला सहीसलामत बाहेर काढत असते. पुराणकालापासून आजवरची असंख्य उदाहरणे यासाठी प्रमाण आहेत. शिबीराजा, दानशूर कर्ण यांसारख्या महान लोकांनी आपली धर्मबुद्धी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील शाबूत ठेवलेली होती व त्यामुळेच ते श्रेष्ठही ठरले. धर्मबुद्धीचे माहात्म्य जाणूनच संकटांमधून, विपत्तींमधून सहजतेने सुटण्याचा मार्ग प. पू. श्री. मामा येथे आपल्याला करुणेने सांगत आहेत.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

11 November 2016

॥ अमृतबोध ॥ ११ नोव्हेंबर २०१६

प्रबोधिनी कार्तिकी एकादशी !!

धर्माची गती गहन आहे असे म्हणतात. विशुद्ध धर्माची तत्त्वे समजून घेणे व त्यानुसार आचरण करणे हेही त्यामुळे खूप कठीण मानले जाते. धर्मपालनाच्या बाबतीत नेहमीच संतांनी सांगितलेल्यानुसार आचरण करणे, हे आपल्यासाठी सोयीचे व सुलभ असते.
संतांना अभिप्रेत असणा-या परमविशुद्ध व मुख्य धर्माचे नेमके लक्षण सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " ज्याच्या पालनाने श्रीभगवंतांची निष्काम व अव्यभिचारिणी भक्ती उत्पन्न होईल, तोच मानवमात्रांचा उत्तम धर्म होय ! "
धारण करतो तो धर्म ! म्हणजे ज्या नियमांच्या पालनाने मनुष्याचे संधारण होते, प्रगती होऊन, आपल्या मूळ ब्रह्मानंद-स्वरूपाची हरवलेली अनुभूती पुन्हा प्राप्त होते, तोच खरा धर्म होय. धर्म ही एक प्रगल्भ जीनवपद्धती आहे, तो काही एकमेकांशी भांडण्यापुरता मर्यादित नाही.
श्रीभगवंतच शाश्वत आनंदमय आहेत. त्यांच्याप्रति आपल्या हृदयातील निष्काम, निरपेक्ष व शुद्ध प्रेमाची तीव्रता ज्या ज्या उपायांनी सतत वाढेल व त्याद्वारे त्यांचीच अव्यभिचारिणी, निष्कलंक, निर्मळ व अनन्य भक्ती प्राप्त होईल, असेच सर्व उपाय अखंड अवलंबिणे, हेच आपल्यासाठी खरे धर्मपालन आहे !
आज प्रबोधिनी कार्तिकी एकादशी. श्रीभगवंतांच्या विषयीची ही अनन्य प्रेमभावना श्रीगुरुकृपेने आपल्या हृदयात जागली, तरच खरे ' प्रबोधन ' झाले असे म्हणता येईल. प. पू. श्री. मामा आजच्या अमृतबोधातून भक्तिधर्माची हीच प्रगल्भ जाणीव आपल्याला कृपापूर्वक प्रदान करीत आहेत. त्या बोध-जाणिवेचे अनुसंधान करणे हे साधक म्हणून आपले प्रमुख कर्तव्य असून तीच आजच्या या कार्तिकी एकादशीची आपली सुयोग्य उपासनाही आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

10 November 2016

॥ अमृतबोध ॥१० नोव्हेंबर २०१६


प्रपंच आणि परमार्थ हे आपल्या खूप सवयीचे शब्द आहेत. प्रपंच म्हणजे मायेची सृष्टी, जे जे दिसते ते सर्व. भगवान श्री माउली स्पष्ट सांगतात की, " मनोमार्गे गेला तो येथेचि मुकला । हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥ " मनाचा मार्ग म्हणजे प्रपंच तर हरीचा मार्ग म्हणजे परमार्थ. हे परस्परविरोधी मार्ग आहेत. प्रपंचात स्वार्थ आहे तर परमार्थ आपल्याला नि:स्वार्थ करणारा आहे. आजवरच्या संतांनी जे जे सांगितले ते सर्व परमार्थाचेच विवरण आहे. आणि मनाचे ऐकून आपण जे वागतो ते सारे प्रपंचात मोडणारे असल्याने आपल्याला नेहमी अडचणीत आणणारेच असते. म्हणून प्रपंच कायम संकटांनी भरलेला असतो.
प्रपंचात जे सुख लाभते ते स्वार्थीच असते, आपल्यापुरते मर्यादित असते. पण परमार्थात मात्र श्रीभगवंतांचे स्वरूप असणारा आनंदच आत बाहेर भरून राहिलेला असतो. त्या निर्भेळ, व्यापक आनंदाची या लौकिक सुखाशी कधीच तुलना होऊ शकत नाही. प्रपंचासारखेच त्यातले सुखही नाशिवंत असते, तर परमार्थातला आनंद श्रीभगवंतांसारखा अविनाशी असतो. म्हणून त्या आनंदालाच आपण सर्वांनी सतत धरून राहावे, यासाठी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून आपल्याला दोन्हीची यथार्थ जाणीव करून देत आहेत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

9 November 2016

॥ अमृतबोध ॥ ९ नोव्हेंबर २०१६

प्रपंच सोडून राम राम म्हणा असे संत कधीच सांगत नाहीत. प्रपंचाचाच परमार्थ करण्याची खुबी मात्र ते आवर्जून शिकवतात.
आजच्या अमृतबोधातून असेच सोपे पण महत्त्वाचे मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " सहलीला जावे की भक्तियात्रेला ? तर भक्तियात्रेलाच जावे. यात्रेत सहल होतेच; पण सहलीत यात्रा होत नाही. "
आपल्या विचारांची भूमिका खूप महत्त्वाची असते. प्रत्येक गोष्टीकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो, हे आपल्या साधकीय प्रगतीसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरत असते. साधी सहलीसारखी गोष्टही केवळ विचारांच्या भूमिकेत केलेल्या बदलाने भक्तियात्रा ठरून सहली बरोबरच परमार्थही साधून देऊ शकते. साधकाने सतत आपल्या साधनेला पोषक असणारीच भूमिका बाळगली पाहिजे, हेच तत्त्व यातून प. पू. श्री. मामा आपल्याला शिकवत आहेत ! 
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates