Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 October 2016

॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६

श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन अनुग्रह करणे, हा नवीन जन्मच असतो अापला. या कृपेसाठी पूर्वपुण्याईची नितांत आवश्यकता असते. त्या पुण्याईचे फळ म्हणून श्रीगुरूंची कृपा होणे म्हणजेच ' योग ' होय. योग होणे याचा अर्थ जोडले जाणे. श्रीगुरुकृपेने तो जीव श्रीभगवंतांशी जोडला जातो.
असा योग झाल्यानंतर श्रीगुरूंनी दिलेली साधना आपल्या हातून परमप्रेमाने होण्यासाठीही पुन्हा पुण्याई गाठीशी असावीच लागते. अशी साधना नियमाने होणे म्हणजेच त्या योगाचा ' क्षेम ' होय. साधना प्रांतातील योगक्षेमाचा असा अभिनव अर्थ प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात.
जो साधक श्रीसद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सांगितल्यानुसार साधना करतो, त्याचा हा योगक्षेम तेच सर्व बाजूंनी सांभाळतात व त्याला परमार्थात सतत पुढे नेतात. " योगक्षेमं वहाम्यहम् । " अशी प्रत्यक्ष श्रीभगवंतांनीच गीतेत ग्वाही दिलेली आहे.
दिवाळीच्या पाडव्याला नवीन विक्रम संवत्सर सुरू होते. तसे साधकाच्याही आयुष्यात श्रीगुरुकृपेने नवे तेजोमय पर्व सुरू होत असते. साधक साधनेच्या मार्गावर विक्रम करून नवीन जीवनास सुरुवात करतो; म्हणून त्याच्यासाठी हाच दिवाळीचा पाडवा ठरतो. याचा आनंद साधनेचा उत्साह वाढवणारा असल्याने, तुम्हा-आम्हा साधकांसाठी तोच सतत साध्य असायला हवा, नाही का?
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

30 October 2016

॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज ' विठ्ठल मात्रा ' या शब्दाचा अर्थ ' दीक्षा ' असा करतात. आता ते त्या दीक्षा शब्दाचे फार अर्थपूर्ण मर्म सांगतात की, " दीक्षा म्हणजे वासनांवर पडलेला स्फुल्लिंग ". समजा एक कापसाचा मोठा ढीग आहे, त्याच्यावर छोटीशी ठिणगी पडली तर? तो संपूर्ण ढीग काही क्षणातच भस्म होऊन जातो. तसे अनंत जन्मांमधील कर्मांनी आपणच आपल्या अंत:करणात साठवलेल्या वासनारूपी ढिगावर श्रीसद्गुरु त्यांची कृपारूपी ठिणगी टाकतात. त्यालाच ' दीक्षा ' असे म्हणतात. या छोट्याशा ठिणगीला, न चुकता साधना करून आपण चेतवायचे असते. श्रीगुरुकृपेच्या बळावर आपल्या हातून झालेल्या सुयोग्य प्रयत्नांनी ती ठिणगी पूर्ण पेटली की त्याचाच वैराग्यरूपी मोठा अग्नी निर्माण होतो व त्यात आपल्या सर्व वासना, विकार, दोष पूर्णपणे जळून नष्ट होऊन जातात. आपली साधना प्रेमाने करणे हेच परमार्थातले ' लक्ष्मी पूजन ' होय. श्रीसद्गुरूंच्या कृपालक्ष्मीची नियमित आराधना केल्यानेच वैराग्य महालाभ होतो. तोच लक्ष्मीपूजनाचा प्रसाद होय. लक्ष्मी म्हणजे वैभवसंपन्नता. म्हणून या साधनेत आतूनच प्रकट होणारे व कायम टिकणारे विविधांगी आनंद-दीप, हीच ती साधनाप्रांतातली वैभवसंपन्न दीपावली होय !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

29 October 2016

॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६

शुभ दीपावली  !!

श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'चे यथार्थ स्वरूप सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " ' विठ्ठल मात्रा ' म्हणजेच दीक्षा. ज्याला ती मात्रा घेऊन मोक्षरूपी गुण अनुभवायचा आहे, त्याने साधनेची पथ्ये पाळायलाच हवीत. "  श्रीगुरूंनी कृपावंत होऊन परंपरेने आलेले कृपाधन शिष्याला बहाल करणे, म्हणजेच ' विठ्ठल मात्रा ' देणे आहे. हेच भवरोगावरील सर्वात रामबाण औषध आहे !
जसे औषध घेऊन पथ्य पाळले नाही तर रोग समूळ जात नाही. पुन्हा योग्य परिस्थिती आली की तो डोके वर काढतो. पण तेच जर औषध नीट घेतले, पथ्यही पाळले व आवश्यक विश्रांतीही घेतली तर त्या रोगाचा पूर्ण निरास होतो. तसे भवरोगासारखा जुनाट व किचकट रोग कधीच सहजासहजी जात नाही. त्यासाठी श्रीगुरूंनी सांगितलेली साधनेची सर्व पथ्ये मनापासून प्रेमाने पाळली तरच गुण येतो. अशी श्रीगुरुकृपा झाल्यावर आपल्याकडून पथ्ये पाळली जाऊन साधना नेमाने व प्रेमाने होणे, हीच ख-या दीपावलीची सुरुवात आहे. साधनेने आपल्या अंत:करणाातील दोष श्रीभगवंत स्वत: नष्ट करतात, म्हणजेच आपल्या ठिकाणच्या नरकासुराचा वध करतात व त्याने बंदिवासात ठेवलेल्या सोळा हजार एकशे राण्यांचा, अर्थात् आपल्या विविध वृत्तींचा अंगीकार करून त्यांचे पाणिग्रहण करतात. त्या सर्व वृत्ती मग प्रपंचाचा ध्यास सोडून हरिध्यासात मग्न होतात. हाच बोध-दीपोत्सव संतांना अभिप्रेत आहे व तोच प. पू. श्री. मामा या 'विठ्ठल मात्रे'तून आपल्याला सांगत आहेत.
'अमृतबोध'च्या सर्व वाचकांना दीपावली महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा  !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 October 2016

॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६

कोणत्याही रोगावरील औषध जर उत्तमरित्या व त्वरित लागू पडायला हवे असेल, तर त्याबरोबर त्याची पथ्ये पण पाळावीच लागतात. तसेच भवरोगावरील साधनारूपी औषध लागू पडायला हवे असेल, तर त्याचीही काही पथ्ये पाळायला नकोत का? त्यासंदर्भात प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज साधकांसाठी फार मार्मिक उपदेश करत आहेत.
साधकांनी दांभिक, व्यसनी व विषयी लोकांच्या; तसेच धर्म, धार्मिकता व सज्जन-संतांची निंदा करणा-यांपासून अगदी दूर राहावे. आपली साधना निर्विघ्नपणे व्हायला हवी असेल तर हे पथ्य पाळायलाच हवे !
या सर्व दुर्जनांचा संपर्कात आलेल्यांना तत्काळ आपल्यासारखेच करण्यात हातखंडा असतो. शिवाय त्यांच्याठायी असलेल्या कुमतीने असे लोक साधकांच्या मनातही त्याच कुबुद्धीची बीजे पेरतात, जी नंतर संशय रूपाने किंवा अश्रद्धेच्या रूपाने साधकांना खूप त्रास देतात. ढेकणाच्या संगतीने अतिशय कठीण हिरा देखील भंगतो म्हणतात, ते याच अर्थाने.
प. पू. श्री. मामा ज्या दुर्गुणांचा इथे उल्लेख करीत आहेत ती सर्व वाईट लक्षणे एकाचवेळी ज्याच्याजवळ पूर्ण फोफावलेली  असतात त्याला आजच्या भाषेत ' पुरोगामी विचारजंत ' म्हणतात. आपल्या देश, धर्म, संस्कृती व संतमहंतांबद्दल सतत गरळ ओकण्याचा एकमेव धंदा असलेल्या या दुर्जनांच्या संगतीत क्षणासाठीही राहू नये, त्यांचे वाङ्मय वाचू नये, त्यांचे बोलणे ऐकू नये किंवा त्यांच्या फालतू व बिनबुडाच्या मतांचा विचार चुकून देखील मनात आणू नये; हेच आपल्या शाश्वत हिताचे आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 October 2016

॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!

भगवान श्रीशिवशंकर तांडवनृत्य करतात. त्यांच्या तांडवाने सर्व पृथ्वी गदगदा हालते आणि जगाचा -हास होतो. म्हणजेच संपूर्ण जग लयाला जाते.
आपल्या श्रीसद्गुरूंनी दिलेली साधना हेही एक प्रकारचे भगवान आदिनाथांचे तांडवनृत्यच आहे. त्या तांडवाने जसा जगाचा नाश होतो, तसा या तांडवाने आपल्या वासनांचा समूळ नाश होतो; असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात.
" प्रपंच म्हणजे बायकापोरे, घरदार नव्हे; तर आपण अनंत जन्मांत साठवलेल्या वासना म्हणजेच प्रपंच होय ", असे प. पू. श्री. मामा म्हणत असत. भगवान शिवांच्या तांडवनृत्याने, भगवती शक्तीचा लास्यविलास असणारे हे बाहेरचे जग म्हणजेच प्रपंच जसा लयाला जातो; तसाच त्यांच्या साधनारूपी तांडवाने हा आतला वासनारूप प्रपंचही लयाला जातो. म्हणूनच साधनेचे सातत्य हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे व तीच आपली प्राथमिकता झाली पाहिजे!
आज श्रीगुरुद्वादशी, कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा निजानंदगमनाचा पुण्यपावन दिवस. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरणीं साष्टांग दंडवत !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

26 October 2016

॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६

आयुर्वेदानुसार आपले शरीर सात धातूंचे बनलेले आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या सात धातूंपासून संपूर्ण शरीर बनते. या धातूंच्या कमी अधिक प्रमाणानुसार शरीराचे आरोग्य ठरते. जे धातू पुष्ट असतात त्यांची लक्षणे आपल्या शरीरावर स्पष्ट दिसतात. या धातूंवरच शरीराचे व मनाचेही स्वास्थ्य अवलंबून असते.
काल आपण प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी साधकांसाठी सांगितलेल्या चार कल्याणप्रद गोष्टी पाहिल्या. त्या गोष्टींचा या धातूंशी देखील महत्त्वाचा संबंध आहे. त्याविषयी प. पू. श्री. मामा सांगतात की, आपल्या धातूंची नुसती पुष्ट असून 
भागत नाही, तर त्यांचे ' साम्य ' असणे महत्त्वाचे आहे. धातुसाम्य म्हणजे सर्व धातू सुयोग्य प्रमाणात शरीरात असणे. या साम्यतेसाठीच साधकाने आहार, विहार व विचार यांची मर्यादा, संयमितता व समतोल राखणे फार गरजेचे असते. भगवान श्री माउली अभ्यासयोगात; बोलणे, चालणे, जागणे, झोपणे, खाणे, वागणे इत्यादी सर्व विषयांचे ' मितलेपण ' सांगतात, ते यासाठीच. ' नियमितता ' या शब्दातच ' मितता ' अनुस्यूत आहे !
या धातुसाम्याचा महत्त्वाचा फायदाही ते सांगतात. " येतुलेनि धातुसाम्य संचलें। असेल सुख ॥ज्ञाने.६.१७.३५१॥ " शरीरात धातुसाम्य असेल तरच सुख वाढून समाधानही लाभते. आपल्या चुकीच्या, अतिरेकी वागण्याने ते साम्य बिघडले की अनारोग्य झालेच म्हणून समजावे. त्यामुळे मग दैनंदिन जीवनात अडचणी येतात व पर्यायाने साधनेतही विघ्न येते; म्हणून साधकांनी आहारविहाराची युक्ती जाणून घेऊन हे साम्य प्रयत्नपूर्वक जपलेच पाहिजे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

25 October 2016

॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६


प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी सांगितलेले साधकांचे चार शत्रू व चार मित्र आपण पाहिले. आता साधकांसाठी ते चार कल्याणप्रद गोष्टी सांगत आहेत. अल्प आहार, अल्प निद्रा, नियमित साधना व संयमित विचारपूर्ण बोलणे; या चार गोष्टींचे प्रत्येक साधकाने मनापासून पालन करणे हिताचे असते.
अल्प या शब्दाचा अर्थ आहे, गरजेपुरते, मोजके. अल्प म्हणजे कमी नाही पण जास्तही नाही. भगवान श्री माउली यालाच ' मितले ' म्हणतात. आयुर्वेदही मितभुक् व हितभुक् असेच सांगतो. गरजेपुरते आणि हिताचेच खावे, आवश्यक तेवढी झोप घ्यावीच, मोजके व विचारपूर्वकच बोलावे आणि न चुकता, नियमितपणे, प्रेमादरपूर्वक श्रीगुरूंनी दिलेली साधना करावी; म्हणजे मग आपले नि:संशय कल्याणच होते !
खाणे व झोप यांचा परस्परसंबंध आहे. जास्त खाल्ले की जास्त झोप येते, जास्त झोपेने मन  आळशी होते. तमोगुणाची वाढ होऊन दैनंदिन व्यवहाराबरोबर साधनेतही विघ्न येते. अजिबातच न झोपल्यानेही शरीराचे स्वास्थ्य बिघडते व मनही चंचल होते; म्हणून जागरणाचा अतिरेकही टाळला पाहिजे. जास्त बोलल्याने रजोगुण वाढून आपली शक्ती क्षीण होते व नको ते विषय डोक्यात राहतात. लोकांच्या व आपल्या संबंधात वितुष्ट येते, हरिचिंतनाचा अमूल्य वेळ नही नाही ते चिंतन करण्यातच खर्च होतो. म्हणून या तिन्ही गोष्टी टाळणे सर्वच दृष्टींनी हिताचे आहे.
प. पू. श्री. मामा सांगतात ती चार साधकाची अनुष्ठेय आवश्यक कर्तव्येच म्हटली पाहिजेत. हे नियम पाळले की बाकी फार कष्ट करायची आवश्यकता राहात नाही.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

24 October 2016

॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६

भगवान श्री ज्ञानेश्वर माउली, सखा कसा असावा? हे सांगताना म्हणतात की, " जो आघवियाची भूमिका । सवे चाले ॥ " जो आपल्या प्रत्येक बाबतीत, सुख-दु:ख, हालअपेष्टा, समाधान, आनंद अशा प्रत्येक परिस्थितीत कायम आपल्या सोबतच असतो, तो सखा, खरा मित्र होय. आपल्या आयुष्यात त्याचा आधार नि:संशय फार महत्त्वाचा व हिताचाच असतो.
काल आपण प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी सांगितलेले शत्रू पाहिले. आता त्याच युद्धात आपल्याला प्रचंड साह्य करून विजय मिळवून देणारे चार मित्र ते सांगतात. धर्म, वैराग्य, ज्ञान व भक्ती; हेच ते साधकाचे सखे होत.
महात्म्यांनी सांगून ठेवलेले आचरणाचे, कसे वागावे व कसे वागू नये? याचे नियम म्हणजे ' धर्म ' होय. हे नियम प्रेमाने पाळणे आपल्या चित्तशुद्धीसाठी व पर्यायाने शाश्वत कल्याणासाठी अत्यंत आवश्यकच असते. विषयवासनांच्या आहारी न जाता, प्राप्त परिस्थितीत शांत राहून निष्ठेने साधना करण्यास सतत प्रेरित करणारी वृत्ती म्हणजे ' वैराग्य ' होय. जेवढे हे वैराग्य दृढ होईल तेवढे आपले साधनेतले सुख वाढत असते. आपण जी साधना करतो आहोत, तिच्या तात्त्विक तसेच उपासनेच्या बाजूंचे आपल्याला पूर्ण ' ज्ञान ' असणे फार आवश्यक असते. हे ज्ञान सद्गुरुपरंपरेच्या व संतांच्या वाङ्मयातून मिळते. चित्तात प्रकटणारा हा बोधदीप आपला खूप मोठा मित्र असतो. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे भक्ती. आपल्या श्रीगुरूंवरची व श्रीभगवंतांवरची आपल्या अंत:करणात वसणारी निष्कपट व शुद्ध प्रेमभक्ती हा साधकाचा सर्वात महत्त्वाचा सखा असतो. ही भक्तीच सर्वसुखाचे आगर असणारे श्रीभगवंत आपलेसे करून देत असते.
प. पू. श्री. मामांनी सांगितलेले साधकाचे हे चार मित्र आपण प्रत्येकाने जाणीवपूर्वक व प्रेमाने जपले पाहिजेत, त्यांच्याशी मैत्री वाढवलीच पाहिजे, इतके महत्त्वाचे आहेत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 October 2016

॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६

श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥ " प्रत्येक साधकाला या युद्धाची सतत अनुभूती येतच असते. बाहेरचे शत्रू परवडले पण आतले फार भयंकर. ते हिताचे नसून शत्रू आहेत, हेच कळायला खूप उशीर होतो. साधकाने नेहमी सावध असावे, असे संत म्हणतात ते यासाठीच.
साधकाच्या या चार प्रमुख शत्रूंची प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज इथे अगदी नेमकी ओळख करून देत आहेत. आळस, झोप, भूक आणि संशय हेच ते चार भयंकर शत्रू आहेत.
आळस तर आपला लंगोटीयार आहे. त्याची पाठची बहीण झोप;  या दोघांची सख्खीचुलत बहीण भूक. हे एकाच कुळातले तिघे मिळून आपल्याला पुरते नागवतात. साधना करायची कधी नव्हे ती इच्छा बळावली की आळस येतो, त्याचा हात धरून झोपही येतेच. हे होत नाही तोवर भूक लागते. भुकेची मर्यादा पाळता येत नाही, म्हणून मग गरजेपेक्षा जास्तच खाल्ले जाते व त्यातून पुन्हा आळस, सुस्तीच वाढते. असे हे नष्टचक्र चालूच राहते आणि साधना करायचे शेवटी मनातच राहून जाते.
संशय मात्र फारच भयंकर शत्रू आहे, अगदी शकुनीमामा सारखा पाताळयंत्री व घातक. तो कधी काय रूपाने डोके वर काढेल सांगताच येत नाही. त्याचा नाश केवळ आपली श्रीगुरूंवरील दृढ श्रद्धा व आपले डोके न चालवता त्यांची आज्ञा जशीच्या तशी पाळणे, याच दोन महापराक्रमी वीरांना करता येतो. म्हणून साधकाने आपली ही दोन कर्तव्ये मात्र प्राणपणाने पाळली पाहिजेत. तरच या युद्धात हमखास विजय प्राप्त होतो !!
प. पू. श्री. मामा यात खूप मोलाचे साह्य करणारे साधकाचे चार मित्र देखील सांगतात, ते आपण उद्या पाहू. तोवर या शत्रूंचा पुरता हिशोब चुकता करून ठेवायला हवा आपल्याला.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

22 October 2016

॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६

अनुभूती ही अतिशय दुर्मिळ गोष्ट असल्याने त्यासाठी साधनाही तितक्याच प्रमाणात करावी लागते आणि आपण जात्याच अधीर असतो. दम धरण्याची, सबूरीची आपल्याला सवयच नसते. आपली गोष्ट त्या माकडासारखी असते. झाड लावले की मूळ किती वाढले, हे पाहण्यासाठी ते माकड रोज झाड उपटून पाहते.  म्हणूनच थोडी साधना झाली आणि काहीच दिव्य अनुभव नाही आला की झाले, आधीच थोडासा असणारा आपला साधनेचा उत्साह पार मावळतो. सगळे अर्थशून्य आहे म्हणून साधना सोडून आपण पुन्हा प्रपंचाचा रसहीन चोथा चघळायला हिरीरीने सुरुवात करतो. हीच आपली सर्वांची मनस्थिती संत नेमकी जाणतात व सतत बाबापुता करून आपले मनोबल वाढवून आपल्याला साधनेत अग्रेसर करीत असतात. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे उपकारच आहेत.
मानवी मनाची ही अधीरता, निर्धाराची कमतरता जाणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज साधकांचे मनोधैर्य उंचावत म्हणतात की, अरे, पहिल्याच डुबकीत मोती हाती लागला नाही म्हणून कोणी रत्नांचे आगर असणा-या समुद्रालाच रत्नहीन समजावे का? धीर धरून पुन्हा पुन्हा मनापासून साधना करीत राहिले की, योग्य वेळी साक्षात्काररूपी मोती हाती लागतोच लागतो ! अशी अनुभूती आतूनच लाभली की त्याचक्षणी तोवर केलेल्या सर्व कष्टांचे चीज होऊन धन्यताही लाभते. पण आधीचे ते आवश्यक कष्ट मात्र न रडता, हिंमत न हारता व ख-या प्रेमानेच झाले पाहिजेत. त्यातच शाश्वत कल्याण आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

21 October 2016

॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६

आपण सर्वजण, हे दिसणारे, जाणवणारे जग, यच्चयावत् सगळे काही मायेचाच खेळ आहे. कल्पना हे मायेचे दृश्य रूप, कारण ती स्वत:च कल्पना आहे. म्हणून आपल्याला सतत काही ना काही कल्पना करायची दांडगी सवयच असते. झोपेत सुद्धा आपण कल्पनेचे इमले रचतो, इतकी ही कल्पना मुरलेली आहे आपल्यात. तसेच या वैष्णवी मायेच्या कक्षेत येणा-या प्रत्येक गोष्टीची कोणा ना कोणाला कल्पना ही करता येतेच.
पण याची दुसरी बाजू सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, ' अनुभूती ' ही एकच अशी गोष्ट आहे की जी कल्पनेच्या अखत्यारीत येत नसल्याने, कल्पनेच्या पलीकडील आहे. अनुभूती ही मायेच्या खेळाच्या बाहेरची गोष्ट आहे व ती नि:संशय मायाधिपती श्रीभगवंतांच्या प्रसादानेच प्राप्त होणारी असल्याने, आपण तिची कल्पना करू शकत नाही. म्हणूनच अनुभूतीविषयी चर्चाही करता येत नाही, ती ज्याची त्याने घ्यायची असते. ही अनुभूती साधण्याचा एकमात्र राजमार्ग म्हणजेच श्रीगुरूंनी दिलेली साधना होय !
प. पू. श्री. मामांच्या या सांगण्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, परमार्थात काल्पनिक अनुभूतींना थारा नाही. म्हणून साधना करायला लागल्यावर ब-याच साधकांना देवदर्शन, विविध आदेश होणे इत्यादी जे भ्रामक किंवा काल्पनिक अनुभव येतात, ते श्रीगुरूंनी किंवा शास्त्रांनी प्रमाणित केले तरच खरे; नाहीतर ती आपली आपण स्वत:च केलेली घोर फसवणूकच होय, त्याने साधनेचे पार वाटोळे होते, हे विसरता कामा नये.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

20 October 2016

॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६

श्रीभगवंतांची प्राप्ती होणे, हेच मनुष्यजन्माचे सर्वश्रेष्ठ सुफल आहे. कारण चौ-याऐंशी लक्ष जीवयोनींपैकी केवळ याच एका योनीत, मनुष्यजन्मातच बुद्धीचे विशेष वरदान असल्याने श्रीभगवंत जाणले जाऊ शकतात. पण; ही खूप कठीण व अशक्यप्राय गोष्ट साधेल कशी? काय काय विघ्ने समोर येतील? नक्की जमेल का आपल्याला एवढे? अशा प्रकारचे अनेक संशय त्यावेळी निर्माण होतात व आपल्याला हतधैर्य करीत असतात. अशावेळी आपल्या मनात असलेला साधनेचा निश्चय खूप उपयोगी पडतो. म्हणूनच पूर्वीच्या ज्ञानी महात्म्यांनी साधनेच्या सुरवातीच्या काळात, साधकाच्या ठायी वसत असलेल्या या निर्धाराला, निश्चयाला फार महत्त्व दिलेले दिसून येते. अर्थात् तो निश्चयही आपल्या पुण्याईचे फळ व श्रीगुरुकृपेचेच अगाध देणे असतो !
साधना नियमितपणे व प्रेमाने होण्यात या निश्चयाचा फार मोठा वाटा असल्याने, साधकांनी हा निश्चयच आधी दृढ केला पाहिजे, या महत्त्वपूर्ण सिद्धांताची प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून आपल्याला जाणीव करून देतात !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

19 October 2016

॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६


रोज आपण अंघोळ करतो तेव्हा आपल्याला कसे स्वच्छ, छान वाटते. आपण ताजेतवाने होतो. आपली सगळी मरगळ, शिणवटा निघून जातो. ह्या लौकिक बाह्यशुद्धीचाच परिणाम इतका चांगला असतो; मग तीच शुद्धी आतूनही झाली तर? हेच काम साधना करते !
जसे पाणी बाहेरून शुद्धी करते, तसे श्रीगुरूंनी दिलेली साधना आपल्या अंत:करणाची आतून स्वच्छता करते. दिवसभरातील राग, द्वेष, निंदा, नकारात्मक विचार, हेवेदावे, दु:खे, विकार इत्यादी अनंत गोष्टींमुळे मन, बुद्धी व चित्तात साचलेला मळ साधनेने त्वरित स्वच्छ होतो व आपण आतूनही ताजेतवाने होतो. साधना ही अंत:करणाची अंघोळच आहे !  मोबाईलवरील अॅप्लिकेशन वापरून जंक क्लीन केले की, जसा मोबाईल फास्ट होतो, अधिक कार्यक्षम होऊन जोमाने काम करू लागतो; तेच साधनेने इथेही होते.
म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण उगीचच आपल्या अंत:करणात साठवलेली ही अनावश्यक घाण स्वच्छ होण्यासाठी, आपली दररोजची साधना प्रेमाने व नेमाने झालीच पाहिजे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates