Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

25 August 2022

श्रीपादवचनसुधा - ५

शक्तिजागृतीची मागणी हाच 'जोगवा' :

ती महाशक्ती श्रीसद्गुरुकृपेने प्रकट झाल्यानंतर त्रिविध तापांची समूळ झाडणी करते. त्यामुळेच श्रीसंत एकनाथ महाराजांनी असे म्हटले आहे की;
त्रिविध तापांची करावया झाडणी ।
भक्तांलागोनी पावसी निर्वाणीं ॥१॥
भक्तांच्या म्हणजेच साधकांच्या त्रिविध तापांची झाडणी करून, श्रीभवानी त्यांना निर्वाणपद प्राप्त करून देत असते.
आता हा भक्त कसा हवा ? तर श्रीगुरूंनी कृपा करून शक्ती जागृत केल्यानंतर, अभ्यासाची युक्ती व ज्ञान दिल्यानंतर, त्या भगवती शक्तीवर पूर्णपणे अवलंबून राहून श्रद्धेने व भक्तियुक्त अंतःकरणाने, प्रेमाने नित्य साधना करणारा असा तो भक्त हवा. मग असा जो भक्त असेल, तोच खरोखर जोगवा मागू शकतो.
ऐसा (आईचा) जोगवा जोगवा मागेन । (२)
हा भक्त श्रीगुरूंजवळ अशी याचना करतो की "माझ्या शरीरात सुप्त असलेली भगवती शक्ती जागृत करून द्या. त्यासंबंधी ज्ञान व त्याची युक्ती द्या. मला साधनापथ दाखवा !"
'जोगवा' म्हणजे 'भिक्षा किंवा माधुकरी' नव्हे. 'जोगवा' याचा खोल अर्थ नीटपणे समजून घ्यायला हवा.
आपण भारतीय अनेक सण, उत्सव साजरे करतो. पण नवरात्र महोत्सव प्रत्येक घरी जेवढ्या पवित्रतेने, आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो, तेवढा इतर कुठलाच उत्सव साजरा होत नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर गणेशोत्सवाचे घेऊ या. हा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतो खरा; पण त्याचा मूळ उद्देश, त्याचे मर्म जाणून किती लोक तो साजरा करतात ? त्यात पवित्रता पाळली जाते का ?
हो जो मूळ उत्सव आहे, तो गौरी-गणपतींचा. एखादी माउली आपल्या मुलाला स्वतःच्या माहेरी पाठवते व नंतर स्वतः येऊन त्यास घेऊन जाते. तद्वतच चतुर्थीस गणपती येतात, सप्तमीस गौरी येतात, अष्टमीस जेवतात व नवमीला म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरी-गणपती विसर्जित होतात. हा सण साजरा करण्याचा हा खरा धर्म होय. हीच या उत्सवाची खरी प्रथा आहे. म्हणूनच याला 'गौरी गणपती' हे नामाभिधान प्राप्त झाले. आता मंडळी त्यातही सोय, गैरसोय बघतात. म्हणून मग कोणाचा दीड, कोणाचा पाच, कोणाचा सात, कोणाचा नऊ व कोणाचा दहा दिवसांचा गणपती असतो. परंतु नवरात्र हे नऊ म्हणजे नऊ रात्रीचेच असते व तसेच असावे लागते. त्यात सोय बघता येत नाही. म्हणूनच त्यात आजपर्यंत काही बदल झालेला नाही.
- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.
(प.पू.श्री.मामांच्या 'अनादि निर्गुण प्रकटली भवानी' या ग्रंथामधून संकलित.
संकलक - श्री रोहन ऊपळेकर)
www.sadgurubodh.blogspot.com
Read More

22 August 2022

श्रीपादवचनसुधा - ४

भजनाचा गूढ अर्थ :

राधा गवळण करिते मंथन ।
अविरत हरिचे मनात चिंतन ॥

श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा उल्लेख नाही. पण 'गोविन्ददामोदर स्तोत्रा'त असे म्हटले आहे की; 
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।
हे नाथ नारायण वासुदेव ॥ (गो.स्तो.७०)
यातील पहिला चरण पाहा; 'श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।' म्हणजे काय? 'श्री' नाम शक्ती. लहानपणात बाळसे धरणारी जी शक्ती, तिला 'श्री' म्हणावे. पुढे मोठेपणी हीच शरीरातील 'श्री' 'कृष्ण' असते, ती विजेसारखी वक्र असते. मग ही श्रीकृष्ण-विद्युत समजा प्रकट झाली; तर काय करेल ? तर 'गोविंद' करेल. 'गो' नाम इंद्रिये, त्यांचे ती विंदाण करील, म्हणजे वासना जाळील. 'श्रीकृष्ण गोविंद हरे' म्हणजे दुःख हरण करील आणि सुख देईल.
आता काय राहिले ? तर, 'मुरारे ।'. याचे काय तंत्र आहे ? एका माणसाने आपल्या बायकोला मोठे मोठे आवळे आणून दिले. तिने लगेच चोचणी घेऊन ते चोचवले आणि पाकात टाकले. इकडे ऑफिसमध्ये त्या बाप्याचे आणि साहेबाचे कडाक्याचे भांडण झाले, त्याचे पित्त उठले, म्हणून डोके धरून तो घरी आला. त्या सुगरणीने काय केले ? तर दुपारी घातलेला 'मोरावळा' त्याला आणून दिला. तेव्हा तो म्हणाला; "अगं; ह्याने काय होणार ? ती मागच्या वर्षीची मुरलेल्या आवळ्यांची बरणी आण !” 'मुरारे' म्हणजे काय ते आले का ध्यानात ? “हे भक्तांनो, हे साधकांनो, अरे परमार्थात मुरा ! म्हणजे साधना करा !"
आता, 'राधा' म्हणजे काय ? तर 'र- आधा'. 'आधारद्रुमाच्या बुडीं । (ज्ञाने. ६.१२.१९३)' , हीच राधा. म्हणून बसताना ते जाणून बसायचे. पहिले आसन राधा, मग कृष्णशक्ती, मग प्राणायाम. आधी आसन, मग प्राणायाम. 'वरी प्राणायामाचीं मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥ ज्ञाने.९.१४.२१३ ॥' ; यंत्र चालू करून दिले की, गाडी चालते झुक् झुक्. आपण फक्त बसायचे; शक्ती स्वतःच कार्य करते. या ठिकाणी हेच सांगितलेले आहे. पण असे मंथन मनामध्ये व्हायला पाहिजे.
- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.
(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)
www.sadgurubodh.blogspot.com
Read More

11 August 2022

श्रीपादवचनसुधा - ३

साधना 'निष्कामतेने' करायची असते :


साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाही. उलट पहाटे झोपमोड करून उठायचे, 'गुरुर्ब्रह्मा ...' म्हणायचे आणि साधनेला बसायचे, त्यात काय सांगितले आहे हरी जाणे. या प्रक्रियेत फायदेशीर काय आहे ? चहा, कॉफी वगैरे काही मिळणार आहे का ? काही नाही. मग कशाला सांगितले आहे कोणास ठाऊक ? म्हणजे हे 'निष्काम' आहे. हे निष्काम साधन आहे आणि शिवाय 'कैवल्यरसे वोगरलीं ।'.

'वोगरणे' म्हणजे वाढणे. जो आपली साधना अशी नियमाने व प्रेमाने करतो, त्या माणसाला ही भगवती शक्ती काय पाहिजे ते देते. त्याला काय द्यायचे ? हे तिला आपोआप कळते. म्हणून माउलींनी, अठराव्या अध्यायात एक सुंदर ओवी घातलेली आहे;

जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाकल्पतरो ।

स्वसंविद्रुमबीज प्ररो - । हणावनी ॥ज्ञाने. १८.०.१०॥ 

"हे भगवंता; मला कल्पना करता येत नाही आणि आपण कल्पतरू आहात. तेव्हा मला काय पाहिजे तेही आपणच जाणता !"

मी काय करतो ? तर फक्त सेवा ! म्हणजे साधना. मला काही कळत नाही, मी फक्त बैठक करतो. अशा भावाने जे करणे, त्यालाच 'निष्कामता' असे म्हणतात. निष्कामता म्हणजे पगाराचे आलेले पैसे वाटणे असा अर्थ नाही. किंवा निष्काम सेवा म्हणजे महिनाभर काम केले पण पगारच घेतला नाही, असेही नव्हे. निष्कामता म्हणजे, श्रीभगवंतांजवळ जाताना फक्त शुद्ध-प्रेमाने आणि निरिच्छपणे जाणे ! 


- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज. 


(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)

Read More

4 August 2022

श्रीपादवचनसुधा - २

साधनाच महत्त्वाची :-


आपल्या मनाला दूर करण्याचे जे साधन आहे; तिचेच नाव 'शक्ती'. अशी ही शक्ती श्रीसद्गुरुकरुणेने माणसाला मिळते. पण त्याने साधनाच केली नाही तर ? सर्व सामान आणून दिले. बटाटेवडे करायची सर्व तयारी आहे. घरातली बाई दहा वेळा म्हणाली; 'बटाटेवडे करीन !" म्हणून नवरा खूश; पोरेही खूश. पण प्रत्यक्षात जेव्हा पानावर बसली, तेव्हा बटाटेवडे नाहीत ! बाईची काय लहर फिरली कोणास ठाऊक ! मग ती पोरे लागली ओरडायला. बाई म्हणाली; "मी बोलले नव्हते का दहा वेळा ? बटाटेवडे करीन म्हणून !" पण केवळ दहा वेळा म्हटले म्हणजे वडे तयार होतात का ? त्याकरिता पीठ भिजवले पाहिजे. चूल पेटवून तेल टाकून कढई तापवली पाहिजे. मग बटाटेवडे तळले पाहिजेत. नुसते दहा वेळा म्हटल्याने वडे तयार होत नाहीत. तशीच परमार्थप्राप्तीकरिता साधना देखील केलीच पाहिजे.

गुरुकृपा झाली ।

इमारत फळा आली ॥ स.सं.ब.३१.१ ॥ 

श्रीगुरुकृपा झाली म्हणजे काय झाले ? तर फक्त प्लॉट मिळाला. अजून वरची इमारत बांधायचीच आहे. शक्ती मिळाल्यावर काय होते ? तर फक्त भूमी तयार होते. भूमिपूजन फक्त झाले आहे. आता वरची इमारत तुम्हीच बांधावयाची आहे. मग त्याकरिता राबणे आले.

अनुभवी कोण ? असा जो नित्यनियमाने, प्रेमाने साधना करणारा साधक आहे तो. आणि तोच साधक, साधना करता करता सिद्ध होतो. असा जो सिद्ध आहे, तो कुठे असतो ? तर याच देहात असतो. पण त्याला 'विदेही' असे म्हणावे. म्हणून त्याचा अनुभव जर घ्यायचा असेल, तर आपली साधना ही आपण नियमितपणे आणि प्रेमाने केलीच पाहिजे !


- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज. 


(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)

Read More

28 July 2022

श्रीपादवचनसुधा - १

संतवचनांच्या शांतस्निग्ध प्रकाशाने आपल्या चित्तातील अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो आणि त्या अमृतमय बोधप्रकाशाने आपले अंत:करण उजळून निघते. उत्तरोत्तर त्या ज्ञानप्रकाशाचे प्रेमादरपूर्वक अनुसरण केल्यास आपले संपूर्ण आयुष्यच उजळून निघते.

आज गुरुपुष्य-अमृतसिद्धियोग आणि दीप अमावास्या. त्यानिमित्त विलक्षण ऋतंभरा-प्रज्ञेचे महान आचार्य आणि संतवाङ्मयाचे रसज्ञ जाणकार प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या वाङ्मयातील अमृतोपम बोध-दीपांचा 'श्रीपादवचनसुधा' हा नवीन उपक्रम आजपासून सुरू करीत आहोत. प्रत्येक गुरुवारी ही बोधमय 'श्रीपादवचनसुधा' आपल्याला प्राप्त होईल. आपण सर्वांनी ह्या मार्मिक बोधवचनांचे मनन-चिंतन करून स्वहित साधावे ही प्रार्थना !

'ह्या करुणापूर्ण शब्ददीपांच्या तेजस्वी प्रकाशाने तुम्हां-आम्हां सर्वांचा साधनापथ उजळून निघो, अमृतमय होवो' याच मन:पूर्वक शुभेच्छा !!


श्रीपादवचनसुधा - १


साधनेने उणेपणा जातो : 


नियमित केलेल्या साधनेने जसे शरीरातील उणेपण निघून जाते, तसाच मनातील उणेपणाही कमी होत जातो.

आम्ही काय करतो ? तर पुण्य जमवितो आणि पाप भोगतो. संतांना सुद्धा दुःखे वाट्याला येतात. आम्हांला काहीजण विचारतात की, “जे लोक खून-बिन करतात, त्यांचे काय होते ?” तर त्यांचा पुण्यक्षय होतो. तेच पुढे महारोगी होतात. संत-महात्मेही पाप व पुण्य घेऊनच जन्माला येतात; पण ते आनंदाने दुःख सोसतात व समाधानाने नवीन पुण्यसंचय करतात. त्यामुळे त्यांचे या जन्मीचे पुण्यकर्म व मागील जन्मीचे पुण्यकर्म असे एकवटून येते व ते मोठे होतात.

पण अशा मिळालेल्या मोठेपणाचा जर कोणी दुरुपयोग केला आणि तशी दुर्बुद्धी झाली, तर मग मात्र खेटे बसतात. साधना मिळालेल्या माणसाला, नियमाने आणि प्रेमाने साधना करणाऱ्या माणसाला मात्र सहसा तशी बुद्धी होतच नाही. कारण 'सदा संतांपाशीं जावें । (स्तो.सं.२५८.१)', या उक्तीप्रमाणे, खऱ्या संत-सद्गुरूंपाशी गेल्याने काय होते ? तर परब्रह्म साक्षात्काराला तो साधक योग्य होतो व देव त्याला दर्शन देतात !


- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.


(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates