Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *३१ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६४ ॥*



भगवान श्रीविष्णूंचे पावन धाम असलेल्या वैकुंठाची प्राप्ती होणे हे अतिशय दुर्मिळ मानले जाते. पण या महात्म्यांची गोष्ट वेगळी असते. ते अवघ्या जगालाच वैकुंठमय करून सोडतात. श्रीभगवंतांच्या अलौकिक नामस्मरणाच्या प्रभावाने ते जगाचेच वैकुंठ करतात. हे सामर्थ्य केवळ महात्म्यांचेच आहे, असे सद्गुरु श्री माउली स्पष्ट सांगतात.
महात्म्यांच्या कृपाप्रसादाने श्रीभगवंत प्रकट होत असतात. जिथे श्रीभगवंत तिथेच त्यांचे पवित्र धामही असते. म्हणून या भगवत्स्वरूप झालेल्या महात्म्यांच्या कृपेने अवघ्या जगाचेच वैकुंठ बनते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

30 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *३० मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६३ ॥*

महात्म्यांचा आणखी एक थोर सद्गुण सद्गुरु श्री माउली सांगतात की, त्यांना कसलाही आपपर भावच नसतो. राजा असो किंवा रंक, त्यांच्या दृष्टीने दोघेही समानच असतात. शिवाय लहान-थोर असाही भेद त्यांच्या ठायी नसतो. ते सरसकट सर्वांना आपल्या आनंदाने वेष्टून टाकतात."
संतांच्या ठायी श्रीभगवंतांचा परमानंद परिपूर्ण भरलेला असतो. ते सदैव त्याच आनंदात रममाण झालेले असतात व तोच आनंद ते कोणताही भेद न मानता एकजात सर्वांना कृपापूर्वक प्रदानही करीत असतात. कारण श्रीभगवंतांचेच स्वरूप असणारे संत हे शाश्वत आनंदाची अपरंपार खाणच असतात !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

29 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२९ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६२ ॥*

महात्म्यांचा अद्भुत अधिकार सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात की, "ते स्वर्गीय अमृतप्राशनावाचून अमर करतात; आणि योगाभ्यासावाचून मोक्षसुखाचा लाभ करून देतात !"
स्वर्गातील अमृत प्यायले की काही काळासाठी अमरत्व प्राप्त होते. पण संतांची अमोघ कृपा झाली की ते अमृत न पिताच, कधीही लोप न पावणारे शाश्वत अमरत्व लाभते; तो जीव भगवत्स्वरूपच होऊन ठाकतो !
योगसाधनेचा अंतिम लाभ मोक्षसुख हाच मानलेला आहे. योगानेच कैवल्यपदाची प्राप्ती होत असते. पण ज्याच्यावर महात्मे पूर्णकृपा करतात, त्याला तो खडतर योगाभ्यास न करताच त्या अलौकिक मोक्षसुखाची प्राप्ती अगदी सहजतेने होते. महात्म्यांचे हे सामर्थ्य जगावेगळे व अद्भुतच आहे. म्हणूनच त्यांच्या दुर्लभ कृपानुग्रहाला परमार्थात अनन्यसाधारण महत्त्व दिलेले दिसून येते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६१ ॥*

जगामध्ये रात्र संपून पहाट झाल्यावरच उजाडते. त्याशिवाय अंधकार जाऊन उजेड पडत नसतो. पण संतांचे, महात्म्यांचे असे नसते. ते लौकिक पहाट न  होताच ज्ञानाच उजेड सर्वांच्या अंत:करणात पाडतात; असे महात्म्यांचे अद्भुत सामर्थ्य सद्गुरु श्री माउली सांगतात.
आत्मज्ञानाचा प्रकाश हा स्वतंत्रच असतो. तो पडल्यावर लौकिक जगातील रात्र-दिवस यांचा संबंधच उरत नाही. ज्ञान हे सदैव प्रकाशमानच असते; आणि ते केवळ महात्म्यांच्या परमकृपेनेच प्राप्त होत असते. म्हणूनच सद्गुरु श्री माउली येथे महात्म्यांचा यथोचित गौरव करीत आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२७ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६० ॥*

महात्म्यांची करुणा फार विलक्षण असते. त्या स्वाभाविक करुणेने ते आपल्या सभोवतीच्या दु:खी-कष्टी जीवांचेही भले करतात. सद्गुरु श्री माउली सांगतात की, महात्मे श्रीभगवंतांच्या नामघोषाने सर्व विश्वाचे दु:ख नाहीसे करतात; आणि सर्व जगाला महानंदाने दुमदुमून सोडतात.
संकीर्तन भक्तीच्या माध्यमातून हे थोर महात्मे इतर लोकांनाही श्रीभगवंतांचा नामघोष करायला उद्युक्त करतात व त्याद्वारे अवघ्या जगाचेच दु:ख नष्ट करतात. जिथे साक्षात् आनंदकंद श्रीभगवंतांचे नाम आहे, तिथे दु:ख उरणार तरी कसे? जिथे नाम आहे तिथे तर सर्वत्र त्या आनंदमय परमात्म्याचा महानंदच भरून राहिलेला असतो. अशाप्रकारे हे महात्मे नामघोषगौरवाने संपूर्ण जगच दुमदमून सोडतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

26 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२६ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५९ ॥*

मनाचा निग्रह करण्यासाठी 'नियम' सांगितलेले आहेत. नियमांच्या पालनाने अंत:करणाची शुद्धी होत असते, म्हणून यांना फार महत्त्व आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच नियम सांगितलेले आहेत.
*'शौच'* म्हणजे शुद्धता. ही शुद्धता आतून व बाहेरून दोन्ही ठिकाणी असावी लागते. शुद्ध विचारांच्या रूपाने आतून शुद्धता, तर बाहेर  स्वच्छ व नीटनेटके राहण्याने बाह्य शुद्धता साधायची असते.
दैवाने जे मिळेल त्यात समाधान मानणे हा *'संतोष'* होय. मनात जर संतोष असेल तरच माणसाचे धावणे कमी होते. ही वृत्ती येण्यासाठीच तप हा पुढचा नियम सांगितलेला आहे.
भगवंतांच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील राहणे, त्यासाठी शरीराचे चोचले न पुरवता त्याला कष्ट देणे हे *'तप'* होय. यासाठी मुमुक्षुता, तितिक्षा व अहंकाररहित आचरण अशी तीन व्रते आधी साधावी लागतात.
वेदांनी सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास व सद्गुरूंनी दिलेली साधना निष्ठेने, नेमाने व प्रेमाने करणे हाच *'स्वाध्याय'* म्हटला जातो.
प्रत्येक प्रसंगात, दैनंदिन कामांमध्ये सतत श्रीभगवंतांचे तसेच श्रीसद्गुरूंचे स्मरण ठेवणे म्हणजेच *'ईश्वरप्रणिधान'* होय.
या पाच नियमांच्या पालनाने आपल्या मन, बुद्धी, चित्त व अहंकार या अंत:करण-चतुष्टयाची शुद्धी होते. काल सांगितलेल्या पाच यमांबरोबर हे पाच निमयही सद्गुरुकृपेने लाभलेल्या संकीर्तन भक्तीमध्ये आपोआपच त्या  साधकाकडून पाळले जातात.
प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी आपल्या *"साधना सर्वस्व"* या श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अत्युत्तम ग्रंथामधील *'येणें यमनियमांचेनि तळवटे'* या लेखात या दहाही यमनियमांवर नेमकी उदाहरणे घेऊन सविस्तर प्रकाश टाकलेला आहे. जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी ते आवर्जून वाचावेच, ही विनंती.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

25 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५८ ॥*

सद्गुरु श्री माउली महात्म्यांची लक्षणे सांगताना यम-नियमांचा उल्लेख करतात; म्हणून आपण त्यांची थोडक्यात माहिती घेत आहोत.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत.
काया, वाचा व मनाने कोणालाही शारीरिक व मानसिक पीडा न देणे ही *'अहिंसा'* होय. सद्गुरु श्री माउलींनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात यावर अलौकिक भाष्य केलेले आहे.
आपल्या ज्ञानेंद्रियांनी अनुभवलेले ज्ञान जसेच्या तसे सांगणे हे *'सत्य'* होय. परब्रह्मच सत्य असून बाकी सर्व मिथ्या आहे, ही दृढ भावना ठेवणे हेच सत्य होय. नेहमी सत्य वर्तन ठेवणे, सत्याची कास न सोडणे हे साधकांसाठी आवश्यक मानलेले आहे.
दुस-याच्या गवतासारख्या तुच्छ गोष्टीवरही अापले मन न जाणे, कोणाचीही कसलीही वस्तू त्याच्या नकळत न घेणे किंवा न चोरणे हे *'अस्तेय'* होय.
स्वपत्नी/स्वपती व्यतिरिक्त इतर सर्वांच्या विषयी उदासीनता ठेवणे, मनात कसलीही कामभावना येऊ न देणे हे *'ब्रह्मचर्य'* होय. आपले मन सतत ब्रह्मभावात ठेवणे म्हणजेच श्रीभगवंतांच्या स्मरणात ठेवणे, हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मचर्य होय.
कोणत्याही वस्तूंचा आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह न करणे म्हणजेच *'अपरिग्रह'* होय. अति परिग्रहाने नसत्या उचापती वाढतात, त्यामुळे त्यांची उस्तवारी करण्यात साधकाचा प्रचंड वेळ वाया जातो, चित्त सतत व्यग्र राहते व परमार्थसाधना मागे पडते. म्हणून अपरिग्रहाला खूप महत्त्व दिलेले आहे.
सद्गुरुकृपा झाली व मनापासून नेमाने साधना होऊ लागली की, अतिशय कठीण असणारे हे पाचही यम त्या साधकाला आपोआप जमायला लागतात. एरवी स्वत:च्या बळावर कितीही प्रयत्न केले तरी या पाच गोष्टी साधणे केवळ अशक्य आहे !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२३ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५७ ॥*

महात्म्यांच्या कृपेने आपोआप होणा-या संकीर्तन-भक्तीमध्ये, त्या साधकाकडून यम व नियम सहजगत्या पाळले जातात; असे सद्गुरु श्री माउली सांगतात. भगवान पतंजली महामुनींच्या योगसूत्रांनुसार, *अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे पाच 'यम' आहेत; आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच 'नियम' आहेत.* परंतु जाबालदर्शनोपनिषदामध्ये भगवान श्रीदत्तप्रभूंनी दहा यम व दहा नियम सांगितले असून, प.प.श्री.टेंब्ये स्वामीमहाराज देखील आपल्या 'योगरहस्य' ग्रंथात तेच दहा यमनियम सांगतात.
यमांच्या माध्यमातून मनुष्याला इतर लोकांशी कसे वागावे याचा आदर्श समजून येतो. यांचे पालन केल्याने आपले इतरांशी असलेले संबंध उत्तम होतात. तर नियमांच्या पालनाने आपले आपल्या स्वत:शी असलेले वैयक्तिक वर्तन व आपले चित्त, आपले अंतरंग शुद्ध होते. या दोन्हीचा सुयोग्य परिपाक झाला की साधक पूर्ण सद्गुणी होतो व त्याला योगसाधनेचा विशिष्ट अधिकार लाभून त्याच्याकडून उत्तम साधना घडून त्याचा परमार्थ सुफळ होतो. सद्गुरु श्री माउली सांगतात की हे यमनियम संकीर्तनभक्तीत श्रीगुरुकृपेने त्या साधकाच्या ठायी आपोआपच प्रकट होत असल्याने; त्यांचे वेगळे, मुद्दाम कष्टपूर्वक आचरण करावे लागत नाही !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

22 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२२ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५६ ॥*

महात्म्यांच्या संकीर्तनाचे अलौकिकत्व सांगताना सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "महात्म्यांच्या या कीर्तनरूप भक्तीने यमदमादिक साधने निर्बल ठरतात. मन:संयमाला कामच राहत नाही. इंद्रियांचे दमन करावेच लागत नाही."
कोणतीही साधना करण्यासाठी आधी काही विशिष्ट पात्रता साधकाच्या अंगी असावी लागते. त्यात यम व नियम हे प्रमुख आहेत. एकूण पाच यम व पाच नियम सांगितलेले आहेत.
याबद्दल प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज फार सुंदर सांगत की, "दुस-याशी कसे वागावे याची आखणी म्हणजे 'यम' आणि स्वत:शी कसे वागावे याचे ज्ञान म्हणजे 'नियम' !"
महात्म्यांच्या कृपेने होणा-या या संकीर्तन भक्तीमध्ये हे यम-नियम आपोआपच होऊ लागतात. प्रयत्न न करताच मनाचा संयम होऊ लागतो आणि इंद्रियांचे दमनही त्या संकीर्तनामुळे कष्ट न करताच होते.
प.पू.मामांच्या सांगण्याचा उद्या आपण आणखी थोडा विचार करू !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

21 May 2017

॥ अमृतबोध ॥२१ मे २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १५५ ॥

संत आपल्या अथक परमार्थसाधनेने स्वत: तर उद्धरून जातातच, पण तेवढ्यावर थांबले तर ते संत कसले? ते जनांच्या तीव्र कळवळ्याने आपल्यासोबत असंख्य दु:खी-कष्टी जीवांचाही उद्धार करतात. लोकांना बाबा-पुता करून परमार्थ समजावण्याचे हे मोठ्या कष्टाचे कामही ते निरलसपणे, निरपेक्षपणे सेवावृत्तीने करतात. त्याविषयी प्रत्यक्ष श्रीभगवंत अर्जुनाला सांगतात की, "महात्मे आपल्या कीर्तनरूप भक्तीने, पापक्षालनासाठी तीर्थयात्रादिक साधनांची आवश्यकताच न राहिल्यामुळे, त्यांना ओस पाडून टाकतात. यमलोकीची राहाटीच खुंटवतात."
तीर्थयात्रा केल्याने थोडेबहुत पाप नष्ट होते. पण त्याचे नियमही खूप असल्याने त्यातून म्हणावा तेवढा लाभ होत नाही, वरून प्रवासाचे तसेच गैरसोयीचे कष्ट होतात ते वेगळेच. पण नामसंकीर्तनरूप भक्तीने असले कोणतेही कष्ट न होता सुलभपणे पापक्षालन होते. महात्मे आपल्याबरोबर इतरांनाही भक्ती करायला लावून हे अलौकिक भाग्य तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांनाही कमी कष्टात प्रदान करतात. त्यामुळे यमलोकातील रौरव, तामिस्र, अंधतामिस्र इत्यादी विभिन्न नरकांची वर्दळच संपून जाते. पापच राहिले नाही तर ते भोगायला नरकात तरी कशाला जावे लागेल?
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

20 May 2017

॥ अमृतबोध ॥ २० मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १५४ ॥

॥ अमृतबोध ॥
२० मे २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - १५४ ॥
भगवत्स्वरूप झालेल्या महात्म्यांच्याकडून होणारे अलौकिक संकीर्तनाचे महिमान स्वत: श्रीभगवंत स्वमुखाने अर्जुनाला सांगताना म्हणतात, "हे महापुरुष अत्यंत प्रेमभराने नित्य माझे नामसंकीर्तन करीत असतात आणि त्यामुळे त्यांना पापक्षलनार्थ इतर खटपटींची जरूर न राहता ते निष्पाप बनतात."
नामाचे संकीर्तन हे विशेष साधन आहे. नाम घेणे व त्याचे संकीर्तन करणे हे भिन्न आहे. सद्गुरुकृपेने त्या नामस्मरणाचे संकीर्तन होते. अतीव प्रेमभराने ते संकीर्तन होऊ लागल्यावर, पापाची नामोनिशाणीही शिल्लक राहात नाही. म्हणूनच पापक्षालनासाठी वेगळ्या खटपटी करण्याची मग आवश्यकताच उरत नाही. श्रीसद्गुरुकृपेने होणा-या त्या नामसंकीर्तन-भक्तीने ते महात्मे निष्पाप बनतात !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

19 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१९ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५३ ॥*

श्रीभगवंत अर्जुनाला ख-या महात्म्यांची लक्षणे सविस्तर सांगत आहेत. देव म्हणतात, "ते महात्मे ज्ञानाच्या श्रेष्ठ अनुभवाला पावून, आपल्या ठायी शोभणा-या दैवी प्रकृतीला सतेजता आणून आणि सर्व जग मद्रूप जाणून, नित्य वाढत्या भक्तिभावाने सतत माझे अनुसंधान करतात."
ज्ञानाची श्रेष्ठ भूमिका म्हणजे, मी भगवत्स्वरूप आहे हे जाणणे, *"अहं ब्रह्मास्मि ।"* चे ज्ञान होणे. या भूमिकेला पोहोचूनही महात्म्यांची भक्तिभावना काही कमी होत नाही. मी अाणि माझे भगवंत एकच आहोत, हे जाणूनही त्यांचा प्रेमभाव सतत वाढताच राहतो. त्यांचे श्रीभगवंतांचे अनुसंधान त्या ज्ञानामुळे संपून न जाता, उलट अधिक गहिरे होत जाते. यालाच श्री माउली 'अद्वैती भक्ती' म्हणतात. ही 'ज्ञानोत्तर भक्ती'च खरी भक्ती होय. असे महात्मे हे आपल्या ठायी त्या भक्तीमुळे प्रकटलेल्या दैवी सद्गुणांना आणखी उजाळा आणतात. ते दैवी गुण या महात्म्यांच्या ठायी प्रकटल्यानेच अधिक शोभिवंत होतात, असे प्रत्यक्ष गुणनिधी श्रीभगवंत सांगत आहेत.
असे आत्मज्ञान होण्यापूर्वी केल्या जाणा-या व तुम्ही आम्ही नेहमी करीत असलेल्या गौणीभक्तीलाच 'उपासना' म्हटले जाते. ज्ञानापूर्वीची ती उपासना, ज्ञानोत्तर ती भक्ती; असेच शास्त्रप्रमाण आहे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

18 May 2017

॥ अमृतबोध ॥१८ मे २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १५२ ॥

महात्म्यांचे अलौकिकत्व सांगताना सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात, "महात्म्यांच्या सर्व इंद्रियांना शांततेने भूषविलेले असते; आणि त्यांच्या विशुद्ध चित्ताने श्रीभगवंतांच्या व्यापक स्वरूपाला कायमची गवसणी घातलेली असते."
साधू महात्म्यांच्या ठिकाणी शांतीचा अद्भुत विस्तार झालेला असतो. सामान्य माणूस क्रोधाविष्ट झाला की त्याचे सर्व शरीरही तसेच होते. त्या क्रोधाने त्याचे डोळे लालभडक होतात, ओठ थरथरू लागतात, श्वास लोहाराच्या भात्याप्रमाणे होऊ लागतो, हातपाय देखील थरथरायला लागतात, दात ओठ खात, मोठ्या आवाजात तो भराभरा बडबडू लागतो. पण महात्म्यांच्या नुसत्या चित्तातच शांती असते असे नाही, तर त्यांच्या सर्व इंद्रियांच्या ठायी देखील ती भरून राहिलेली असते. ते सहसा क्रोधाविष्ट होतच नाहीत.
एवढेच नाही तर, त्यांच्या चित्ताने अपरंपार अशा श्रीभगवंतांच्या व्यापक स्वरूपालाही कायमची पूर्ण गवसणी घातलेली असते. त्यांचे साधनेने विशुद्ध झालेले चित्त इतके मोठे होते की ते साक्षात् श्रीभगवंतांनाही गवसणी घालू शकते. हे सामर्थ्य फक्त महात्म्यांच्याच ठायी पाहायला मिळते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

17 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१७ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५१ ॥*

महात्म्यांचे वर्तन हा एक स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महात्म्यांच्या वागण्याचे महत्त्व सांगताना म्हणतात की, "त्यांच्या सहज आचरणात नीतीला जिवंतपणा येतो !"
धर्मशास्त्र हे आचरणाचे नियम आहेत. ते सर्वच्या सर्व महात्म्यांच्याच आचरणानुसार तयार झालेले आहेत. कसे वागावे व कसे वागू नये? हे महात्म्यांच्या वागण्यावरूनच ठरवले गेलेले आहे. त्यामुळे त्यांच्याच वागण्यातून खरी नीती जिवंत राहात असते. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी नेहमी महात्म्यांनी आपल्या ग्रंथांमधून उपदेशिलेल्या महात्म्यांच्या आचरणानुसारच वागावे, यातच आपले शाश्वत हित आहे. महात्म्यांचे आचरण पाहून आपल्याच मनाने तसे वागायचे नसते, महात्म्यांनी जसे सांगून ठेवलेले आहे, तसेच वागावे असे प.पू.श्री.मामा आवर्जून सांगत असत, हेही विसरता कामा नये. 
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

15 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१५ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५० ॥*

महात्म्यांची अद्भुत मनोभूमिका सांगताना सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात, "आपल्या भक्तिसुखाच्या अनुभवापुढे प्रत्यक्ष मोक्षालाही तुच्छ मानीत असतात."
मोक्षसुख हे जरी अपूर्व असले तरी, ज्या भक्तिसुखाचा मोह निरिच्छ, निर्मोही अशा साक्षात् श्रीभगवंतांनाही जिथे आवरत नाही, तिथे त्याच सुखाची तीव्र लालसा असणारे भक्तहृदयाचे महात्मे तरी कसे बरेे आवरू शकतील? त्यांचा जन्मच त्या भक्तिप्रेमाच्या आस्वादनासाठी झालेला असतो, म्हणून ते यच्चयावत् सर्व गोष्टी त्या अलौकिक भक्तिसुखासमोर तुच्छच मानतात. मोक्षाने काही क्षणापुरता तो आनंद लाभतो, पण भक्तिसुखात रममाण झाल्यावर त्या आनंदात कधीच न्यून येत नाही, तो आनंद क्षणोक्षणी वाढतच जातो. म्हणून या महात्म्यांना त्याचीच अत्यंत प्रीती असते !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

14 May 2017

॥ अमृतबोध ॥ १४ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४९ ॥

॥ अमृतबोध ॥
१४ मे २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - १४९ ॥
सद्गुरु श्री माउली महात्म्यांचे अलौकिकत्व सांगताना म्हणतात की, "हे महात्मे मोक्षाला फुटलेले कोंभच असतात. ते धैर्यगुणाचे आधारभूत स्तंभ असतात. निजानंदाने भरलेल्या समुद्रातून उचंबळून निघालेले नित्यप्रसन्न कुंभच असतात."
मोक्ष हा या महात्म्यांचा सहज विस्तारच असतो. ते मोक्षरूपच झालेले असतात. धैर्य या सद्गुणाचे तेच आधारस्तंभ असतात, म्हणूनच महात्म्यांच्या संगतीत किंवा त्यांच्या कृपेने सर्वसामान्य माणसालाही सर्वप्रकारचे धैर्य प्राप्त होत असते. त्यांच्या संगतीत धैर्य पैसावते.
उचंबळणा-या निजानंदरूप समुद्रातून भरून काढलेले आनंदकुंभ असतात हे महात्मे. त्यामुळेच त्यांच्या आतबाहेर तोच निजानंद व्यापून राहिलेला असतो. ते महात्मे आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्याच अलौकिक आनंदाचे भरभरून दानही देत असतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

13 May 2017

॥ अमृतबोध ॥१३ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४८ ॥

॥ अमृतबोध ॥
१३ मे २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - १४८ ॥
महात्म्यांची आणखी गुणवैशिष्ट्ये सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "हे महात्मे ज्ञानगंगेत नित्य स्नान करून, परिपूर्ण अनुभवाचे नित्य भोजन करीत असतात. आणि त्यांच्या ठिकाणी आत्मसमाधान अंकुरित झाल्याप्रमाणे दिसते."
लौकिक गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होऊन कालांतराने मोक्ष मिळतो. पण हे महात्मे नित्य त्या ज्ञानगंगेतच स्नान करीत असल्यामुळे सदैव मोक्षस्थितीतच वावरतात. शिवाय ते निरंतर आत्मानुभवरूप अन्नाचेच भोजनही करीत असतात. त्यामुळे आत्मसमाधानाचा अंकुर त्यांच्या हृदयी बहरलेला असतो. त्यांची ही अद्भुत स्थिती सर्वसामान्यांच्या कल्पनेतही बसणारी नाही.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

12 May 2017

॥ अमृतबोध ॥१२ मे २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १४७ ॥

महात्म्यांची आणखी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "धर्माविषयी या महात्म्यांना पूर्ण आस्था असते आणि त्यांचे मन नेहमीच सद्सद्-विवेकाचे पोषण करीत असते."
धर्म म्हणजे; मनुष्यजन्माला येऊन कसे वागावे? कसे वागू नये? याचे स्वानुभवी सिद्ध-महात्म्यांनी, ऋषिमुनींनी घालून दिलेले व स्वत: देखील आचरलेले नियम. यानुसार जो वागेल तो नि:संशय सुखी व समाधानी जीवन जगेल. असे सात्त्विकतेने जगल्यामुळे मनुष्याचे संपूर्ण आयुष्य आनंदातच व्यतीत होते. अशा लौकिक अभ्युदय व पारमार्थिक नि:श्रेयसकर धर्माविषयी महात्म्यांच्या मनात अतीव प्रेमादराची, आस्थेची भावना असते.
धर्मानुसार आचरण केल्यावर आपोआपच माणसाच्या मनात सत् काय व असत् काय याचा विवेक पूर्ण कार्यरत होतो. मग त्याच्याकडून कधीच चुकीचे व पुढे जाऊन पश्चात्ताप करावा लागेल असे वर्तन घडत नाही. महात्म्यांच्या ठायी हा विवेक परिपूर्णतेने प्रकटलेला असतो. त्यामुळेच अशा महात्म्यांना प्रमाण मानून वागणारे लोकही कालांतराने शाश्वत सुखी होतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

11 May 2017

॥ अमृतबोध ॥ ११ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४६ ॥

महात्म्यांचे दुसरे वैशिष्ट्य सद्गुरु श्री माउली सांगतात की, त्यांचे वैराग्य झोपेतही कायम असते.
वैराग्य म्हणजे कोणत्याही सुखोपभोगांविषयीची अनास्था. माणूस एखाद्या गोष्टीचा वरकरणी कितीही आव आणत असला, तरी झोपेतील बेसावध क्षणी त्याचे सत्य बाहेर पडतेच. यासंबंधातली नाना फडणवीसांची अनोळखी माणसाची मातृभाषा ओळखून दाखविण्याची चातुर्यकथा आपल्याला माहीतच आहे.
सद्गुरु माउली म्हणतात, या महात्म्यांच्या ठायी वैराग्य इतके दृढ झालेले असते की, झोपेतही ते नष्ट होत नाही. कार्यरत मनात तर ते वैराग्य असतेच पण सुप्त स्थितीतही ते जागते असते. देह झोपलेला असला तरी हा वैराग्यसूर्य त्याच्या अंतरी कायमच पूर्ण प्रकाशाने तळपत असतो. अशी तीव्र वैराग्याची स्थिती हे महात्म्यांचे भूषणच होय !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

10 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१० मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४५ ॥*

सद्गुरु श्री माउली म्हणतात की, ज्याचे पूर्वसुकृत उदयाला येते, त्यालाच संतसंगतीची आस लागते व दैवयोगाने संतांची संगतीही लाभते.
पण आता महत्त्वाचा प्रश्न येतो, खरे संत ओळखायचे कसे? कारण संत हेही दिसायला आपल्याचसारखे असतात. वागतात बोलतातही सामान्यांसारखेच. शिवाय कसलाही बडेजाव करीत नाहीत, मग त्यांना ओळखणार तरी कसे? त्यातच हा काळ असा आहे की यात भोंदूंचाच भरणा जास्त आहे. ही अडचण लक्षात घेऊन प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज या अभंगाच्या विवरणात, सद्गुरु श्री माउलींनी श्रीज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात सांगितलेली महात्म्यांची लक्षणे मुद्दामच सविस्तर समजावून सांगतात. आपणही त्या विवरणाचा आता अभ्यास करूया.
श्रीभगवंत अर्जुनाला दैवी सामर्थ्याने संपन्न असलेल्या महात्म्यांची वैशिष्ट्ये सांगताहेत.
ते म्हणतात, "महात्म्यांचे मन हे अत्यंत निर्मळ असते. त्यांच्या मनात कसलेच कपट किंचितही नसते. अशा निर्मळ चित्तात मी क्षेत्रसंन्याशाप्रमाणे कायमचा वस्ती करून असतो." क्षेत्रसंन्यासी म्हणजे जो मरेपर्यंत त्या क्षेत्राची सीमा ओलांडून बाहेर जात नाही तो. तसे हे दुर्लभ श्रीभगवंत त्या महात्म्याच्या चोख अंत:करणाची सीमा ओलांडत नाहीत. म्हणजेच त्यांच्या मनातून क्षणभरही बाहेर जात नाहीत. हे त्या महात्म्यांचे फार मोठे गुणवैशिष्ट्यच म्हणायला हवे. एरवी या भगवंतांचे अवघ्या एका क्षणासाठीही दर्शन जिथे जन्मजन्मांतरीच्या कष्टांशिवाय होत नाही; ते भगवंत या महात्म्यांच्या चित्तात अखंड विराजमान असतात, यातच त्या महात्म्यांचे महात्मेपण दिसून येते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates