Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

28 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७४ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात एक महत्त्वाचा चरण घालतात; *"गुजेवीण हित कोण सांगे ॥"* हा चरण मोठा गमतीदार आहे. एक कथा सांगून प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज याचे सुंदर विवरण करतात.
एक गृहस्थ कोणीतरी सांगितल्यावरून आपल्या मुलाला घेऊन एका श्रीगुरूंकडे आला. तो मुलगा एका खुनाच्या कटात सापडलेला होता. त्यातून सुटण्यासाठी त्या गुरूंनी त्याला उपाय सांगून तप करायला सांगितले. पण तो मुलगा काही साधन करीत नसे व पुन्हा जुन्या संगतीने वागू लागला. बापाशी खोटे बोलून त्या गुरूंची निंदाही करू लागला. पुढे बापही पोराचे म्हणणे ऐकून गुरूंशी प्रतारणा करू लागला.
आता पाहा, यात त्या श्रीगुरूंचे काय नुकसान होणार? पण तेथे गूज न राहिल्यामुळे, हिताचे मार्गदर्शन झाले नाही; व त्या बापलेकांची पुरती अधोगती झाली. श्रीगुरूंजवळ राहूनही त्यांना काहीही प्राप्त झाले नाही. कारण श्री माउली म्हणतात तसे, तेथे गूज नव्हते. गूज म्हणजे प्रेमाचा जिव्हाळा. तो असल्याशिवाय कधीही कोणीही कोणाच्या हिताचे सांगत नसते.
याउलट, जर श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागले, तर ते श्रीगुरु शिष्याची सर्वप्रकारे काळजी त्याच्याही नकळत घेतात. पू.मामा यासाठी स्वत:चाच एक सुरेख अनुभवही सांगतात, तो उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७३ ॥*

सद्गुरु श्री माउली म्हणतात, *"तैसा स्वरूपाचिया प्रसरा - । लागीं प्राणेंद्रियशरीरां । आटणी करणें जें वीरा । तेंचि तप ॥ज्ञाने.१६.१.१०८॥"* या ओवीचे बहारीचे विवरण प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज करतात.
आटवण्याची प्रक्रिया आपल्या ओळखीची आहे. पाणी मिसळलेले दूध अग्नीवर ठेवले व लक्ष देऊन सतत ढवळत राहिले की त्यातले पाणी हळूहळू निघून जात जात त्याचा खवा होतो. तेच दूध जर सुरुवातीला जमिनीवर टाकले असते, तर ओघळून वाया गेले असते. आता तेच दूध खव्याच्या स्वरूपात जमिनीवर ठेवले असता हलतही नाही.
तसे, मूळचा ब्रह्मस्वरूप जीव, वासनांच्या संगतीने भ्रमात पडून, स्वत:च्या स्वस्वरूपास विसरून 'मी देहच' असे म्हणू लागतो. त्याची सर्व इंद्रिये त्या वासनांनुसारच कार्य करीत असतात.
पूर्वपुण्याईच्या योगाने श्रीगुरूंची त्या भाग्यवान जीवावर कृपा होते व ते त्याला आपल्या शक्ती, युक्ती व ज्ञानासहित साधना देतात. त्या साधनारूपी अग्नीच्या तापाने त्याच्याठायी मिसळलेले हे वासनांचे पाणी हळूहळू आटते व तो शुद्ध होतो. सद्गुरूंनी दिलेली साधना, जशी सांगितलेली आहे अगदी तशीच नेमाने व प्रेमाने करणे, हीच साधकाची तपश्चर्या असते. कारण कोणीतरी दिल्याशिवाय व त्यावर तप केल्याशिवाय कधीच प्राप्ती होत नसते ! त्या तपश्चर्येमुळेच त्याच्यापुढे दैवत प्रकट होते.
पण यासाठी माउली स्पष्ट सांगतात की, *'दिधल्यावीण प्राप्त ।'* कोणीतरी म्हणजेच परंपरेने आलेल्या अधिकारी सद्गुरूंनी हे साधन कृपापूर्वक द्यावे लागते, तरच त्या जीवाकडून तपश्चर्या घडते. आपल्या मनानेच काही करून चालत नाही.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

26 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७२ ॥*

श्रीगुरूंनी अनुभूतिज्ञानाने शिष्यावर कृपा केली म्हणजे सगळे झाले असे नाही. त्यानंतरही श्रीगुरूंनी सांगितल्यानुसार तपश्चर्या करणे हे शिष्याचे आद्य कर्तव्य असते. तेच श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात सांगतात की, *"तपेंवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे ॥हरि.५.३॥"* तप केल्याशिवाय कधीही दैवत प्रसन्न होणार नाही. म्हणून या तपाला परमार्थात खूप महत्त्व आहे.
या तपाविषयी अधिक मार्गदर्शन करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "तपाच्या व्याख्या करताना कायिक, वाचिक, मानसिक वगैरे अनेक प्रकार सांगितले आहेत. परंतु तपाची खरी व्याख्या सद्गुरु श्री माउली एका सुरेख ओवीत करतात की, प्राण, इंद्रिये व शरीराची अाटणी करणे म्हणजेच तपश्चर्या होय." श्री माउलींच्या या मार्मिक व्याख्येचा आपण उद्या सविस्तर विचार करूया.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

25 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७१ ॥*

सद्गुरु श्री माउली पाचव्या अभंगात, श्रीगुरुकृपेनेच अनुभव लाभतो असे म्हणतात. त्यातील 'अनुभव' या शब्दाचे प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज फार मार्मिक विवेचन करताना म्हणतात, अनुभवाचे पुष्कळ प्रकार आहेत. साधे समाधानाचे उदाहरण घ्या. भुकेल्यापुढे पंचपक्वान्ने ठेवली. जेऊन तो तृप्त झाला, त्याला समाधान झाले. दुस-या दिवशी, कालच्याप्रमाणेच तो जेवण मिळेल म्हणून आला. त्या दिवशी त्याला काहीच मिळाले नाही. तेव्हा कालचे ते समाधान टिकेल का त्याचे? म्हणूनच शास्त्र सांगते की, भोजनाने, श्मशानाने व मैथुनाने जे वैराग्य निर्माण होते, ते खरे नाही. भोजनाने तात्पुरता समाधानाचा अनुभव येतो. पण आत्यंतिक समाधान कसे होईल? याचे उत्तर देताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, ज्याच्या जठरास कायम अमृताचा निर्झर सापडेल, त्याचेच समाधान अखंड टिकून राहील.
त्याचप्रमाणे, आपण करतो त्या भजन-पूजनातही समाधान तेवढ्यापुरतेच लाभते, पूर्ण नाही. परंतु श्रीगुरु जेव्हा मार्गदर्शन करतात, ते आपल्या शक्तीने, युक्तीने व ज्ञानाने, म्हणजेच अनुभूतिज्ञानाने शिष्यास कृपा करतात; तेव्हाच शाश्वत समाधान लाभते.
पण त्यापुढेही त्या शिष्याचे काही कर्तव्य असतेच. तेच माउली पुढील चरणात सांगतात, ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

24 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७० ॥*

भावाशिवाय देवाचा नि:संदेह अनुभव येत नाही, असे प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. याच्या स्पष्टीकरणासाठी ते एक सुंदर उदाहरणही देतात. एकाला मूल होत नव्हते. त्याला एकाने अमुक मंदिरात जाऊन नवस करायला सांगितला. त्या नवसाप्रमाणे त्याला मुलगा झाला. तेव्हा त्याला देवांचे माहात्म्य कळले, देवांचा अनुभव आला.
परंतु पुढे तो मुलगा चो-या करू लागला व याची पत गेली. त्यामुळे ज्या देवांनी मुलगा दिला, त्यांनाच हा शिव्या घालू लागला. आता सांगा, देवाचा अनुभव आला, देव कळला, पण तो नि:संदेह कळला का? म्हणूनच देव नि:संदेह कळण्यासाठी अंत:करणाची पूर्ण शुद्धी व्हावी लागते; आणि त्यासाठीच श्रीगुरूंची नितांत आवश्यकता असते.
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात स्पष्ट म्हणतात, *"भावेंवीण देव नकळे नि:संदेह । गुरुविणें अनुभव कैसा कळे ॥हरि.५.२॥"* श्रीगुरूंच्या कृपेशिवाय परमार्थाचा खरा अनुभव कधीही येत नाही, हे त्रिवार सत्य आहे !
( *छायाचित्र संदर्भ : साक्षात् भगवान श्रीशंकरांनी स्वहस्ते प्रसाद म्हणून दिलेल्या दिव्य शिवलिंगाशेजारी बसलेले पू.मामा. _' श्रीरामेश्वरनाथ '_ असे नामकरण केलेले हे प्रासादिक आत्मलिंग, सध्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथे नित्यपूजनात आहे. महाशिवरात्री निमित्त अमृतमय दर्शन.*)
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६९ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात शुद्ध भावाचे माहात्म्य सांगतात. या संदर्भात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी एक सुंदर गोष्ट सांगत असत.
एका बाईने नऊ महिने पोटी भार वाहिल्यामुळे, आपल्या मुलाचे हित व त्याबद्दल भाव तिच्या मनात निर्माण होणे साहजिकच होते. दुसरी एक बाई होती, तिला मूल नव्हते; पण मूल असावे असे वाटत असल्याने तिने हिचे मूल चोरून नेले.
शोध केल्यावर ती बाई सापडली पण दोघी मुलावर हक्क सांगू लागल्या. प्रकरण न्यायालयात गेले. दोघींचे म्हणणे ऐकल्यावर न्यायाधीशांनी युक्ती केली. त्यांनी पट्टेवाल्याला तलवार आणून मुलाचे दोन तुकडे करून दोघींना द्यायला सांगितले.
हे ऐकल्याबरोबर ज्या बाईने नऊ महिने पोटी भार वाहिला होता, तिला दु:ख सहन न होऊन ती म्हणाली, "महाराज, हा मुलगा कोठेही असो, परंतु सुखी असो. तुम्ही कृपा करून त्याचे तुकडे करू नका." हे ऐकताच त्या दुस-या भाव नसलेल्या बाईला, आता आपल्याला मूल मिळणार याचा आनंद झाला. पण न्यायाधीशांनी खरी आई ओळखून ते मूल भाव असलेल्या बाईला देऊन टाकले.
खरा विशुद्ध भाव असा बाहेरून आणता येत नाही, तो आतूनच यावा लागतो; व तो आल्याशिवाय देवांची नि:संदेह प्राप्ती होत नसते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

22 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६८ ॥*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हरिपाठाच्या पाचव्या अभंगाचे मार्मिक विवरण करीत आहेत. ते म्हणतात की, "योग हा परम नसला तरी, अंत:करण शुद्धी होईपर्यंत त्याचा जरूर उपयोग आहे. हे लक्षात न आल्यामुळे, 'योगात अर्थ नाही' असे सरसकट विधान केले जाते. कशाचा केव्हा उपयोग करावयाचा; त्याचे ज्ञान असणे फार महत्त्वाचे आहे. ते समजून जर आपण वागलो, तरच पुढील मार्ग मिळणार. नाहीतर तेथेच मार्ग खुंटेल."
योगाच्या साहाय्याने आधी  अंत:करणाची शुद्धी झाली पाहिजे. ती झाल्याशिवाय शुद्ध भाव निर्माण होत नाही आणि असा भाव निर्माण झाल्याशिवाय देवाचा नि:संदेह अनुभव येत नाही, असे सद्गुरु श्री माउली सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

21 February 2017

॥ अमृतबोध ॥२१ फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ६७ ॥

हरिपाठाच्या पाचव्या अभंगात सद्गुरु श्री माउली, *"योगयाग विधि येणें नोहे सिद्धि ।"* असे म्हणतात. यातील योग व याग या दोन्ही महत्त्वपूर्ण संज्ञांचे अत्यंत मौलिक व मूलभूत विवेचन प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज करतात. ते खरोखरीच आपण नीट समजून घ्यायला हवे.
पू.मामा म्हणतात, "वेदांमध्ये कांडत्रयी असल्यामुळे, कर्मकांडाचा भाग हा यागावर अवलंबून आहे, तर उपासनाकांडाचा भाग हा योगावर अवलंबून आहे. कर्माने बाह्य मळ तर उपासनेने अंत:करणाचा मळ धुऊन जातो. खरा देव ओळखायचा असेल तर अंत:करण शुद्धच पाहिजे.
'योग' हा चित्तवृत्तींचा निरोध करणारा, वृत्ती शुद्ध करणारा आहे. म्हणून कोणत्याही कर्मकांडाचा श्रीगणेशा हा योगानेच होतो. 'याग' शब्दाने साध्या वैश्वदेवापासून राजसूय, अश्वमेधादी यज्ञांचा निर्देश होतो. पण योग व यागाचा विधी जर नीट माहीत नसेल तर ते काहीही सिद्धीस जात नाही, असे माउली स्पष्ट सांगतात. इतकेच नाही, तर 'मी शास्त्र मानीत नाही, मला वाटते तेच बरोबर', असे म्हणणा-यांचा योग व याग आग्रहाने झाला, तरी तो फक्त दंभालाच कारण होतो. शिवाय त्या दंभामुळे नरकाची प्राप्ती होते. म्हणून या दोन्हीचा योग्य विधी जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. हे दोन्ही विधिपुरस्सर केले गेले, तरच त्याचा ईश्वरप्राप्तीकडे उपयोग होतो, अन्यथा नाही."
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )



Read More

20 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२० फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६६ ॥*


सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात संतांच्या संगतीचे महत्त्व मार्मिक शब्दांमध्ये सांगतात. त्याचा सोपा शब्दार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "बहुतकाल पर्यंत परिश्रम केल्यावाचून देवताप्रसाद कसा होणार? काहीतरी दिल्यावाचून मोबदला कसा मिळणार? तितकी सलगी घडल्यावाचून मनातील गुह्य गोष्ट कोण उकलून दाखविणार? आणि आपले हित कसे होणार? म्हणूनच श्री माउली स्वानुभवाची सत्य गोष्ट सांंगतात की, गड्यांनो, साधुसत्पुरुषांची संगत धरा; म्हणजे ते तुम्हांला संसारातून पार तरून जाण्याचा मार्ग सांगतील."
खूप तपश्चर्या केल्याशिवाय कोणतीही देवता कधी प्रसन्न होत नसते. आपण काहीतरी दिल्याशिवाय त्याचा मोबदला कसा मिळणार आपल्याला परत? आणि एखाद्याशी आपली तेवढी जवळीक झाल्याशिवाय तो त्याचे गुह्य आपल्याला सांगत नसतो. तसेच, साधुसंतांशी आपली नम्रतेने जवळीक झाल्यावरच आपल्या हिताची गोष्ट ते आपल्याला सांगतात. म्हणून संतसंगती मिळवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

19 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *१९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६५ ॥*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठाच्या पाचव्या अभंगाचा सरलार्थ सांगताना म्हणतात की,  आत्मज्ञान हा परमार्थाचा सर्वोच्च अनुभव आहे. हे आत्मज्ञान केवळ अष्टांग योगसाधना किंवा यज्ञयागादिकांच्या आचरणाने प्राप्त होत नसते. कारण यांमुळे केवळ व्यर्थ दगदग होते व त्यातून दांभिकपणाच वाढत असतो. जोवर खरी तळमळ लागत नाही तोवर ही साधनेही मनापासून व अचूक घडत नाहीत. शुद्ध भाव असल्यावाचून श्रीभगवंतांचे नि:संशय ज्ञान होणार नाही आणि सद्गुरुकृपेवाचून स्वस्वरूपानुभव घडणार नाही.
भाव शुद्ध असला तरच परमार्थाचा खरा अनुभव येतो व त्याद्वारेच श्रीभगवंतांचे नि:संशय आणि समग्र ज्ञान होत असते. असा भाव आतून जागृत झाला, की मगच श्रीसद्गुरुकृपा होऊन आपल्या हातून प्रेमाने व नेमाने साधना घडते आणि स्वस्वरूपाची यथार्थ अनुभूती लाभून साधक धन्य होतो.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

18 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *१८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६४ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या चौथ्या अभंगात शेवटी हरिनामाचे माहात्म्य सांगताना म्हणतात, *"ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचे ॥"* वैखरीने हरिनाम घेतल्यावर पाप नाहीसे होते. पातक नाहीसे करण्याचे सोपे शास्त्र म्हणजे हरिनाम घेणे. पण शास्त्रांचे तेवढ्याने समाधान होत नाही. शास्त्र म्हणते की नाम मध्यमेत व्हायला हवे. म्हणजे मग त्याचा 'जप' होतो. 'मी देह आहे' हा भाव मायेमुळे होऊन बसलेला असतो, तो नाहीसा होणे म्हणजे प्रपंचाचे धरणे तुटणे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज यासाठी फार सुंदर उदाहरण देतात. नारळात जोपर्यंत ओलसरपणा असतो तोपर्यंत खोबरे अलग होऊ शकत नाही. मात्र तो ओलेपण सुकल्यावर वरची करवंटी फुटली तरी आतल्या खोब-याला काहीच होत नाही. तसेच, जप होता होता मायेच्या अज्ञानाचा ओलावा नष्ट होऊन साधकाचा मी अलग होत जातो. मी जीवात्मा नसून श्रीभगवंतांचा अंश आहे, हे ज्ञान होते व श्रीगुरुकृपेने प्रपंचाचे धरणे तुटते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

17 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *१७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६३ ॥*

श्रीसंत एकनाथ महाराज भक्तीविषयी म्हणतात, *"भक्ती म्हणजे सोहंशक्ती । सांडी भवभय आसक्ती । पाहता निजभाव विरक्ती । सर्वांभूती भगवंत ॥"* म्हणून नुसती शक्ती म्हणण्यापेक्षा भक्ती म्हणण्यात गर्भितार्थ आहे.
श्रीसंत तुकाराम महाराजही श्रीभगवंतांना विनवणी करताना म्हणतात की, *"तुमचिये दासीचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥"* याचे विवरण करताना प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, 'दासीचा दास' म्हणजे श्रीगुरूंकडून प्राप्त झालेल्या शक्तीचा दास. त्या शक्तीचे दास्यत्व प्रेमाने केले; तरच अंत:करणाची शुद्धी होते. आणि मग त्या शुद्ध अंत:करणात आलेले ज्ञानही टिकाऊ असते. यासाठीच, हरिपाठाच्या चौथ्या अभंगातून सद्गुरु श्री माउली आपल्याला कळकळीने उपदेश करतात की, हरिजप करून प्रपंचाचे असे धरणे कायमचेच तोडा व सुखी व्हा.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

16 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *१६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६२ ॥*

कालच्या अमृतबोधात प.पू.श्री.मामांचे एक सुंदर वाक्य सांगितले होते. त्याचे स्पष्टीकरण करावे, असे काही वाचकांनी आवर्जून कळविले. म्हणून आज आपण त्यावर विचार करूया.
प.पू.श्री.मामा म्हणतात, "प्रत्येक प्राणिमात्र, प्रपंचात कितीही कष्ट पडले तरी प्रेमाने तो करतातच. म्हणजे ते प्रपंचासाठी काही ना काही त्याग करतात. मग जर आपण कष्टपूर्वक प्रपंचात त्याग करतो, तर भक्तीत विनाकष्ट त्याग घडत असेल तर ती का बरे प्रेमाने करीत नाही?"
प्रपंच हा अहंकाराने केला जातो. कारण तो 'माझा' आहे व 'मी' तो करीत आहे; ही पक्की भावना त्यामागे असते. कोणताही त्याग हा आपल्या माझेपणाच्या किंवा हवेपणाच्या भूमिकेविरुद्ध वागूनच घडतो. म्हणजे आपल्याला हवे असतानाही आपण तडजोड म्हणून किंवा परिस्थिती म्हणून किंवा लौकिक प्रेमाची गरज म्हणून तो विविक्षित त्याग करतो. म्हणजे त्या त्यागासाठी आपल्याला कष्ट पडतात. तो त्याग झाला तरी त्याविषयीची किंचित आढी मनात असते व काही ना काही अपेक्षाही असतेच.
पण हेच भक्तीमध्ये नेमके उलट होते. भक्तीमध्ये भक्त हा श्रीभगवंतांना पूर्ण समर्पित असतो. त्याच्या सर्व व्यवहारांमध्ये 'माझेपणा' ऐवजी 'तुझेपणा'चीच भावना असते. त्यामुळे तिथे जो जो त्याग होतो, तो तो अतीव प्रेमाने व मनापासून होतो. शिवाय आपल्या प्रेमास्पदाच्या म्हणजेच भगवंतांच्या सुखासाठी, समाधानासाठी व प्रसन्नतेसाठी, श्रीगुरुकृपेने आपोआप आतून निर्माण झालेल्या विवेकाचे फळ म्हणूनच तो त्याग झालेला असतो. त्यामुळेच त्या निरपेक्ष त्यागाचा कसलाही त्रास किंवा कष्ट आपल्याला होत नाहीत, जाणवत नाहीत.
पण दुर्दैव पाहा, जितक्या प्रेमाने, कष्ट सोसून आपण अशाश्वत प्रपंच करतो, त्याच्या निम्मे देखील कष्ट आपण शाश्वत व कायम टिकणा-या परमार्थासाठी सोसायला तयार नसतो. त्याचे महत्त्व समजूनही आपल्या वर्तनात काही केल्या म्हणावा इतका लवकर बदल होत नाही. आपल्या अशा वागण्याचेच प.पू.श्री.मामांसारख्या सर्व संतांना अतीव दु:ख वाटत असते.
प.पू.श्री.मामा एवढ्या सर्व संदर्भांचा नेमका विचार त्या एकाच छोट्याशा वाक्यातून आपल्यासमोर ठेवतात. हे वाचून भगवान श्री माउलींची एक अलौकिक श्रुती तत्काळ डोळ्यांसमोर येते. सद्गुरु श्री माउली म्हणतात, *"आंगे साने परिणामें थोर । जैसें गुरुमुखींचे अक्षर ।"* पू.मामांचे हे वाक्यही असेच आहे !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

15 February 2017

॥ अमृतबोध ॥१५ फेब्रुवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ६१॥

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठातून भक्तीचे श्रेष्ठत्वच प्रतिपादित करतात. त्यावर प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी अप्रतिम भाष्य केलेले आहे. ते म्हणतात की, "भक्ती हा केवळ शब्द नसून ती एक अवस्था आहे ! ती अवस्था निव्वळ प्रेमानेच प्राप्त होते. श्रीभगवंतांवर प्रेम करण्यापूर्वी, ते कुठे आहेत हे कळायला पाहिजे. ते तर सर्वांच्या हृदयमंदिरी आहेत, असे श्रीगीता सांगते. म्हणजे आपला त्या ठिकाणी प्रवेश व्हायला पाहिजे. मग त्यासाठीच अंत:करणशुद्धी आली. याचा अर्थ 'योगरहस्या'चा अवलंब करायलाच हवा. म्हणूनच भक्तीला योगशक्ती असेही म्हणतात.
माउली म्हणतात की, "सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कोण्या गुणें ॥४.३॥" प्रत्येक प्राणिमात्र, प्रपंचात कितीही कष्ट पडले तरी प्रेमाने तो करतातच. म्हणजे ते प्रपंचासाठी काही ना काही त्याग करतात. मग जर आपण कष्टपूर्वक प्रपंचात त्याग करतो, तर भक्तीत विनाकष्ट त्याग घडत असेल तर ती का बरे प्रेमाने करीत नाही? ती भक्ती प्रेमाने न करणे हेच आपले मोठे दुर्दैव नाही काय?"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

14 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *१४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६० ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या चौथ्या अभंगात म्हणतात, *"कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया ॥४.२॥"* यावर विवेचन करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, एखादे दैवत प्रसन्न करून घ्यायचे असेल;  तर ते दैवत काय आहे? आणि त्याची भक्ती कशी करावी? हे आधी नीट कळायला हवे. हे जर प्रथम समजून घेतले नाही, तर भक्ती यथार्थपणे घडणार नाही.
यासाठीच श्रीगुरुचरित्रात कथन केलेल्या शबराच्या कथेचा नीट अभ्यास करायला हवा. शबर दूताने राजपुत्राच्या उपदेशानुसार मोठ्या निष्ठेने श्रीशिवांची प्रेमभक्ती केली आणि त्यावर प्रसन्न होऊन त्याला प्रत्यक्ष श्रीशिवप्रभूंचे दर्शनही लाभले. म्हणूनच भक्तीचे शास्त्र श्रीगुरुमुखातून समजून घेतल्याशिवाय अापल्याला तरणोपाय नाही.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates