23 October 2016

॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६

श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥ " प्रत्येक साधकाला या युद्धाची सतत अनुभूती येतच असते. बाहेरचे शत्रू परवडले पण आतले फार भयंकर. ते हिताचे नसून शत्रू आहेत, हेच कळायला खूप उशीर होतो. साधकाने नेहमी सावध असावे, असे संत म्हणतात ते यासाठीच.
साधकाच्या या चार प्रमुख शत्रूंची प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज इथे अगदी नेमकी ओळख करून देत आहेत. आळस, झोप, भूक आणि संशय हेच ते चार भयंकर शत्रू आहेत.
आळस तर आपला लंगोटीयार आहे. त्याची पाठची बहीण झोप;  या दोघांची सख्खीचुलत बहीण भूक. हे एकाच कुळातले तिघे मिळून आपल्याला पुरते नागवतात. साधना करायची कधी नव्हे ती इच्छा बळावली की आळस येतो, त्याचा हात धरून झोपही येतेच. हे होत नाही तोवर भूक लागते. भुकेची मर्यादा पाळता येत नाही, म्हणून मग गरजेपेक्षा जास्तच खाल्ले जाते व त्यातून पुन्हा आळस, सुस्तीच वाढते. असे हे नष्टचक्र चालूच राहते आणि साधना करायचे शेवटी मनातच राहून जाते.
संशय मात्र फारच भयंकर शत्रू आहे, अगदी शकुनीमामा सारखा पाताळयंत्री व घातक. तो कधी काय रूपाने डोके वर काढेल सांगताच येत नाही. त्याचा नाश केवळ आपली श्रीगुरूंवरील दृढ श्रद्धा व आपले डोके न चालवता त्यांची आज्ञा जशीच्या तशी पाळणे, याच दोन महापराक्रमी वीरांना करता येतो. म्हणून साधकाने आपली ही दोन कर्तव्ये मात्र प्राणपणाने पाळली पाहिजेत. तरच या युद्धात हमखास विजय प्राप्त होतो !!
प. पू. श्री. मामा यात खूप मोलाचे साह्य करणारे साधकाचे चार मित्र देखील सांगतात, ते आपण उद्या पाहू. तोवर या शत्रूंचा पुरता हिशोब चुकता करून ठेवायला हवा आपल्याला.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates