Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

30 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *३० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३५ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या सातव्या अभंगाच्या तिस-या चरणात वाचाळांबद्दल सांगतात की, *"अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैचेनि गोपाळ पावे हरि ॥७.३॥"*
याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, पुष्कळ मंडळी निरनिराळे ग्रंथ वाचून, किंबहुना पाठ करून त्यांची प्रमाणे देऊन आपण ज्ञानी असल्याचे भासवून श्रोत्यांना चकित करतात. पण अशा लोकांना भगवान श्रीहरी दयाळू असले तरी पावत नाहीत. त्या लोकांना माउली जन्मांधाची उपमा देतात.
मोराला दोन डोळ्यांबरोबर प्रत्येक पिसावरही डोळा असतो, पण त्यातील खरे डोळे फुटले तर त्या पिसा-यावरील डोळ्यांचा काही उपयोग होत नाही. तसे अध्यात्म हे केवळ स्वानुभवानेच होते, दुस-यांचे वाचून कितीही बरळले तरी त्याची किंमत परमार्थात शून्यच होय. म्हणून माउली साधकाचे खरे उपयुक्त दोन डोळे कोणते? हेही स्पष्ट सांगतात, ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

29 April 2017

॥ अमृतबोध ॥* *२९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३४ ॥*

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज परमार्थाचा सुयोग्य अधिकारी कसा असतो, हे सांगताना म्हणतात, "ज्याच्या तपाचा पाया भक्कम असेल, त्या पायावर गुरुभक्तीरूपी सुंदर मंदिर उभारलेले असेल, त्या मंदिराचे श्रवणेच्छारूपी दरवाजे सदैव उघडे असून अनिंदकपणाचा कळस त्या मंदिरावर चढविलेला असेल, अशा भक्ताला परमार्थाचा उत्तम अधिकारी म्हणतात. त्याच्याच अंत:करणरूपी मंदिरात श्रीभगवंत स्वयमेव प्रकट होत असतात. तोच गीता श्रवणाचाही अधिकारी समजावा.
पण नुसते ग्रंथ वाचून केवळ पोपटपंची करणारे, अनुभव नसताना पुस्तकी ज्ञान पाजळणारे लोक काहीच कामाचे नसतात. त्यांना कधीच श्रीगोपाळ भगवंतांची प्राप्ती होत नसते; असे श्री माउली अभंगाच्या तिस-या चरणात सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३३॥*

सद्गुरु श्री माउली अभक्तांचे महत्त्वाचे लक्षण सांगतात की, एखादा तपस्वी, गुरुभक्त असेल व त्याला श्रवणेच्छाही असेल, पण तो जर श्रीभगवंतांना सामान्य मनुष्य मानत असेल, त्यांच्या सर्वसमर्थ विभूतिमत्वाची त्याला खात्री नसेल व तो भगवंतांची तसेच त्यांच्या भक्तांची निंदा करीत असेल; तर तो अभक्तांचा शिरोमणीच मानला पाहिजे. शरीर तरुण आहे, गोरे व सौंदर्यपूर्ण आहे, पण त्यात प्राणच नसेल तर काय उपयोग त्या बाकीच्या गोष्टींचा? तसेच या अभक्तांच्या बाबतीत होते.
सोन्याने मढवलेल्या देखण्या घराच्या दारात भयानक नागीण आडवी बसलेली असावी; किंवा पंचपक्वान्नांच्या ताटात विष कालवलेले असावे, वरून जिवलग मैत्री दिसावी पण पोटात मात्र कपट असावे; त्याप्रमाणे तप, गुरुभक्ती, श्रवणेच्छा इतक्या सर्व गोष्टी असून देखील, जर तो मनुष्य श्रीभगवंतांची किंवा त्यांच्या लाडक्या भक्तांची निंदा करीत असेल, तर त्याचे बाकी सर्व फुकटच होय !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३२ ॥*

सद्गुरु श्री माउली सांगतात की, तपस्वी असून जो गुरुभक्त नसेल तर तो अधिकारी नाही. तपस्वी आहे, गुरुभक्तही आहे, पण त्याला शास्त्रश्रवणाची इच्छाच नसेल तरीही तो योग्य नाही. जसे मोती कितीही चांगला असला तरी त्याला जर वेज पाडलेले नसेल तर त्याचा उपयोग काय? त्यात दोरा शिरणारच नाही. समुद्र अगाध आहे मान्य; पण त्यावर झालेली पर्जन्यवृष्टी वायाच नाही का? जेवून तृप्त झालेल्यापुढे पंचपक्वान्ने ठेवून काय फायदा? त्यापेक्षा भुकेलेल्यालाच जेवायला घालणे बरे नव्हे का? म्हणून योग्यता पुष्कळ असूनही शास्त्रश्रवणेच्छाच नसेल, तरी त्या माणसाला अभक्त मानून दूरच ठेवावे, असे माउली स्पष्ट सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

26 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३१ ॥*

श्रीमद् भगवद् गीताशास्त्रसेवनाचा योग्य संप्रदाय सांगताना श्री माउलींनी काही लक्षणे सांगितलेली आहेत. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्या लक्षणांना अभक्तांचीच लक्षणे मानतात व त्याचे सुरेख स्पष्टीकरणही करतात.
जो तप करीत नाही, तो येथे अनधिकारी आहे. एकवेळ तप करतो पण त्याच्या अंत:करणात गुरुभक्तीच नसेल तर त्याला वेदांनी वाळीतच टाकलेले आहे. एखादा कावळा वृद्ध झाला म्हणून काही तो यज्ञाचा चरू भक्षण करण्याच्या योग्यतेचा थोडीच होतो? वृद्ध झाला तरी तो शेवटी कावळाच ना. तसे मोठा तपस्वी झाला, तरी त्याच्या ठिकाणी गुरुभक्ती नसल्यामुळे त्याला अभक्तच मानले गेले आहे. माउली अशा अभक्तांना भगवंतांच्या कृपेच्या बाबतीत पूर्ण अनधिकारीच म्हणतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

25 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३० ॥*

सद्गुरु श्री माउलींचे हृद्गत सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, "जो कर्म, उपासना व ज्ञान या तिन्हींचा प्रेमाने अंगीकार करून जगतो, तोच खरा भक्त होय. आणि अशी भक्ती ज्यांना नाही, ते पतित असून शिवाय अभक्त ह्या कोटीत गणले जातात. कारण ते श्रीहरींना भजत नाहीत."
कर्म, उपासना व ज्ञान या तिन्हींचा जो प्रेमाने अंगीकार करतो किंवा त्या भगवंतांच्या प्रेमाखातरच या तिन्ही गोष्टी सांभाळतो, तोच भक्त होय. याचा अर्थ असा की, खरी भक्ती होण्यासाठी आपले कर्म त्या भक्तिभावाला अनुकूल असायला हवे. त्यानुसार आपली उपासनाही तेवढी व्हायला हवी आणि या दोन्ही बाबतीत ज्ञानाची भूमिका अंत:करणात हवी. अज्ञानी माणसाला देवाधिदेव पावत नाही, असे समर्थ श्री रामदास स्वामी म्हणूनच सांगतात. भोळा भाव व अज्ञान यात मात्र फरक अाहे, हे लक्षात घ्यायला हवे.
अभक्तांची आणखी काही महत्त्वाची लक्षणे पू.मामा सांगतात, ती उद्यापासून पाहूया.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

24 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२९ ॥*

एखादा माणूस उपासना करतोय, पण भगवान श्रीहरींची न करता इतर देवतांची जर करत असेल, तरी त्यालाही खरी प्राप्ती होत नाही. सद्गुरु माउली अशा माणसालाही दैवहतच म्हणतात.
या अन्यदेवता उपासकांचे भगवान नारायणांच्या सगुणरूपावर खरे प्रेम नसते. शिवाय भक्तिहीन काम्य उपासना असल्यामुळे त्यांच्या उपासनेत फार अडचणी येतात. इंद्रादी देवता ऋद्धी-सिद्धींच्या माध्यमातून त्यांची मार्गातच वाटमारी करतात. प्रवासात दरोडेखोर भेटल्यावर जशी एखाद्याची अवस्था होते, तसेच यांचे होऊन जाते. पण जे श्रीभगवंतांचे खरे प्रेमी भक्त असतात, त्यांना मात्र असल्या कोणत्याही अडचणी कधीच येत नाहीत, त्यांचा परमार्थ निर्विघ्नपणे पार पडतो.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२८ ॥*

आसुरी संपत्तीच्या दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य (कठीणपणा) व अज्ञान या सहा दोषांची लक्षणे सद्गुरु श्री माउलींनी सविस्तर सांगितलेली आहेत. त्यांची दाहकता सांगताना पुढे ते म्हणतात, "प्रलयकाळचा अग्नी, समुद्रातला वडवाग्नी व विद्युतअग्नी हे दिसायला अवघे तीनच असले, तरी एका पंक्तीला जेवायला बसले तर त्यांना संपूर्ण विश्व सुरुवातीच्या प्राणाहुतीलाही  पुरणार नाही. कफ, पित्त व वात हे दोष तीनच; पण ते खवळले तर ब्रह्मदेवांना शरण जाऊनही मरण चुकत नाही. मग या तिघांहूनही दुप्पट सामर्थ्य असणारे हे सहा दोष आवरणे किती कठीण ठरेल?
एकाच राशीला क्रूर ग्रहांचा मेळावा जमावा, मृत्युसमयी सर्व रोगांनी शरीर व्यापावे, चोरांवरच विश्वास टाकल्याने त्यांचे फावावे किंवा थकला-भागलेला महापुरात सापडावा; तसे हे साही दोष मनुष्याचे अकल्याण करतात.
ज्याच्या सर्वनाशाचा समय जवळ आलेला असतो त्यालाच हे बरोबर जडतात. मोक्षमार्गालाही लागलेला मग त्यांच्यामुळे पुन्हा संसाराच्या गर्तेत बुडून जातो. या सहाही दोषांनी भरलेल्या दैवहत अभक्ताची पापे वज्रलेप होऊन बसतात व त्याच्या सुटकेची शक्यताच पूर्ण मावळते. म्हणून शहाण्या माणसाने यांच्यापासून सांभाळूनच राहिले पाहिजे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

22 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२७ ॥*

आसुरी दुर्गुणांमध्ये सर्वात महत्त्वाचा दुर्गुण म्हणजे 'अज्ञान'. या अज्ञानाचे लक्षण सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "पाषाणाला ज्याप्रमाणे शीत-उष्ण स्पर्शाचे ज्ञान नसते, जन्मांध व्यक्तीला रात्र व दिवसातला फरक समजत नाही, स्वयंपाकातल्या पळीला निरनिराळ्या रसांची चव कळत नाही; तसे कर्तव्य व अकर्तव्याविषयी अंधळेपणा असणे हे घोर अज्ञानाचे स्वरूप होय.
लहान मुलाला स्वच्छ किंवा मळकट पदार्थांचे ज्ञान नसल्यामुळे, जे दिसेल ते तोंडात घालावेसे वाटते; त्याप्रमाणे पाप-पुणात्मक कर्मांचा एकच खिचडा करून खाताना ज्याच्या बुद्धीला त्याज्य किंवा ग्राह्य यांचा विचारच राहात नाही; अशी स्थिती हेच नि:संशय अज्ञान होय.
या सर्व दोषांमुळे दैवहत पुरुषांच्या ठायी पूर्ण भराला आलेली 'आसुरी संपत्ती' बलवत्तर ठरते. दिसायला लहान असली तरी ती अत्यंत विषारीच असते. म्हणून परमार्थात यश मिळवू इच्छिणा-या साधकांनी पूर्ण प्रयत्नाने या दोषांपासून दूरच राहिले पाहिजे !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

21 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२६ ॥*

दैवहत व अभक्त मनुष्य आसुरी गुणांची खाणच असतो. त्या गुणांमध्ये 'क्रोध' हा चौथा दुर्गुण आहे.( कालच्या अमृतबोधात चुकून 'अभिमान' हा चौथा दुर्गुण आहे असे लिहिले गेले होते. अभिमान हा तिसरा दुर्गुण आहे.)
या क्रोधाची लक्षणे सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "दुस-याला सुख झालेले पाहिल्याबरोबर ज्याच्या मनोवृत्तीत बदल होऊन अंगाची लाही लाही होऊ लागते, तोच क्रोध होय. तापलेल्या तेलावर पाण्याचा शिंतोडा पडला तरी प्रचंड तडतड होऊन ती आग अजून भडकते किंवा पहाट झाल्यावर चोरांना मरणप्राय दु:ख होते; तसे दुस-याला भाग्यवशात् प्राप्त झालेले लौकिक व आध्यात्मिक ऐश्वर्य पाहून, एखाद्याच्या ठिकाणी प्रचंड द्वेषभावना उफाळून येते, तोच क्रोध समजावा. ज्याचे मन सापाच्या बिळाप्रमाणे मिट्ट अंधारमय व सखोल, दृष्टी सुटलेल्या बाणाप्रमाणे अणकुचीदार, बोलणे आग पाखडल्याप्रमाणे तीक्ष्ण व शरीर पोलादाच्या करवतीप्रमाणे खरखरीत व जहाल असते; तो क्रोधी मनुष्य कठोरपणाची केवळ मूर्तीच असून, मनुष्यांमध्ये अधम समजावा.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

20 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२५ ॥*

आसुरी संपत्तीतील चौथा दोष आहे 'अभिमान'. ईश्वराची वाणी असणारे वेदवचन सर्व जगाला मान्य आहे, त्यातून ज्याचे प्रतिपादन केले जाते तो परमेश्वर सर्वांना पूज्य आहे. या सर्वसंमत सिद्धांतांचा नुसता उच्चार जरी कोणी केला तरी ज्याला ते सहन होत नाही; व त्या दयाळू ईश्वराविषयी मत्सर वाटून त्या 'ईश्वरालाही मी खाऊन टाकीन', असे निरर्थक उद्गार प्रौढीने जो काढतो, तो अभिमानाचे मूर्तिमंत रूपच जाणावे. अशा वागण्याने तो आपला आधारच गमावून घात करून घेतो.
एकदा एका टिटवीने समुद्राच्या जवळ अंडे घातले होते. पाण्याच्या लाटेने ते अंडे समुद्रात गडप झाले. तेव्हा समुद्रावर चिडलेल्या त्या टिटवीने चोचीने समुद्राचे पाणी आटवून टाकण्याचा निश्चय केला. आता ही केवळ अशक्य गोष्ट तिच्याने कधीतरी साध्य होईल का? फुकट शीणच पदरी पडणार व ऊर फुटून जीव जाणार. त्याप्रमाणे वृथा अभिमानाच्या भरात, त्या कनवाळू व सर्वांचे पालन करणा-या परमेश्वराचे नावही काढलेले ज्याला खपत नाही, तो स्वैराचारी व उन्मत्त मनुष्य प्रतिष्ठेच्या भरात फुगलेल्या गळवाप्रमाणे नेहमी ठणकत व ठुसठुसत राहातो. अशा वर्तनाने तो रौरव नरकाच्या मार्गालाच लागलेला आहे, हे स्पष्ट समजावे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

19 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२४ ॥*

आसुरी संपत्तीतील दुसरा दोष म्हणजे 'दर्प'. दर्प याचा अर्थ खोट्या अहंकारातून निर्माण झालेला माज.
या दर्पाचे लक्षण सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, मूर्ख माणसाच्या जिभेवर विद्येचा थोडासा शिंतोडा जरी पडला तरी तो लगेच फुगून जाऊन विद्वानांच्या सभेलाही तुच्छ मानू लागतो. काटेरी कुंपणाच्या टोकावर बसलेला सरडा मिजासीने स्वर्गालाही ठेंगणा समजतो किंवा छोट्या डबक्यातील मासा महासागराला खिजगणतीत धरत नाही. तसे एक दिवस चुकून मिळालेल्या पंचपक्वान्नांवर ताव मारून माजलेल्या भिका-याप्रमाणे; स्त्री, धन, विद्या, स्तुती, मान-सन्मान इत्यादी नश्वर गोष्टींची प्राप्ती झाल्यामुळे जो उन्मत्त बनून माजोरीपणाने वागू लागतो, तो दर्पाची खाणच होय. मृगजळावर विसंबून भरलेले तळे फोडून टाकणा-या किंवा ढगांची सावली मिळाली म्हणून बांधलेले घर मोडून टाकणा-या महामूर्खाप्रमाणे, हाती भरपूर पैसा आला म्हणून लगेच ज्याला माज चढतो, तो माणूस दर्पाचेच उदाहरण होय. हे सर्व क्षणिक असते, आत्ता आहे तर पुढच्या क्षणी नष्ट होऊन जाणारे असते, हेच त्या दर्पाने अंध झालेल्या माणसाच्या लक्षात येत नाही.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

18 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२३॥*

सद्गुरु श्री माउलींची एक सुंदर ओवी प्रमाणाला घेऊन प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, ज्या बुद्धीला परमात्माच शेवट आहे, म्हणजे जी बुद्धी परमात्म्यापर्यंत पोहोचते, तीच खरी बुद्धी होय. बाकीच्या सर्व दुर्मती होत अाणि दैवहत अभक्तांच्या ठिकाणी ह्याच सर्व दुर्मती ठासून भरलेल्या असतात.
सद्गुरु श्री माउली या दैवहत माणसांची लक्षणे, सोळाव्या अध्यायात अासुरी संपत्तीचे वर्णन करताना सविस्तर सांगतात. प.पू.श्री.मामा त्याचे विवरण करताना म्हणतात, आसुरी दोषांमधील सर्वात मोठा दोष म्हणजे दंभ होय. आपल्याला पारलौकिक सुख प्रदान करणा-या धर्माची जर सतत लोकांच्यासमोर प्रसिद्धी केली, तर तो तारक धर्मच दोष निर्माण होण्यास कारण ठरतो. जसे, महापुरात बुडण्यापासून वाचवणारी नाव जर एखादा डोक्यावर वाहून नेऊ लागला तर ती हमखास त्याला बुडवते; किंवा जे अन्न मनुष्यास  जगविते तेच जर अधिक सेवन केले किंवा दृष्टाळलेले अन्न जर खाल्ले तर तेच विषाप्रमाणे मारक ठरते. स्वधर्माचरणाच्या पोकळ बडबडीने धर्माचे अधर्मात रूपांतर होते, तोच दंभ होय. असत्य गोष्टीलाच सत्य भासवणे म्हणजेच दंभ. जिचे वासरु दगावले आहे अशा गायीने दूध द्यावे म्हणून त्या मेलेल्या वासरात पेंढा भरून ते तिच्या समोर ठेवतात; तसे धर्माचरणाच्या बाबतीत खोट्याचे खरे भासवणे हेच दंभाचे लक्षण आहे आणि अभक्त व दैवहत लोक या दंभाचे ठाणच असतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

17 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२२ ॥*

देवर्षी नारद सांगतात की, भक्ती ही मुळात प्रेमस्वरूप आहे व ते प्रेमही अमृतस्वरूप व्हावे लागते. यावर प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे फार सुंदर दृष्टांत देत असत.
आई, बहीण, बायको, लेक आणि ठेवलेली बाई; या सर्वच स्त्रिया आहेत. परंतु यांपैकी फक्त आईवरची प्रेमयुक्त भक्ती मुक्तीला कारण होईल. बाकी बहीण, बायको व मुलगी यांच्यावरील प्रेम प्रपंचालाच कारण होईल आणि ठेवलेल्या बाईवरील प्रेम हे नरकातच टाकेल. म्हणून नुसते प्रेम असून चालत नाही, तर तेही अमृतस्वरूप व्हावे लागते, तरच त्यातून श्रीहरींची प्राप्ती होते. त्या प्रेमाच्या मागील भावनेला फार महत्त्व असते.
पण जे लोक कोणत्याच प्रकारे श्रीहरींची भक्ती करीत नाहीत ते 'दैवहत' म्हणजेच दुर्दैवी होत. यांना प्रेमाची भावनाच नसल्यामुळे यांच्याकडून होणारी उपासना देखील वेगळीच होते. त्यांच्या त्या उपासनेवरही माउलींनी सुरेख ओव्या रचलेल्या आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

16 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२१ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या सातव्या अभंगात पातकी माणसाविषयी सांगताना म्हणतात, *"पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥"*
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज याचा अर्थ सांगतात, "पर्वताप्रमाणे पातक करणे म्हणजे पातकांशिवाय अन्य काहीच न करणे. अशी ज्याची वृत्ती असते, त्याच्यावर ती पातके वज्रलेप होतात आणि ज्याच्या बाबतीत अशी पातके वज्रलेप झालेली असतात तोच 'अभक्त' होय. म्हणूनच माउली सांगतात की, ज्याला भक्ती नाही तो पतित अभक्त होय.
भक्ती नाही म्हणजे प्रेम नाही. कारण भक्ती ही प्रेमस्वरूप असते. यावर देवर्षी नारदांचे सूत्रच आहे. भक्ती नुसती परमप्रेमरूप नसून अमृतस्वरूपही असते, असेही ते स्पष्ट सांगतात. याचा गूढार्थ आमच्या मातु:श्री फार सुंदर सांगत असत." प.पू.मातु:श्री पार्वतीदेवींचा तो गूढार्थ आपण उद्या सविस्तर पाहूया.
खूप जुन्या झालेल्या मूर्तींची आणखी झीज होऊ नये म्हणून विशिष्ट वनस्पती व द्रव्यांचा लेप त्यावर देतात. तो लेप इतका कठीण होऊन बसतो की मग कशाचाही दुष्परिणाम त्या मूर्तीवर होत नाही. त्याला वज्रलेप म्हणतात. माउली येथे सांगतात की अभक्तांची पातके अशी वज्रलेप होतात व नंतर ती नष्ट होणे फार अवघड होऊन बसते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

15 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२०॥*

हरिपाठाच्या सातव्या अभंगात सुरुवातीला सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज दुर्दैवी अभक्तांची स्थिती सांगतात. आधीच्या सहाव्या अभंगात जे मर्म सांगितले, ते कोणास प्राप्त होते? तेही माउली या अभंगात आपल्याला सांगत अाहेत.
"सर्वांच्या हृदयात गुप्तपणे नांदत असलेला आत्मारामप्रभू माझ्या पूर्ण अनुभवाला आल्यामुळे, आता मला तो सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी पूर्णपणे भरून राहिलेला दिसत आहे", असा आपला स्वानुभव सद्गुरु श्री माउली खात्रीपूर्वक सांगून या अभंगाचा शेवट करतात.
अभक्तांना जरी भगवान श्रीकृष्णांची प्रचिती येत नसली, तरी भक्तांना मात्र सर्वत्र त्याच परमात्मसत्तेची यथार्थ अनुभूती येते, हाच सिद्धांत माउली येथे स्पष्ट करून सांगत आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates