26 December 2016

॥ अमृतबोध ॥ २६ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १० ॥

काल आपण चार देहांच्या चार वाणींमधून झालेल्या नामजपाचा सखोल विचार केला. त्याच संदर्भात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आणखी काही महत्त्वाचे मुद्दे सांगतात, ते आता पाहू.
सद्गुरु श्री माउलींनी ' हरि मुखें म्हणा.. ' मधून वैखरीने होणारा नामजप सांगितलेला नाही. ते सांगतात तो जप कोणत्या मुखाने करायचा अाहे? हे आधी लक्षात घ्यायला हवे.
नाम तर कोणीही घेऊ शकतो, त्याला कसलेही बंधन नाही. पण कबीर महाराज सांगतात की, " रामनाम सब कोई कहे, ठग ठाकूर और चोर । जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरै, वह नाम है कुछ और ॥क.दो.१०३॥" रामनाम तर चोर, ठक आणि चांगला माणूस असे कोणीही घेऊ शकतो. पण ज्या नामामुळे ध्रुव प्रल्हादादी भक्त तरून गेले ते हे नव्हे. ते नाम काहीतरी वेगळेच आहे. या नामांचा वेगळेपणा अगदी अचूक शब्दांत सांगताना पू.मामा म्हणतात, " आपण मनाने जे घेतो ते नुसते 'नाम' आणि परंपरेने आलेले व श्रीगुरूंनी कृपापूर्वक दिलेले ते 'दिव्यनाम'. हे दिव्यनामच सर्वश्रेष्ठ होय ! "
समजा एखाद्याला सदिच्छा झाली म्हणून किंवा मनाला भावले म्हणून त्याने श्रीभगवंतांचे कोणतेही नाम जपायला सुरुवात केली, तर ते नुसतेच 'नाम' होय. पण आपल्या पूर्वपुण्याईमुळे, परंपरेने आलेल्या जाणत्या-दावित्या श्रीगुरूंनी जर कृपापूर्वक त्यांच्या परंपरेने आलेले नाम दिले, तर तेच 'दिव्यनाम' म्हटले जाते. हे दिव्यनामच सर्वश्रेष्ठ असते व त्याच्याच अनुसंधानाने श्रीभगवंतांची प्राप्ती होत असते.
श्रीभगवंत परेच्याही पलीकडे राहतात. ही परा वाणी श्रीभगवंतांच्याच प्रेरणेने बोलू शकते, पण ती त्यांना ओळखू शकत नाही. तिच्या पलीकडे जाण्यासाठी, परंपरेने आलेल्या आत्मानुभवी श्रीगुरूंनी कृपापूर्वक दिव्यनामच आपल्याला प्रदान करावे लागते. नुसते हे नाम मिळूनही चालत नाही, तर त्या नामाचे श्रीगुरूंनी जसे सांगितले आहे तसेच अनुसंधानही सतत व्हावे लागते आपल्याकडून. नंतरच मग दिव्य अनुभूती लाभते.
यासाठीचा क्रमच श्री माउली या पहिल्या अभंगातून सांगतात, " सतत 'हरि हरि' म्हणावे. म्हणजे आपल्याला आवडेल ते श्रीभगवंतांचे एखादे नाम प्रेमाने जपावे. त्यायोगे पुण्य तयार होईल. त्या पुण्याईच्या जोरावर वेदशास्त्रांचे अर्थ जाणता येतील. शिवाय त्यात जे सांगितले आहे त्याप्रमाणे ऐकण्याची, वागण्याची बुद्धी होईल. त्या पूर्वपुण्याईच्या बळावरच श्रीगुरूंची कृपा होऊन दिव्यनाम मिळेल. त्यांच्याच कृपेने व आपल्या शुभ प्रयत्नांनी, त्या नामाचा संसारात राहूनही सतत जप घडेल, वेदशास्त्रांवर श्रद्धा दृढ होईल व त्यातील व्यासांच्या खुणा जाणल्या जाऊन त्या अनुरोधाने भगवत्प्राप्ती होईल ! "
'व्यासांचिये खुणे'चा व 'द्वारिकेचे राणे'चा पू.मामांनी सांगितलेला विलक्षण गूढार्थ उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates