28 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०२ ॥*

श्रीभगवंत भक्तश्रेष्ठ अर्जुनाला सांगतात की, "अरे, आमच्याशी एकरूप होऊन सुद्धा आमची भक्ती करणा-या या अनन्य भक्तांवर आमचे एवढे प्रेम का असते माहीत आहे का? कारण ते सर्व सद्गुणांची खाणच असतात. इतका मोठा अधिकार असूनही ते पाण्याप्रमाणे निम्नप्रवाही बनून सर्वकाळी नम्रता राखून असतात. म्हणूनच आम्ही त्या भक्तांना वंदन करतो, डोक्यावर घेतो आणि प्रसंगी त्यांचे लत्ताप्रहारही सोसतो."
येथे सद्गुरु श्री माउली, श्रीभगवंत आपल्या छातीवर अभिमानाने वागवितात, त्या 'वत्सलांच्छना'च्या गोष्टीचा संदर्भ देत आहेत. ही कथा श्रीभगवंतांच्या अद्भुत भक्तवात्सल्याचे प्रसन्न प्रतीक आहे! 
एकदा भृगू ऋषींना मोठा यज्ञ करण्याची इच्छा झाली. त्या यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कोणत्या श्रेष्ठ देवांना द्यावा? हे ठरविण्यासाठी ते आधी स्वर्गात गेले. तेथे इंद्रदेव अप्सरांचे नृत्य पाहण्यात मग्न होते. त्यांनी भृगूंकडे लक्षही दिले नाही. आपल्या यज्ञासाठी इंद्र काही योग्य देव नाही, असे पाहून भृगू सत्यलोकात भगवान ब्रह्मदेवांकडे गेले. तेही आपल्या सृष्टीनिर्मितीत मग्न होते. तिथून ते कैलासलोकात भगवान शिवांकडे गेले. तेव्हा भोलेबाबा पार्वतीमातेबरोबर सुखसंवाद करीत बसलेले. त्यामुळे त्यांची भृगूंशी भेटच झाली नाही.
एवढ्या सगळ्या विचित्र अनुभवांनी चिडलेले भृगू शेवटची संधी म्हणून वैकुंठात भगवान विष्णूंकडे गेले. तेथे क्षीरसागरात देवाधिदेव शेषशय्येवर पहुडले होते व लक्ष्मीमाता त्यांचे पाय दाबत बसलेल्या. आपल्या यज्ञासाठी यातले कोणीच सुयोग्य नाही, असा विचार करून; व विष्णूंनी आपला काहीच आदरसत्कार केला नाही हे पाहून रागावलेल्या भृगूंनी झोपलेल्या देवांच्या छातीवर उजव्या बाजूला पायाच्या टाचेने प्रहार केला. दिसायला सारखेच असले तरी, लाथ मारणे व टाच मारणे यात सूक्ष्म फरक आहे. लाथ मारल्याने अपमान होतो, तर टाच मारल्याने कोप व्यक्त होतो, समोरच्याचा धिक्कार केला जातो. हा संदर्भ जाणूनच श्री माउली स्पष्टपणे *"तयाची टांच धरूं हृदयी आम्ही ॥"* असे म्हणतात.
छातीवर आघात झाल्याने योगनिद्रेतून भगवंत जागे झाले. सर्व परिस्थिती त्यांच्या एका क्षणात लक्षात आली. त्यांनी रागावलेल्या भृगूंकडे पाहून मोठ्या प्रेमाने विचारले, "मुनिवर, अहंकाराने व साधूंचा अनादर केल्याने कठीण झालेल्या माझ्या छातीमुळे आपल्या टाचेला काही दुखापत तर झाली नाही ना?" लौकिक दृष्टीने भृगूंनी देवांचा अपराधच केलेला होता. तरीही देवांचे हे विनम्रतेचे मधुर बोल ऐकून भृगूंचा राग शांत झाला व त्यांनी विष्णूंनाच तो अग्रपूजेचा मान दिला.
आपल्या लाडक्या वत्साच्या, भक्ताच्या या वेगळ्या प्रेमाची खूण म्हणून श्रीभगवंत आपल्या हृदयावर 'वत्सलांच्छन' ( वत्साच्या टाचेची खूण ) मोठ्या प्रेमादराने व अभिमानाने आजही वागवतात. याच कथेचा संदर्भ श्री माउली वरील ओवीत देतात. त्यातून ते श्रीभगवंत आपल्या भक्तांना किती प्रेमाने वागवतात व मान देतात हेच दाखवून देत आहेत. आई जशी आपल्या पोटच्या गोळ्याचे सर्व अपराध मनात कसलाही किंतू न आणता सहन करते, तिला त्याचे कसलेही वागणे कधीच त्रासदायक होत नाही; तसेच श्रीभगवंतही आपल्या भक्तांच्या बाबतीत वागतात. त्यांच्या त्या अलौकिक प्रेमभावाचे वत्सलांच्छन हे द्योतकच आहे !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates