25 December 2016

॥ अमृतबोध ॥ २५ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ९ ॥

भगवान सद्गुरु श्री माउली 'हरि मुखें म्हणा... ।' असा उपदेश करतात. माउली खरेतर अवघी एकच ओळ इथे सांगतात, पण त्यामागे आभाळाएवढा अर्थ त्यांना अभिप्रेत असतो. तो जाणायला त्यांची कृपाच हवी. त्यांची अपरंपार कृपा असल्यामुळेच, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज माउलींचे हृद्गत नेमकेपणे व्यक्त करीत असत. हरिपाठावरील त्यांचे हे गूढार्थपरिप्लुत विवेचन वाचले की हे बरोबर पटते. पू.मामांनी सांगितलेले हरिपाठाचे अनेक विशेष संदर्भ आजवर इतर कोणीच सांगितलेले नाहीत. त्यांपैकीच एक फार महत्त्वाचा व अनवट भाग आजच्या बोधातून आपण अभ्यासणार आहोत.
स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण असे जीवाचे चार देह असतात. या चार देहांच्या चार वाणी देखील असतात. वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा या अनुक्रमे त्यांच्या वाणी होत. या प्रत्येक वाणीद्वारे होणा-या नामस्मरणाचे भिन्न भिन्न फळ शास्त्रांनी सांगून ठेवलेले आहे, पण ते रहस्य फारसे प्रचलित नाही. 'हरि मुखें म्हणा'च्या निमित्ताने पू.मामा त्यावर प्रकाश टाकतात. ही अतिशय विलक्षण माहिती पहिल्यांदा त्यांनीच सर्वजनसुलभ केलेली आहे.
स्थूलदेहाच्या 'वैखरी' वाणीने जे नाम घेतले जाते ते पापक्षय करते. पूर्वी आपण केलेले पाप त्याने हळूहळू भस्म होते. या वाणीत नाम 'घ्यावे' लागते, आपोआप होत नाही. माउलींना 'हरिमुखे म्हणा' मधून हे वैखरीतले नाम अभिप्रेत नाही. कारण हे मोक्षप्राप्तीला उपयोगी ठरत नाही, तर केवळ पाप नष्ट करते.
सूक्ष्मदेहाच्या 'मध्यमा' वाणीचे दोन प्रकार आहेत. यात नाम घेता पण येते व आपोआपही होते. मध्यमेतील नामजपाने पुण्याचा साठा तयार होते. म्हणूनच,  'पुण्याची गणना कोण करी ।' मधून माउली याच मध्यमा नामजपाचा संदर्भ देतात. पण हेही नाम जन्ममृत्यूचा फेरा चुकवू शकत नाही. यासाठीच संत सांगतात की, मध्यमेने आधी नाम घ्यावे व हळूहळू आपोआप कसे होईल? हे पाहावे. म्हणजे नामाचा सतत 'आठव' कसा होईल? ते पाहावे. आठव म्हणजेच स्मरण.
नामाचा असा सतत आठव होऊ लागला की, नाम कारणदेहाच्या 'पश्यंती' वाणीने होऊ लागते. ही वाणी दर्शनासाठी सुप्रसिद्ध आहे. या वाणीतून नाम होऊ लागले की श्रीभगवंत सगुणरूपात पुढे उभे राहतात. श्री तुकाराम महाराज यासाठीच म्हणतात, ' नाम उच्चारितां कंठीं । पुढें उभा जगजेठी ।' मध्यमेत नाम होऊ लागले की पश्यंती आपोअापच प्रकट होत असते.
सगुण दर्शनानंतर तेच नाम महाकारणदेहाच्या 'परा' वाणीतून होऊ लागते व त्यानंतरच श्रीभगवंतांच्या निर्गुण स्वरूपाची अनुभूती येते. अशी अनुभूती येणे फार महत्त्वाचे मानले जाते.
या सगळ्या अनुभूती येण्यासाठी आधी श्रीगुरुकृपा व्हावीच लागते. केवळ आपल्या प्रयत्नांनी या क्रमाने कोणीच जाऊ शकत नाही. तरीही येथे शेवट झाला, असे मात्र म्हणता येत नाही, कारण या परेच्याही पलीकडे श्रीभगवंत असतात. तिथे कसे जायचे व त्यासाठी काय करायचे? याचेही पू.मामा स्वानुभूत विवेचन करतात, ते उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates