26 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०० ॥*

कालच्या 'अमृतबोध'मध्ये उल्लेख केलेल्या, भगवान श्रीसदाशिवांच्या विशेष संदर्भाचा आज आपण विचार करणार आहोत. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे शब्दयोजनेतले एकमेवाद्वितीयत्व यातून स्पष्ट दिसून येते.
माउली श्रीभगवंतांच्या मुखाने सांगतात की, "या थोर भक्तांचे चरणतीर्थ अवघे त्रैलोक्य मस्तकी धारण करते. आपल्या भक्तांना कसा आदर द्यावा त्याचे धडे भगवान सदाशिवांकडूनच घ्यावेत. त्यांची स्तुती केली तर पर्यायाने आमचीच स्तुती केल्यासारखे होते, तेव्हा तो विषय आम्ही सोडून देतो." वरवर पाहता या तीन वाक्यांमधील परस्परसंबंध कळत नाही. किंबहुना यात काही संबंध नसावाच, असेही वाटते. पण; हे सद्गुरु श्री माउलींचे शब्द आहेत, हे आपण विसरता कामा नये.
भगवान श्रीमहाविष्णूंच्या श्रीचरणांचे भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूतील पवित्र जलाने पूजन केले. त्यातून जे  चरणतीर्थ प्रवाहित झाले, तीच त्रिभुवनपावनी सुरसरी भगवती श्रीगंगा होय. म्हणून गंगेला 'हरिपदी' किंवा 'विष्णुपदी' देखील म्हणतात. भगवान शिव हे श्रेष्ठ विष्णुभक्त आहेत. आपल्या आराध्याचे चरणतीर्थ म्हणून त्या गंगेला भगवान श्रीशिवांनी सन्मानपूर्वक मस्तकावर धारण केलेले आहे. पण त्याचवेळी भगवान विष्णू हे श्रेष्ठ शिवभक्तही आहेत. त्यामुळे शिवांनी जरी आराध्य म्हणून विष्णुतीर्थ मस्तकी धारण केलेले दिसत असले; तरी दुस-या भूमिकेने पाहिले तर त्यानी आपल्या अनन्यभक्तालाच जणू त्यातून श्रेष्ठत्व प्रदान केलेले नाही का? इथेही साक्षात् श्रीकृष्ण परमात्मा सांगतातच ना, आम्ही आमच्या भक्तांना मस्तकावर धारण करतो. शिवाय श्रीहरींचे चरणतीर्थ असणा-या गंगेला त्रिभुवनातील तुमच्या आमच्यासारखे सर्व जीव सन्मानाने व वंदनपूर्वक मस्तकावर धारण करतातच.
सद्गुरु श्री माउलींनी एवढे सर्व संदर्भ या दोन-तीन ओव्यांमधून किती चपखलपणे व मोजक्या, नेमक्या शब्दांत व्यक्त केले आहेत पाहा. त्यांचे हे विवेचन-कौशल्य वादातीत अलौकिक व एकमेवाद्वितीयच म्हणायला हवे !
भक्तांचे (भगवान विष्णूंचे) चरणतीर्थ (गंगा) सर्व त्रैलोक्य मस्तकावर धारण करते. आपल्या भक्तांना (विष्णूंना) कसा आदर द्यावा, याचे धडे सदाशिवांकडून घ्यावेत (म्हणजे आपल्या भक्तांचे चरणतीर्थही शिवशंकर मस्तकावर धारण करतात; असा आदर द्यायचा असतो). आता जर शिवांची स्तुती केली तर पर्यायाने भगवान विष्णूंचीही स्तुती आपोआपच होणार. कारण; दोघेही एकमेकांचे अनन्यभक्त आहेत. दोघांचा अन्योन्य गुरुशिष्य-संबंध आहे. एवढा सर्व विषय माउलींनी अवघ्या या दोन-तीन ओव्यांमधून किती सुरेख पद्धतीने मांडलेला आहे पाहा. अद्भुत भाषाप्रभुत्व म्हणतात ते हेच !! म्हणूनच श्री तुकोबाराय सद्गुरु श्री माउलींची स्तुती करताना स्पष्ट सांगतात की,
*ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ।*
*म्हणती 'ज्ञानदेव' तुम्हां ऐसे ॥*
*तुका म्हणे नेणो युक्तीचिये खोली ।*
*म्हणूनि ठेविली पायी डोई ॥*
गेले शंभर दिवस आपण सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या कृपेने व त्यांनी केलेल्या श्रीहरिपाठाच्या अभंगांच्या अप्रतिम विवेचनाच्या साहाय्याने, 'अमृतबोध'च्या माध्यमातून नित्यनियमाने श्री माउलींच्या पायी डोई ठेवीत आहोत व यापुढेही रोजच ठेवणार आहोत. आपल्याले नि:संशय शाश्वत कल्याण करणा-या या बोधामृतपान-भाग्याचा, केवळ काही काळासाठी अमर करणारे ते अमृत पिणा-या स्वर्गीय देवादिकांनाही नक्कीच हेवा वाटत असेल, यात अजिबात शंका नाही ! आपणही हे माउलीकृपेचे पसाय असणारे देवदुर्लभ परमभाग्य सादर अनुभवावे, आस्वादावे हेच भले !!
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates